पायाची नखे आपोआप तुटत किंवा त्यांचा रंग बदलत असल्यास त्याकडे तातडीने काळजी घेण्याची गरज आहे, कारण त्यातून दुर्धर आजार निर्माण होण्याची भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नखांना वेदना होत असल्यास ती बुरशी-संसर्गाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. सध्या वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक चार जणांमागे तिघांना आणि युवा गटामध्ये प्रत्येक पाच लोकांमागे एकाला नखांच्या बुरशीचा त्रास होण्याचा संभव आहे. बुरशीचा संसर्ग हाताच्या बोटांनाही होऊ शकतो, मात्र बहुतांशी संसर्ग पायाच्या बोटांवरच आढळतो.
दलदल, पाणथळ अशा ठिकाणी सातत्याने फिरणे, तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, ओले आणि दलदलीत वापरलेले बूट सातत्याने वापरणे, अंगठय़ाच्या नखाशी जखम होणे आदी कारणांमुळे हा संसर्ग होत आहे. असा संसर्ग झाल्यास तेथे पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात आणि नंतर ते तपकिरी, पिवळे होऊ लागतात. नखे कधी अतिशय घट्ट अथवा पातळ, ठिसूळ होतात.
ज्यांना ‘टाइप टू’ मधुमेह असेल त्यांनी नखांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झालेल्या रुग्णांच्या नखांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. संसर्गाचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास अवयव कापण्यापर्यंत वेळ येते. नखांच्या बुरशीची काही वेगळी लक्षणेही आहेत. त्यामध्ये इनग्रोन टोनेल्स म्हणजे पायाची नखे आतमधील बाजूला वाढलेली असणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. दोन्ही बाजूंच्या कडा आणि टोक आतमध्ये गेलेले असल्याने त्वचा दुखू लागते. मोलानोमा हा अत्यंत दुर्मीळ असा त्वचेचा कर्करोग असतो, त्यामुळे नखाच्या आतील बाजूला काळसर दिसू लागते त्यामुळ नखांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
नखांना बुरशीचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास तातडीने शल्यविशारदांना ते दाखवून घेणे आवश्यक आहे. यात कालापव्यय झाल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पाय नेहमीच कोरडे आणि स्वच्छ ठेवण्याची नितांत गरज आहे.