दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत. दूध आणि फळे एकत्र खाऊ नयेत, मध खाल्ल्यानंतर गरम पाणी पिऊ नये अशा कित्येक सूचना आपल्याला वडीलधाऱ्यांकडून दिल्या जातात, पण त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का? नाही ना…; केला असेल तरी कित्येकदा वडीलधाऱ्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता येत नाही. पण, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, या सर्व गोष्टींमध्ये शास्त्रीय कारण आहे. होय, आपण जे काही अन्न खातो, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. प्रत्येक अन्नपदार्थाची चव वेगळी असते, त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि त्यातून मिळणारे पोषकतत्वंही वेगळी असतात. यापैकी काही पदार्थ असतात, जे एकत्रित खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यास लाभ होतो, तर काही पदार्थ असे असतात, जे एकत्रित खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. होय, जे खाद्यपदार्थ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात, त्याला विरुद्ध आहार असे म्हणतात. एवढेच नाही, तर काही पदार्थ आपण कधी खातो, किती प्रमाणात खातो, कसे खातो, कोणत्या पदार्थांबरोबर खातो याचेही काही नियम आहेत. या नियमांविरुद्ध जाऊन जे अन्न आपण खातो, त्याला आपण विरुद्ध आहार म्हणू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेदामध्ये विरुध्द आहार म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहाराचे विविध प्रकारे वर्गीकरणही करण्यात आले आहे.

विरुद्ध आहार म्हणजे काय?

विरुद्ध आहार म्हणजे काय याबाबत डॉ. अश्विन सावंत यांनी लोकसत्ताला माहिती देताना सांगितले की,” आयुर्वेद शास्त्रानुसार ज्या आहारामुळे वात, पित्त आणि कफ या घटकांमध्ये असमोतल निर्माण होतो, त्यांना शरीराबाहेर काढून टाकण्याऐवजी ते शरीरातच साचून राहतात, त्याला ‘विरुद्ध आहार’ म्हणतात. “

आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन घटक असतात, ज्यांना दोष असे म्हटले जाते. या तीन मूलभूत घटकांचे प्रमाण संतुलित असेल तर ते शरीराचे संचालक म्हणून काम करतात आणि त्यांचे संतुलन बिघडले तर ते शरीरासाठी घातक ठरतात, म्हणूनच त्यांना ‘दोष’ म्हणतात. ज्या पदार्थांच्या सेवनामुळे कफ -पित्त- वात यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होते, त्या पदार्थांना विरुद्ध आहार म्हणतात.

चरकसंहितेनुसार, विरुद्ध आहार म्हणजे, “मानवी शरीरातील धातूंपेक्षा वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ हे विरुद्ध आहार ठरू शकतात. यापैकी काही पदार्थ गुणधर्मविरुद्ध असतात, काही पदार्थ संयोगविरुद्ध (एकत्रितपणे सेवन करणे अपायकारक), काही देश-काळ-मात्रा इ. विरुद्ध आणि काही स्वभाव विरुद्ध असू शकतात.”

थोडक्यात सांगायचे झाले तर काही पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे असतात, काही पदार्थ एकत्र आल्यास अपाय कारक ठरू शकतात, काही पदार्थ विशिष्ट ठिकाण अथवा प्रदेशानुसार अयोग्य ठरू शकतात, काही पदार्थ खाण्याची वेळ, ऋतू अथवा काळ चुकीचा असू शकतो, तर काही पदार्थ विशिष्ट प्रमाणात एकत्रितपणे खाणे अपायकारक असू शकते तर काही पदार्थ चुकीच्या पद्धतीने तयार केल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. हे सर्व प्रकार विरुद्ध आहार ओळखण्याचे प्रकार आहे.

हेही वाचा – जान्हवी कपूरला आवडते ‘जल तत्व ध्यान’! खरंच पाण्याचा आवाज ऐकून ध्यान करणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 

चरकसंहितेनुसार विरुद्ध आहाराचे लक्षण :

देश विरुध्द: कोरडे वातावरण असलेल्या प्रदेशात कोरडे खाद्यपदार्थ खाणे हा विरुद्ध आहार आहे कारण विशिष्ट प्रदेशाच्या वातावरणानुसार अनुकूल नसलेला आहार एखादयासाठी अपायकारक ठरू शकते. यालाच देश विरुध्द आहार म्हणतात.

