पावसाळ्यात सुद्धा हिवाळ्यासारखीच थंडी असते, मग जशी व जितकी भूक हेमंत- शिशिर ऋतूमध्ये लागते तशी ती प्रावृट्‌-वर्षा ऋतुमध्ये का लागत नाही? असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. तर यामागील शास्त्र समजून घेवू. हिवाळा व पावसाळा यांमध्ये वातावरणात गारवा असूनही पावसाळ्यात भूक का वाढत नाही, याचे स्पष्टीकरण करताना शास्त्रकार सांगतात की भूक वाढते ती केवळ थंडीमुळे नव्हे तर घाम बाहेर फेकणारी सूक्ष्म रंध्रे (छिद्रे) बंद झाल्यामुळे. हिवाळ्यामध्ये घाम येत नसल्याने त्वचेवरील सूक्ष्म रंध्रे बंद होतात. त्यामुळे अग्नी (उष्णता) घामावाटे शरीराबाहेर न पडता शरीरातच आतल्या आत कोंडून अग्नी प्रबळ होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यातल्या गारवा असला तरी अधुनमधून सूर्यदर्शन होत असते, ज्यामुळे घाम येत राहतो अर्थात घाम काढणारी रंध्रे बंद होत नाहीत आणि अग्नी (उष्णता) शरीरात कोंडला न जाता उलट बाहेर फेकला जातो व अग्निमांद्य होते. या संदर्भात शास्त्रकारांनी आणखी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे हेमंत ऋतूमध्ये (हिवाळ्यात) बलवान शरीरांमध्येच अग्नी प्रबळ होतो. हेमंत ऋतूमध्येच वातावरण व देहस्थिती अशी असते की मानवाचे शरीर बलवान होते आणि या उलट पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा असला तरी शरीर बलवान नसून उलट कमजोर झालेले असते. त्यामुळे वर्षा ऋतुमध्ये अग्नी मंद होतो, तर हेमंत ऋतूमध्ये निसर्गतः बल उत्तम असते, भूक वाढल्याने अन्नाचे व्यवस्थित पचन होते व शरीराचे बल अधिक वाढते आणि बल वाढले की अग्नी अधिकाधिक प्रबळ होत जातो.

हेही वाचा… Health Special: इंजेक्शन न देताही रूट कॅनॉल शक्य!

वर्षा ऋतूमध्ये आदान काळाचा प्रभाव असल्याने माणसाचे शरीर दुर्बल होते आणि या अवस्थेमध्ये अग्नी सुद्धा दुर्बल होतो,असे अष्टाङ्गहृदय ग्रंथाचे व्याख्याकार हेमाद्री सांगतात. याशिवाय ज्या थंडाव्यामुळे अग्नी प्रज्वलित होऊन भूक व पचनशक्ती वाढते, तो थंडावाच मुळात या उभय ऋतूंमध्ये भिन्न-भिन्न असतो. हिवाळ्यातला थंडावा हा कोरडा असतो. हिवाळ्यातल्या कोरड्या व थंड हवेमुळे त्वचेची सूक्ष्म रंध्रे बंद होऊन अग्नी आतल्या आत कोंडतो व प्रज्वलित होऊन भूक व पचनशक्ती प्रखर करतो. पावसाळ्यामध्ये असलेला गारवा सुद्धा त्वचेवरील सूक्ष्म रंध्रांचा संकोच करतो, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा काही प्रमाणात भूक वाढलेली दिसते, परंतु ती हिवाळ्याप्रमाणे स्वस्थ भूक नसते.असे का?

हेही वाचा… Health Special: दातांवरचा खर्च कमी करण्यासाठी ‘हे’ न विसरता कराच!

…तर पावसाळ्यातल्या त्या गारव्याला ओलाव्याची जोड असते. हवेतला ओलावा त्वचेची रंध्रे कोरड्या हवेप्रमाणे पूर्णतः संकोचू देत नाही, त्यामुळे भूक वाढल्यासारखी वाटते; मात्र शरीरात वाढलेला ओलावा (क्लिन्नता) अग्नीला प्राकृतरित्या प्रज्वलित तर होऊ देत नाही, उलट आपले पचनाचे कार्य व्यवस्थित करु न शकणारा असा विदाही (शरीरात दाह वाढवणारा) ठरतो व पित्त वाढवण्यास कारणीभूत होतो.

हेही वाचा… Health Special: Algophobia टाळता येतो का?

दुसरीकडे प्रावृट‌ ऋतुमध्ये तीनही दोषांचा प्रकोप होतो, तोसुद्धा अग्नीचे कार्य प्राकृत होऊ देत नाही. त्रिदोषप्रकोपामुळे अग्निमांद्य आणि अग्निमांद्यामुळे त्रिदोषप्रकोप असे हे दुष्टचक्र असते, ज्याच्या परिणामी भूक व पचनशक्ती मंदावते. वर्षा ऋतूमध्ये निसर्गतः होणारा वातप्रकोप, त्याला मिळालेली ओलावायुक्त गारव्याची जोड व त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला ओलावायुक्त थंड गुणांचा वात (थंडाव्यामुळे वाढलेला वात) व दुसरीकडे पित्ताचा संचय सुद्धा अग्नीला मंद करुन भूक व पचनशक्ती कमजोर करतो. त्यामुळे या काळात पोटाची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why dont you feel hungry in the cold of monsoons like in winter hldc dvr
Show comments