Why You Should Avoid Eating Between 4 to 6 PM: दुपारी जेवण झाल्यावर काम करायचं म्हणजे आवण विरुद्ध झोप असं युद्धच असतं नाही का? अशात साधारण ४ ला वगैरे एखादा चहाचा कप समोर आला की कशी तरतरी जाणवते. आता चहा नुसताच कुठे घ्यायचा परत ऍसिडिटी झाली तर.. असा प्रश्न डोक्यात आला की पटकन कधी बिस्कीटचा पुडा उघडला जातो, कधी सामोसे, वडे मागवले जातात, काहीच नाही तर चिप्स, चकल्या, कचोऱ्या काही ना काही जोडीला घेऊन टी पार्टी होतेच. पण तुम्हाला माहितीये का, असं केल्याने आपणच आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण करत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीर्घायुषी होण्यासाठी बायोहॅकिंग (शरीराला व मनाला स्थितीनुसार प्रशिक्षण देण्याची एक पद्धत) करणारे प्रशांत देसाई यांनी इन्स्टाग्रामच्या एका रीलमध्ये सांगितले की, संध्याकाळी ४ ते ६ ही वेळ आपल्यासाठी शत्रूसारखी काम करू शकते. “तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली, नाश्ता केला आणि कामावर गेलात म्हणून तुमचा दिवस चांगला सुरू होतो. तुमच्या दिवसाचे पहिले सात किंवा आठ तास खूप सक्रिय असतात. पण दुपारी ४ वाजेपर्यंत ती शिस्त ओसरते आणि तुम्ही स्नॅकिंग सुरू करता.यामुळे सगळ्यात मुख्य प्रभाव असा होतो की थोडं थोडं खाऊन पोट भरलेलं राहतं आणि मग जेवणाची वेळ पुढे ढकलली जाते, समजा जेवण टाळलं तरी रात्री पुन्हा भूक लागून पुन्हा स्नॅकिंग केलं जातं. त्यामुळेच निरोगी राहण्यासाठी, संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान खाणे टाळावे.

देसाई सांगतात, दुपारी ३.३० वाजता एक ग्लास पाणी, छास (ताक) किंवा लिंबू पाणी घ्यावे. त्यानंतरही तुम्हाला भूक लागली असल्यास, ब्लॅक कॉफी किंवा कोऱ्या चहाबरोबर सुका मेवा खा किंवा प्रोटीन शेक प्या. यामुळे तुम्हाला शिस्त लागेल आणि भरपूर खाणं टाळण्यास मदत होईल.

४ ते ६ मध्ये खाणे टाळण्याचा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे का?

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोदा कुमारी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, ४ ते ६ या वेळेत नाष्टा करणे त्रासदायक ठरण्याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, रात्रीच्या जेवणाची वेळ जवळ आली असते, त्यामुळे जास्त प्रमाणात खाण्याची शक्यता असते व त्यामुळे रात्री जेवण्यासाठी नीटशी भूक लागत नाही. दुसरं म्हणजे, दिवसाच्या या वेळी खाल्लेल्या स्नॅक्समध्ये वारंवार चरबी, मिठाई आणि कॅलरी असतात, या सर्वांमुळे ऊर्जा कमी होते आणि वजन वाढू शकते. शिवाय, उशिरा-दुपारचा नाष्टा केल्याने तुमच्या शरीराच्या नैसर्गिक भुकेच्या सिग्नल्समध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पुढे खऱ्या भुकेचे संकेत ओळखणे अधिक कठीण होते.”

त्यामुळेच अशावेळी आपण ऊर्जा व तृप्ती प्रदान करणारे हलके व पोषणयुक्त पदार्थ निवडायला हवेत. भाजलेले चणे, मखाना, ताजी फळे, सुका मेवा, संपूर्ण धान्यांपासून बनवलेली बिस्किटे, इत्यादी खाल्ल्याने तुमचे दोन्ही प्रश्न सुटू शकतात. हे पर्याय आपल्याला प्रथिने, निरोगी फॅट्स, कार्ब्स प्रदान करतात. यामुळे रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्हाला अगदी उपाशी आहोत असे वाटत नाही व पूर्णपणे भूक नष्टही होत नाही. निसर्गोपचारात, आम्ही लवकर रात्रीच्या जेवणाचा सल्ला देतो. त्यामुळे अधिक नाष्टा करण्याची गरजच उद्भवत नाही.

हे ही वाचा<< ‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; उन्हाळयात पुरुषांसाठी धोका कसा वाढतो, उपाय काय करावे? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

लक्षात ठेवा

तुम्ही काय खाता या बरोबरच तुम्ही किती खाताय हा मुद्दा लक्षात घ्यायलाच हवा. तुमच्या शरीराचे सिग्नल ऐकणे यासाठीच महत्त्वाचे आहे. तुम्हाला किती भूक लागली आहे याचा विचार करून मग त्यानुसार तुमचा स्नॅक्सचा प्रकार व प्रमाण ठरवा. दुपारी वेळेत जेवण केल्यास ही संध्याकाळची भूक तशीही कमी होते. एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेकदा भूकेच्या ऐवजी आपल्याला तहान लागलेली असू शकते. त्यामुळे काहीही खाण्याआधी एक ग्लासभर पाणी पिऊन शरीराचे संकेत ओळखा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why you should avoid eating between 4 to 6 pm what to eat when hungry in the evening to avoid skipping dinner health expert answers svs