काळ विरुद्ध: हिवाळ्यात आपण अनेकदा थंड आईस्क्रीम खाणे, अवेळी जेवण करणे हा देखील विरुद्ध आहार आहे. वेळ आणि ऋतूनुसार विसंगत आहाराचे सेवन करणे यालाच काल विरु्द्द आहार म्हणतात.

अग्निविरुद्ध: एखाद्या व्यक्तीला पचनाची समस्या असतानाही जड अन्नपदार्थ खाते तर एखादी व्यक्ती पचन क्षमता चांगली असेल हलका आहार घेणे हा देखील विरुद्ध आहार आहे. एखाद्याच्या पचनशक्तीला अनुसरून नाही अशा आहाराचे सेवन करणे म्हणजे अग्निविरुद्ध आहार होय.

मात्रा विरुद्ध: मध आणि तूप समान प्रमाणात घेणे हा देखील विरुद्ध आहार आहे. आवश्यक प्रमाण लक्षात न घेता आहार घेणे याला मात्रा विरुद्ध आहार म्हणतात.

सात्म्य विरुद्ध: तिखट पदार्थ खाण्याची सवय असलेल्या व्यक्तीला गोड पदार्थ खायला देणे हा देखील विरुद्ध आहार आहे. एखाद्याच्या खाण्याच्या सवयीशी सुसंगत नसलेला आहार म्हणजे सात्म्य विरुद्ध आहार होय.

दोष विरुद्ध: पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीने पित्त वाढवणारे पदार्थ खाणे, वाताचा त्रास असलेल्या व्यक्तीने वातूळ पदार्थ खाणे, किंवा कफाचा त्रास असलेल्या व्यक्तीने कफ वाढवणारे पदार्थ खाणे हा देखील विरुद्ध आहार आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन घटक असतात. त्याप्रमाणे अन्नपदार्थांमध्येही वात, पित्त आणि कफ हे गुणधर्म असतात. जर एखाद्या व्यक्तीने दोषांसारखेच(वात, पित्त आणि कफ) समान गुण असलेले अन्नपदार्थ खाणे सेवन याला दोष विरुद्ध आहार म्हणतात.

संस्कार विरुद्ध: गरम केलेला मध हा विरुद्ध आहार आहे. विशिष्ट प्रकारे तयार केल्यावर काही अन्नपदार्थ विषारी बनतात, असा आहाराल संस्कार विरुध्द आहार म्हणतात.

वीर्य विरुद्ध: मासे आणि दूध एकत्र खाऊ नये असे सांगितले जाते कारण दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन केले तर ते आरोग्यास बाधक ठरते म्हणूनच तो विरुद्ध आहार आहे. जे अन्नपदार्थ एकमेकांच्या विरुद्ध गुणधर्म असतात ते एकत्रिपणे सेवन केल्यास शरीरास अपायकारक ठरू शकतात त्याला वीर्य विरुध्द आहार असे म्हणतात. आयुर्वेदानुसार वीर्य म्हणजे गुणधर्म होय.

कोष्ठ विरुद्ध: काही लोकांचा पचनक्रिया अत्यंत चांगली आहे त्याला हलका, सहज पचणारा आहार देणे किंवा ज्याचा पचनाचा कोठा जड आहे त्याला पचण्यास जड पदार्थ देणे हा देखील विरुद्ध आहार आहे. अशा पदार्थांचे सेवन जे एखाद्याच्या कोष्टाच्या (पचनमार्गाचे स्वरूप) विरुद्ध आहेत त्यालाच कोष्ठ विरुध्द आहार म्हणतात.

