शरद ऋतूमध्ये निसर्गामध्ये महाभूतांपैकी (पंचतत्त्वांपैकी) जल (पाणी) आणि तेज (अग्नी) या दोन तत्त्वांचा प्रभाव असतो. वर्षा ऋतूमधला पाण्याचा प्रभाव शरदात सुद्धा राहतो आणि शरदामध्ये उष्णता प्रबळ होते, हे प्रत्यक्षसिद्ध आहे. साहजिकच या जल (शीत तत्त्व) आणि तेज (उष्ण तत्त्व) या दोन महाभूतांपासून तयार होणारा खारट रस शरद ऋतूमध्ये उत्पन्न होतो आणि सर्वत्र बळावतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामुळे शरदात निसर्गतः पाण्यामध्ये खारट रसाचा प्रभाव वाढतो. त्या पाण्यावर पोसलेल्या वनस्पतींमध्येसुद्धा खारट रस प्रबळ होतो. त्या वनस्पतींचे सेवन करणार्‍या आणि त्या खारट रसप्रधान पाण्याचे प्राशन करणार्‍या प्राणिजगतामध्ये सुद्धा तो खारट रस बलवान होतो. अंतिमतः खारटपणा वाढलेल्या पाण्याचे, वनस्पतींचे आणि प्राण्यांचे वा प्राणिजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍या मानवाच्या शरीरामध्ये सुद्धा खारट रसाचा प्रभाव वाढतो.

हेही वाचा… Health Special: पित्ताशयातील खडे

पावसाळ्यात पित्त केवळ जमलेले असते (पित्तसंचय), शरदात ते शरीरभर पसरते, ज्याला पित्तप्रकोप म्हटले आहे. शरदातल्या खारट रसाच्या प्रभावामुळे शरीरामध्ये आधीच वाढलेल्या पित्ताचा प्रकोप होतो, कारण खारट रस पित्त वाढवणारा आहे. त्याला जोड मिळते याच दिवसांमध्ये थंडावा कमी होऊन वाढलेल्या सूर्याच्या उष्णतेची. शरदामध्ये वाढलेली उष्णता आणि आधीच्या पावसाळ्यात शरीरात वाढलेला ओलावा पित्ताला पातळ करुन शरीरभर पसरवतो. या सर्वाच्या एकत्रित परिणामामुळे  या काळामध्ये पित्तप्रकोपामुळे संभवणार्‍या विविध व्याधींनी आपण त्रस्त होतो.

खारट रसाचे गुण

ज्या रसाशिवाय (चवीशिवाय) जेवण जेवण्याची कल्पनाही करता येणार नाही असा रस म्हणजे खारट रस. खारट रस हा अन्नाला रुची देणारा तर आहेच, त्याचबरोबर इतर सर्व रसांचा विरोधी आहे. गोड-आंबट-कडू-तिखट-तुरट या कोणत्याही चवीचा प्रतिबंध करणारी ती खारट चव. त्यामुळे खाद्यपदार्थामध्ये जेव्हा कोणतीही चव प्रबळ होते ,तेव्हा त्या चवीचे बल कमी करण्यासाठी खारट चव उपयोगी पडते. जसे एखादा पदार्थ फारच कडू लागत असेल तर किंचित मीठ टाकल्यावर त्याचा कडूपणा कमी होतो.

खारट रसाचे (चवीचे) इतर गुणधर्म

  • खारट रस अन्न पचवण्यास,पचलेल्या अन्नरसाचे शोषण करण्यास साहाय्य करतो.
  • शरीरामध्ये ओलावा वाढवतो,
  • शरीराचे आभ्यन्तर स्नेहन करतो (शरीराच्या-अवयवांच्या आतून आवश्यक अशी स्निग्धता निर्माण करतो), स्वेदन करतो (घाम आणतो-घाम वाढवतो).
  • खारट रस हा सर गुणांचा आहे, ज्यामुळे शरीरामधील विविध द्रवपदार्थांना-स्त्रावांना खारट रस पुढे-पुढे सरकवतो.
  • याच सर गुणामुळे खारट रस हा मलशुद्धीस (पोट साफ़ होण्यास) साहाय्य करतो. मलाबरोबरच मूत्रविसर्जनही वाढवतो.
  • स्वेदनिर्मितीमध्ये अर्थात घाम तयार करण्यामध्ये खारटाची मुख्य भूमिका आहे.
  • खारट रस हा व्यवायी-विकाशी आहे म्हणजे शरीरामधील सूक्ष्माहून सूक्ष्म अशा मार्गामध्ये शिरून त्याला विस्फारण्याचे कार्य करतो. त्यामुळे शरीरामधील संकोचलेल्या सूक्ष्म मार्गांचे-अवयवांचे संकोचन दूर करण्यास खारट रस उपयोगी पडतो.

खारट रसाच्या या विशेष गुणाचा चिकित्सेमध्ये उपयोग करुन घेऊन शरीरामधील संकोचलेले सूक्ष्म मार्ग विस्तारण्याकरता उपयोग करणे ,हे चिकित्सकाचे कौशल्य असते. एकंदरच खारट रस हा नुसताच अन्नाला रुची देणारा नाही तर आरोग्यासाठी नितांत आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does salty juice prevail in autumn hldc dvr
Show comments