पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एक महत्त्वाची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी ती म्हणजे उघड्यावरचे खाद्यपदार्थ न खाणे. अर्थात हा सल्ला आपण लहानपणापासून ऐकत असतो, जो वास्तवात बाराही महिने पाळावा असा आहे. पण रस्त्यावर चालताना येणारे खमंग वास लोकांना भुरळ घालतात आणि लोक उघड्यावरचं खात राहातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र पावसाच्या दिवसांमध्ये या गोष्टीचे विशेष महत्त्व आहे, कारण आषाढ महिन्यात वाढणार्‍या माशा! या दरम्यान माशांची संख्या इतकी प्रचंड प्रमाणात वाढते की विचारू नका. त्यात बाहेर पाऊस पडत असताना माशांचे पंख पाण्याच्या थेंबांनी जड होऊन पाण्याच्या वर्षावातून त्यांना उडणे कठीण जाते आणि त्या आसरा शोधता-शोधता, चार भिंतींमध्ये शिरतात. आपल्या घरातच या दिवसांत एकावेळी शंभरेक माशा फिरत असतात, अन्नपदार्थावर बसण्याचा प्रयत्न करत असतात. आपण त्यांचे निवारण करतो. मात्र रस्त्यावर अन्नपदार्थ बनवणार्‍यांचे काय? हॉटेल-रेस्टॉरन्ट्सचे काय? अपवाद वगळता तिथेही माशा असतातच.त्यासुद्धा हजारोंच्या संख्येत,त्यांचे काय?

आणखी वाचा: Health Special: दिवसा आणि रात्रीच्या पावसाच्या पाण्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?


जुने जाणते लोक म्हणतात की आषाढ आला की घरात माशा वाढतात. प्रत्यक्षातसुद्धा वर्षातल्या दुसर्‍या कोणत्याच महिन्यात नसतील एवढ्या माशा पावसाळ्यातल्या आषाढ महिन्यात घरात शिरून त्रास देतात. २१व्या शतकात ऋतूचक्र पुढे सरकले असल्याने माशा श्रावणातसुद्धा येताना दिसतात, तो विषय वेगळा. या दिवसांमध्ये पाणी व चिखलाचे साम्राज्य वाढते आणि तापमान खाली येते, हे कारण माशा वाढण्यामागे असावे. सरासरी २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये माशांचे प्रमाण खूपच वाढते. २० हून कमी आणि २५ हून जास्त तापमान झाले की माशांची संख्या रोडावते. १५ अंशाहून कमी तापमानामध्ये माशांचं खाणे, उडणे, पुनरुत्पादन आदि क्रिया घटतात आणि १० अंशाहूनही तापमान खाली गेल्यास वा ४५ अंशाहून अधिक झाल्यास माशा दिसेनाशा होतात. थंडीत आणि उन्हाळ्यात आपल्याला फारशा माशा का दिसत नाहीत, याचे हे स्पष्टीकरण.