अवस्था विरुध्द: शारीरिक श्रम केल्यानंतर वात वाढवणारा आहार घेणे किंवा झोपेतून उठलेल्या व्यक्तीने कफ वाढविणारा आहार घेणे, तापामध्ये पचण्यास जड अन्न खाणे हा देखील विरुद्द आहारा आहे. एखाद्याच्या आरोग्याच्या विपरीत आहार घेणे याला अवस्था विरुद्ध आहार म्हणतात.

क्रम विरुद्ध: मध खाल्ल्यानंतर गरम पाणी अथवा रात्री दही खाणे किंवा जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाणे हा विरुद्ध आहार ठरू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती शौचास जाण्यापूर्वी आणि लघवीच्या आधी अन्नाचे सेवन करते किंवा भूक लागलेली नसताना किंवा जास्त भूक लागल्यावर जेवण करते तेव्हा क्रम विरुद्ध आहार असतो.

परिहार विरुद्ध: तूप खाल्ल्यानंतर थंड पदार्थ खाणे, मासांहार केल्यानंतर उष्ण पदार्थांचे सेवन करणे. विशिष्ट औषध अथवा पदार्थ खाल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य असते. त्याला परिहार विरुद्ध आहार म्हणतात.

उपचार विरुद्ध : पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला पित्त वाढवणारे पदार्थ खाण्यासाठी देणे, मधुमेही व्यक्तीने गोड पदार्थ खाणे हा विरुद्ध आहार आहे. डॉक्टरांनी सांगतेल्या पथ्याचे पालन न करता घेतला जाणारा आहार हा उपचार विरुद्ध आहार असतो.

पाक विरुद्ध : जास्त शिजवलेले किंवा करपलेले अन्न खाणे हा देखील विरुद्ध आहार आहे. चुकीच्या पद्धतीने शिजवलेले अन्न यालाच पाक विरुद्ध आहार म्हणतात.

संयोग विरुद्ध : दुधासोबत आंबट पदार्थांचे सेवन, फळांची कोशिंबीर किंवा दूध किंवा केळी हा आहार देखीर विरुद्ध आहार आहे. जे खाद्यपदार्थांचा संयोग करणे चुकीचे आहे असे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे संयोग विरुद्ध आहार होत.

ह्रदयविरुद्ध: कारले आवडत नसताना खाणे, वांगं आवडत नसताना खाणे. एखाद्याला आवडत नसलेला आणि चवीला रुचकर नसलेला आहार खाणे म्हणजे ह्रदयविरुद्ध आहार होय.

संपद विरुध्द : कच्चे, सडलेले पदार्थ खाणे हा विरुद्ध आहारच आहे. त्यालाच संपद विरुद्ध आहार असेही म्हणतात.

विधी विरुध्द : जेवताना बोलणे, सार्वजनिक ठिकाणी जेवणे, अशा आहाराच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आहार घेणे याला विधी विरुद्ध आहार म्हणतात.

अशा अन्नपदार्थांच्या सेवनाने नकळत आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात आणि अनेक घातक रोग होऊ शकतात तेव्हा विरुध्द आहाराच्या संकल्पनेला आजच्या काळात खूप महत्त्व आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे सेवन करण्यााआधी काय खाणे योग्य आहे आणि काय खाणे अयोग्य आहे हे माहिती असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर का आहेत? तीळ शरीरातील फॅट्स कमी करण्यास कशी मदत करतात?

विरुद्ध आहाराच्या सेवनामुळे कोणते आजार होऊ शकतात?
प्राचीन काळात रचलेल्या चरकसंहितेमध्ये विरुद्ध आहाराचे सेवन केल्यामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात याचे वर्णन केले आहे.
चरकसंहितेनुसार, विरुद्ध आहारामुळे होणारे आजार –
-आम्लपित्त(Acidity), सर्दी, ताप
-गिळण्याचा त्रास,
जलोदर(Ascites),
भगंदर(Fistula)
-रक्ताक्षय(anemia)
-पांढरे डाग सारखे विविध त्वचाविकार
अंधत्व (blindness),
वंध्यत्व (infertility)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why we should not have fish and milk together what is virudh aahar know what ayurveda says about it itdc snk
Show comments