Happy Holi 2019 : वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. मराठी वर्षातील हा अखेरचा सण. होळीनंतर १२ दिवसांनी गुढी पाडव्याला मराठी नववर्षाची सुरूवात होते. देशभरात होळीचा सण विवध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळी पूजन केले जाते. होळी पुजनाला आपल्याकडे शिमगा असेही म्हणतात. होली दहनानंतर पाचव्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते.
(आणखी वाचा : Holi 2019 : होळीला त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स )
या वर्षी होलिका पूजन २० मार्च रोजी आहे. या दिवशी सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी फाल्गून पौर्णिमा सुरूवात होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी संपेल. बुधवारी २० मार्च रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर होळी पेटवली जाईल. गुरूवार (२१ मार्च) हा दिवस धूळवड म्हणून साजरा केला जाणार आहे.बुधवारी सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होळी पूजन केल्यास हरकत नाही. परंतु, होळी प्रज्वलित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मुहूर्त हा रात्री ८.५६ नंतर आहे.
(आणखी वाचा : Holi 2019 : घरच्या घरी असे तयार करा नैसर्गिक रंग )
सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. ही एक प्रकारची अग्निपूजाच आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक होळी साजरी करताना झाडांची छाटणी करण्यापेक्षा पानगळ झालेली पानं, काट्या कुट्या एकत्र करून होळी साजरी करणं हितावह आहे. होळीची शास्त्रोत्र पूजा करून ती पेटवली जाते. त्याभोवती फिरून बोंबा मारल्या जातात. दुष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, याउद्देशाने शिमगा साजरा केला जातो. होळीनिमित्त घरोघरी पूरणपोळीचा नैवेद्य केला जातो.
रंग खेळताना डोळ्यांसाठी धोकादायक
- रंगातील चमकणारे पदार्थ डोळ्यात गेल्यास बुब्बुळ जखमी होऊ शकतो
- रंगाचे फुगे डोळ्यावर लागल्यास जखम होऊ शकते
- लेन्स लागलेल्या बुब्बुळावर फुगे लागल्यास ते सरकू शकते
- रंगात दूषित पाणी वापरल्यास त्यामुळे डोळ्यात जंतू पसरू शकतात
- ओल्या फरशीवरून पडल्यास डोळ्याला इजा होऊ शकते
घ्यायची काळजी
- रासायनिक रंगाचा प्रयोग टाळावा
- डोळ्याला इजा झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या
- डोळ्याच्या शेजारी रंग लागल्यास ते काढण्याकरिता क्रिमचा वापर करा
- चष्मा वा गॉगल लावून होळी खेळा
- होळीत डिस्पोसेबल कॉन्टेक्ट लेन्स घाला
- प्रवास करताना रेल्वे, बस वा चारचाकीचे काच बंद ठेवा