या सूत्राचा अर्थ असा की वैद्यांसाठी शरद ऋतू हा मातेप्रमाणे असतो. शरद ऋतूमध्ये (म्हणजे ऑक्टोबर हिटच्या भयंकर उष्म्याच्या दिवसांमध्ये) रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणात बळावते की त्यामुळे वैद्य-डॉक्टर मंडळींसाठी तो सुगीचा काळ ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षाऋतूनंतर येणारा शरद ऋतू, म्हणजे पावसाळ्यातील शीत-आर्द्र वातावरणानंतर येणारा उष्ण-दमट वातावरणाचा उन्हाळा. बरं, वातावरणात होणारा हा बदल हळूहळू झाला तरी त्याचा परिणाम फार तीव्रतेने होणार नाही. मागील काही वर्षांपासून (तुम्ही-आम्ही भूमातेची जी कत्तल चालवली आहे, तेव्हापासून) मात्र हा वातावरण बदल अचानक होऊ लागला आहे. काल-परवापर्यंत पाऊस व थंड वातावरण आणि लगेच एक-दोन दिवसात अंगाची लाही-लाही करणारा उन्हाळा! याला काय म्हणायचे?

हेही वाचा… Mental Health Special: जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह का असतो?

या अचानक होणार्‍या बदलाबरोबर शरीराने कसे काय जमवून घ्यायचे? दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो, घामाच्या धारा वाहू लागतात, अचानक सायंकाळी वारे वाहू लागतात, ढग जमून येतात, काळोख दाटून येतो आणि पाऊस पडू लागतो किंवा रात्री ढग गडगडायला लागतात, विजा चमकू लागतात व धुवांधार पाऊस पडू लागतो. कोणता ऋतू समजायचा हा? दिवसा उन्हाळा-रात्री पावसाळा? निसर्गात असे विचित्र बदल चोवीस तासांमध्ये होत असतील तर शरीराने त्या बदलांबरोबर कसे जुळवून घ्यायचे? शरीरामधील या विविध बदलांबरोबर जुळवून घेण्याची धडपड म्हणजेच या दिवसात दिसणारे आजार! याचमुळे काश्यपसंहितेने ’ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे. (काश्यपसंहिता७.८.१६,१८)

हेही वाचा… Mental Health Special: ‘पेरेंटल कंट्रोल’ आणि संशयाचा किडा!

आणि जरी पाऊस थांबला तरी शरदात वाढलेली सूर्याची तीव्रता वर्षा ऋतुमध्ये ओलसर-गार वातावरणाची सवय झालेल्या शरीराला सहन होत नाही. शरीरामध्ये उरलेला ओलावा सूर्याच्या उष्णतेमुळे उष्ण होऊन शरीराला उष्णताजन्य विकारांनी त्रस्त करतो. त्यात तुम्ही जर उन्हाळा सुरु झाला म्हणून वर्षा ऋतूला अनुकूल झालेल्या आपल्या आहारविहारामध्ये अचानक बदल केलात तर तो बदल शरीराला रोगकारक, मात्र रोगकारणांना पूरक होऊन शरीर विविध पित्तविकारांनी ग्रस्त होते. त्यात पुन्हा जर तुम्ही पित्त (उष्ण) प्रकृतीचे असल तर अधिकच!

शरदऋतू: आजारांचे आगार

तुम्ही बघाल तर या दिवसांमध्ये नाक वाहणे, घसा दुखणे, खोकला ,तीव्र ताप आदि लक्षणांनी त्रस्त करणारा फ्ल्यू सारखा आजार, नेत्राभिष्यन्द (कन्जंक्टायवायटीस) म्हणजे डोळे येणे, नागीण (हर्पिस झोस्टर) ,कावीळ यांसारखे संसर्गजन्य व्हायरल (विषाणुजन्य) आजार, इत्यादी रोग वातावरण बदलताना आधिक्याने होताना दिसतील. निसर्गाचा शीत तापमानाकडून उष्ण तापमानाकडे होणारा हा प्रवास शनैःशनैः (हळूहळू) झाला; तर तुलनेने आजार कमी त्रास देतील. मात्र मानवाच्या उचापतींनी वाढलेल्या प्रदूषणामुळे निसर्गचक्र बिघडल्यामुळे एकाच दिवसात तापमानात बदल होऊन निसर्गात – वातावरणात उष्मा वाढतो. मानवी शरीर हे निसर्गाचेच लहानसे रूप असल्याने शरीरातही उष्मा वाढतो. शरीरात वाढलेली ती उष्णता म्हणजेच पित्तप्रकोप, जो विविध रोगांना आमंत्रण देणारा ठरतो, त्यातही पित्तप्रकोपजन्य पित्तविकारांना.

हेही वाचा… Mental Health Special: भावनात्मक बुद्धिमत्तेचा (EI) फायदा काय?

त्यामुळे शरदातल्या या उन्हाळ्यात वरील विषाणूजन्य आजारांबरोबरच उष्णताजन्य (पित्तप्रकोपजन्य) विकारांमध्ये छातीत-पोटामध्ये जळजळ, पोटामध्ये आग होणे, तोंडामध्ये आंबट पित्त येणे, रोजचेच जेवण तिखट लागणे, तोंड येणे, जीभ सोलणे, तोंडामध्ये व्रण येणे, फ़िशर्स-पाईल्स यांसारखे गुदविकार उफ़ाळणे, गुदमार्गावाटे रक्त पडणे, नाकामधून रक्त वाहणे, अंगावर खाज येणे, त्वचेवर पित्त उठणे, अंगावर पुळ्या-फ़ोड उठणे, पिंपल्सचा त्रास सुरु होणे वा असल्यास उफ़ाळणे, डोके चढणे, डोकं दुखणे, चक्कर, डोळ्यांसमोर अंधार, अर्धशिशी, वगैरे समस्या समाजाला त्रस्त करतात.

त्यामुळेच या दिवसांत प्रत्येक कुटुंबामधील एकतरी सदस्य काही ना काही आरोग्य-तक्रारीने त्रस्त असतो. म्हणूनच तर शरदऋतू हा अनेक आजार निर्माण करुन वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खूश ठेवतो, म्हणून त्याला वैद्य-डॉक्टरांची काळजी घेणारी आई ,या अर्थाने ’वैद्यानां शारदी माता’ असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is autumn called the sharadi mata of doctors hldc dvr
Show comments