आणखी वाचा: Health Special: पावसाळा, अशुद्ध पाणी आणि आजारांची मालिका

तुम्ही एखाद्या हॉटेलमधला, रस्त्यावरचा वा फूटपाथवरचा पदार्थ खात असता, ज्यावर आधी माशी बसली होती, तर अशावेळी ती माशी त्या आधी कुठे-कुठे विसावून आली असेल याची आपल्याला माहिती असते काय? कशावरुन त्या आधी ती माशी एखाद्या गटारातील घाणीवर, हॉटेलने फ़ेकलेल्या उष्ट्या खरकट्यावर, त्याच सकाळी उघड्यावर विसर्जित केलेल्या मानवी मलावर वा मागच्या भिंतीवर उत्सर्जित केलेल्या मूत्रावर वा एखाद्या कुत्र्याच्या मलावर किंवा अति खा-खा झाल्याने एखाद्याने केलेल्या उलटीवर वा टीबीने ग्रस्त रुग्णाने खोकून थुंकलेल्या कफाच्या बेडक्यावर बसली नव्हती? त्याहून वाईट म्हणजे ती माशीबाई वरील सर्व अभद्र स्थानांवरून उडून अन्नपदार्थावर बसल्यावर आपले पुढचे पाय जेव्हा स्वच्छ करते तेव्हा त्या-त्या पवित्र स्थानावरून उचलून आणलेला सगळा मालमसाला त्या अन्नावर टाकते. ज्या मालमसाल्यात अनेक रोगांचे जंतू असतात! पावसाळ्यातल्या या दिवसांमध्ये घराबाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने लोक उलट्या, जुलाब, पोटदुखी, आमांश, हगवण, ताप वगैरे अनेक तक्रारींनी त्रस्त होतात, ज्याचे मुख्य कारण असते बाहेरचे खाणे. तुम्हाला सवय नाही ना उघड्यावरचे पदार्थ खाण्याची!?

माशांमुळे संभवणारे रोग
आपल्या घरात शिरणार्‍या माशा ’मुस्का डोमेस्टिका(Musca Domestica)’ या जातीच्या घरगुती माशा (हाऊजफ़्लाईज) असतात, ज्या मनुष्याच्या निकट सहवासात राहतात. या माशा मनुष्याने सोडलेल्या अन्नावर, फेकलेल्या उकिरड्यावर, मनुष्य व इतर प्राण्यांच्या मलावर (मनुष्यप्राण्याच्या घामावरसुद्धा) आणि इतर केरकचर्‍यावर पोसतात-वाढतात. जिथे प्राणी पाळलेले असतात, विशेषतः जिथे गुरेढोरे असतात तिथे माशा खूप जास्त प्रमाणात असतात.
आपल्याला बालपणापासून सोबत करणारी ही माशीच अनेक रोगांच्या संसर्गास कारणीभूत होते, हे सत्य मात्र आपल्याला उशिराने उमगते. याच माशीशी साधर्म्य असलेली दुसरी एक ’मुस्का सोर्बेन्स’ ही उष्ण कटिबंधाच्या प्रदेशांमध्ये सापडणारी माशीसुद्धा या घरगुती माशीप्रमाणेच मनुष्याच्या सहवासात राहायला शिकली आहे ,जी विशेषकरुन डोळ्यांच्या सांसर्गिक आजारांना कारणीभूत होते. याशिवाय ब्लोफ्लाय म्हणून प्रसिद्ध असणारी कॅलिफोरिडे प्रकारची एक माशीसुद्धा मानवाला आजारी पाडण्यास कारण ठरते. ती मुख्यत्वे आतड्यासंबंधित उलट्या,पोटदुखी,जुलाब वगैरे तक्रारींना जबाबदार असते.एकंदर पाहता आतड्याचे जुलाब, आमांश, टायफॉईड,कॉलेरा, कृमी(जंत) यांसारखे आतड्यांचे आजार, डोळ्यांचे विशिष्ट आजार जसे-ट्रॅकोमा व डोळ्यांची साथ (एपिडेमिक कन्जक्टावायटिस) आणि पोलिओमायलायटिस व विशिष्ट त्वचेचे संसर्गजन्य आजार माशांमुळे संभवतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) घरगुती माशांवरील (हाऊसफ़्लाईज) रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अर्थात इथे त्या माशा प्रत्यक्षात आजारांना कारणीभूत होत नसून त्या-त्या रोगांचे रोगजंतू वहन करून मानवाशी त्यांचा संपर्क करुन देण्याचे काम या माशा करतात. महत्त्वाचे म्हणजे माशांशिवाय इतर अनेक कारणे या रोगांच्या संसर्गामागे असतात, हे ध्यानात ठेवावे. कसेही असले तरी माशांपासून प्रतिबंध करणे किती महत्त्वाचे आहे, ते आता वाचकांच्या लक्षात आले असेल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why eating outside food is dangerous in rainy season hldc psp
Show comments