कर्करोग हा आजच्या घडीला महत्त्वाचा आणि धोकादायक आजार झाला आहे. परंतु, महिलांना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते आणि कर्करोगाचे निदान होईपर्यंत तो शेवटच्या स्थितीला पोहोचलेला असतो. त्यामुळे कर्करोगामुळे महिलांचा मृत्यू होण्याचीही शक्यता निर्माण होते. लॅन्सेट आयोगाने या संदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये कर्करोगामुळे महिलांचे होणारे मृत्यू, कर्करोगग्रस्तांची संख्या यावर भाष्य केले आहे. परंतु, महिलांना कर्करोग अधिक प्रमाणावर का होतो? त्यामागील कारणे आणि घ्यायची काळजी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवड्यात नालासोपारा येथील एका महिलेला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला. तिचा पती मद्याच्या अतिआहारी गेलेला असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे त्याने लक्ष दिले नाही. तसेच रोज होणारे शारीरिक अत्याचार यामुळे ती वैतागून गेली होती. त्यामुळे कदाचित डोकेदुखीचा त्रास होत असेल, असा तिचा अंदाज होता. स्थानिक डॉक्टरांनी डोळ्यांमुळे डोकेदुखी होत असेल असा अंदाज वर्तवला. परंतु, ही डोकेदुखी तिच्या मेंदूच्या कर्करोगाचे कारण होती, हे उशिरा समजले. ही स्त्री हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण, अनेक स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, व्यवस्थित काळजी घेत नाहीत. त्यामुळे कर्करोग, किंवा इतर आजार होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहेत.

हेही वाचा : Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधीजींनी महिलांना दिलेला ‘हा’ सल्ला; जाणून घ्या महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचे विचार…


लॅन्सेट आयोगाने ‘वुमन, पॉवर अँड कॅन्सर’ या अहवालामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी समाजामध्ये असणारी उदासीनता, कौटुंबिक स्तरावरच महिलांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, लैंगिक असमानता, कौटुंबिक हिंसाचार, घरची परिस्थिती यामुळे महिलांचे कर्करोगामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते असे म्हटले आहे. लैंगिक असमानता हे कर्करोगामध्ये होणाऱ्या मृत्यूचे मुख्य कारण आहे.

हेही वाचा : गौरी का आणतात ? खड्याच्या आणि मुखवट्याच्या गौरींची काय आहे प्रथा; जाणून घ्या…

कौटुंबिक पातळीवरच महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महिला त्यांना होणारा त्रास कोणाला सांगत नाहीत. त्यामुळे अनेक आजार किंवा कर्करोगही अंतिम स्तरावर पोहोचला की उपचारांना सुरुवात होते, ज्याचा काही उपयोग होत नाही. कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कसा होतो, त्यासंदर्भातील जागरूकता, ज्ञान याचाच अभाव असल्यामुळे कर्करोगावरील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू हे टाळता येण्याजोगेच आहेत. ३७ टक्के मृत्यू हे वेळेवर निदान झाल्यास उपचार घेऊन बरे होतील, असे आहेत. स्त्रियांमध्ये सुमारे ६.९ दशलक्ष कर्करोगामुळे होणारे मृत्यू टाळता येण्याजोगे होते आणि ४.०३ दशलक्ष उपचार करण्यायोग्य होते.

