रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे, नाश्ता आणि जेवण एकत्र करणे (brunch), किंवा नाश्ता न करणे ही आताची जीवनशैली असल्याचे दिसते. अनेकांना लवकर कार्यालयात जायचे असल्यामुळे केवळ चहा/कॉफी पिऊन जाण्याकडे कल असतो. नाश्ताची वेळही निश्चित नसते. परंतु, ही जीवनशैली योग्य नाही. सकाळचा नाश्ता न केल्यामुळे, तसेच अनियमित वेळा उपाशी राहिल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. यामुळे नाश्ता करणे गरजेचे का असते, नाश्ता का करावा, नाश्ता करण्याच्या योग्य वेळा याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या कामाच्या स्वरूपामुळे बहुतांशीवेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. खाण्याच्या अनियमित वेळा, अनियमित झोप, नाश्ता न करणे, उपवासाच्या चुकीच्या पद्धती यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे उपसंचालक डॉ शैलेश श्रीखंडे यांनी यासंदर्भात द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. जर्नल ऑफ जनरल इंटर्नल मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, सकाळचा नाश्ता वगळल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) ट्रॅक्टचा कर्करोग होण्याची शक्यता असते. या अभ्यासानुसार, दररोज नाश्ता करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जे आठवड्यातून एकदा-दोनदा किंवा नाश्ता न करणाऱ्या लोकांना अन्ननलिका आणि कोलोरेक्टल (अन्ननलिकेचा गुदद्वाराजवळील भाग) यांचा कर्करोग होऊ शकतो. तसेच पित्ताशयाच्याही कर्करोग होण्याची शक्यता वाढते. ६३ हजार लोकांवर प्रयोग करून ५ वर्षे अभ्यास करण्यात आला. एकूण सहभागींमध्ये ३६९ लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग झाला.

हेही वाचा : एकच गाव, एकच आडनाव; भारतासाठी कांस्यपदक मिळवणाऱ्या ‘या’ जिगरबाज मैत्रिणी कोण? जाणून घ्या…

नाश्ता न केल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता का असते ?

नाश्ता न केल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्गाची जळजळ होते. यामुळे कालांतराने कर्करोग होऊ शकतो. मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे उपसंचालक आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोगतज्ज्ञ डॉ शैलेश श्रीखंडे म्हणतात, “जठरासंबंधी आणि आतड्यांसंबंधी पाचक रस आणि अन्य स्राव चोवीस तास स्रवत
असतात. आपण जेव्हा खातो, तेव्हा ते अन्नामध्ये समाविष्ट होतात. आपण जेव्हा जेवत नाही, तेव्हाही हे स्राव स्रवत असतात. जर त्यांना अन्न मिळाले नाही, तर ते आतड्यांवर, अन्ननलिकेच्या अस्तरावर काम करू लागतात. हे आम्ल १०० टक्के हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. या ऍसिडमुळे पोटावर आणि आतड्यांवरील अस्तरांवर प्रभाव पडतात. त्यामुळे या अवयवांचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होते. चांगला आणि परिपूर्ण नाश्ता या आम्लाचा प्रभाव कमी करतो.

हेही वाचा : महिलांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

खाण्याच्या वेळा कशा ठरवाव्यात ?

साधारणतः कोणतेही अन्न पचायला दोन ते चार तास लागतात. साधारणपणे अन्न खाल्यानंतर दोन-चार तासांनी पोट रिकामे होते. त्यामुळे रात्री ८-९ ला जेवण केले असेल तर सकाळी ६-७ ला नाश्ता करणे योग्य आहे, असे डॉ. श्रीखंडे म्हणतात. कोणत्याही दोन जेवणांमध्ये किंवा खाण्यांमध्ये ९-१० तासांचे अंतर नसावे. जास्त अंतर असेल, पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : श्रीगणेशाला का प्रिय आहेत दुर्वा-शमी आणि मंदार ? गणपतीचा आणि पत्रींचा संबंध काय ?

उपवास करणे किंवा उपाशी राहणे योग्य की अयोग्य ?

डॉ. श्रीखंडे म्हणतात, ” मधुमेह असणाऱ्या लोकांनी अधूनमधून योग्य उपवास केल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. पण, हा नियम सर्वांना लागू होत नाही. अनियंत्रित मधुमेह असणाऱ्यांनी हा प्रयोग करू नये. वजन कमी करणाऱ्या लोकांनी उपवास करू नये किंवा जास्त उपाशी राहू नये. वजन नियंत्रणात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग मम्हणजे मध्यम आहार आणि नियमित व्यायाम. काही लोकांच्या खाण्यामध्ये बदल झाले की वजनावर परिणाम होतो याचा अर्थ सर्वांनाच ते लागू होईल असं नाही. अनियमित खाणे शरीराला त्रासदायक ठरू शकते.

नाश्ता काय करावा ?

सकाळचा नाश्ता हा जवळजवळ जेवणाएवढा असावा. कर्बोदकांचा समावेश नाश्तामध्ये करावा. दिवसभर काम करण्यासाठी कार्बोहायड्रेट्सची गरज असते. फळे, अंडी सकाळी खावीत. प्रथिने, फायबर चे पदार्थ खावेत. रात्री तेलकट, पचायला जड पदार्थ खाऊ नये, असे डॉ. श्रीखंडे म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why skipping breakfast and intermittent fasting can lead to gi tract cancer new study quantifies risk vvk
Show comments