लॅन्सेटचे आयुक्त डॉ. इशू कटारिया यांच्या मते, भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. कौटुंबिक स्तरावरच आरोग्याबाबत असणारी उदासीनता, स्वतः च्या आरोग्याची आवश्यक ती काळजी न घेणे, आर्थिक स्थिती नसणे या कारणांमुळे महिलांनाच कर्करोगामुळे मृत्यू होतो. बऱ्याच महिलांचे मृत्यू आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष आणि पैसे नसल्यामुळे अधिक झाल्याचे दिसतात. म्हणजेच स्त्रियांच्या आरोग्याकडे लैंगिक भेदभावाच्या अनुषंगाने बघितले जाते. महिलांना महिला म्हणून असणाऱ्या समस्या असतातच, धार्मिक-जातीय बाबींमुळेही त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
कर्करोगामध्ये महिलांचा मृत्यू होण्यास तीन प्रकारचे कर्करोग मुख्य कारण ठरतात. स्तनाचा कर्करोग, सर्व्हीकल, बीजांडकोश आणि गर्भाशयाचा कर्करोग हे २०२० मधील महिलांना प्रामुख्याने होणारे कर्करोग होते. जंतुसंसर्गामुळे होणारे कर्करोग हे भारतीय महिलांमध्ये प्रामुख्याने दिसतात. कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी २३ टक्के मृत्यू हे जंतुसंसर्गामुळे होतात. कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या संसर्गांमध्ये एचपीव्ही विषाणूंचा अधिक समस्या आहे. या विषाणूमुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. हेपेटायटीस बी आणि सी यांच्या संक्रमणामुळे यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. तसेच कर्करोगासाठी अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे तंबाखू.तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगामुळे ६ टक्के मृत्यू होतात. अल्कोहोल आणि लठ्ठपणा यामुळे १ टक्के मृत्यू होतात.

कौटुंबिक स्तरावर महिलांकडे होणारे दुर्लक्ष

नालासोपारा येथे राहणारी रमा वंचित स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. रमाचे लग्न १६व्या वर्षीच १५ वर्षाने मोठ्या असणाऱ्या युवकाशी झाले. त्यानंतर तिला दोन मुली झाल्या. नंतर अजून एक मुलगा झाला. रमाचा पती रिक्षा चालवतो. रात्री मद्यपान करून तिला मारझोड करतो. तिला २०१५ पासून डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. काही काळाने डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. तिने स्थानिक डॉक्टरांना विचारले, तर त्यांनी तिला डोळ्यांचा हा त्रास असल्यामुळे डोकेदुखी होत असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून १ हजार रुपयांचा चष्मा त्यांनी तिला दिला. तरीही तिचा त्रास कमी झाला नाही. उलट्यांचा त्रास अधिक वाढल्यावर तिची तपासणी करण्यात आली आणि त्यात मेंदूचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी घरामध्ये पैसे नाही. पतीने जगायचं तर जग नाहीतर मर असे सांगितले. या आजारपणामुळे मुलींनी शाळा सोडली आणि पडेल ते काम करण्यास सुरुवात केली. तरीही पैसे जमेना म्हणून शेवटी तिने दागिने विकले. त्यातून आलेल्या पैशांमधून उपचार घेण्यास सुरुवात केली.
बिहार येथील राणीदेवी या ३९ वर्षीय महिलेच्या जिभेवर लहान व्रण दिसत होता. तिचा पती सेल्समन होता. त्याला हा व्रण मलम लावून बरा होईल असे वाटत होते. तो तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेला. परंतु, डॉक्टरही परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्यास अयशस्वी ठरले. सात महिन्यानंतर तिला गिळताना, खाताना त्रास होऊ लागला. परिस्थिती अगदीच अवघड झाल्यावर तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिला जिभेचा चौथ्या स्तरावरील कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. राणीदेवीची ८० टक्के जीभ कापण्यात आली. या कर्करोगाचे वेळीच निदान झाले असते तर २० टक्केच जीभ कापून उपचार करता आले असते. तिला श्वासोच्छवासासाठी ट्रॅकोस्टोमीची गरज भासली नसती आणि कदाचित ती अधिक आनंदाने राहिली असती ,” असे होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, मुझफ्फरपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ बुरहानुद्दीन कय्युमी यांनी सांगितले.
वरील दोन घटनांवरून असे दिसते की, कौटुंबिक जबाबदाऱ्या, गांभीर्याने न बघणे, आर्थिक स्थिती योग्य नसणे, आजारांविषयी जागरूकता नसणे, कुटुंबाकडूनही मानसिक आधार नसणे, अशा गोष्टींमुळे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, असे टाटा मेमोरियल सेंटर, मुंबईचे डॉ पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are women more likely to die of cancer lancet study has some answers vvk
Show comments