Monsoon skin and hair care tips: पावसाळ्यात पाय खराब पाण्याच्या संपर्कात राहतात आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. रस्ते चिखलाच्या पाण्याने भरलेले असतात आणि बऱ्याच वेळा आपण त्या पाण्यातून चालतो. याशिवाय आपण ऑफिसमध्ये जाताना भिजलो तर दिवसभर जास्त वेळ ओले आणि घाणेरडे शूज घालून फिरावं लागतं. तसेच दुर्गंधीयुक्त पाय घेऊन दिवसभर फिरल्यावर घरी परततो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. अशा परिस्थितीत पावसाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

याशिवाय पावसाळ्यात बहुतांश लोकांना केस गळणे, कोंडा, डोक्यात फोड येण्याची तक्रार सुरू होते. अशावेळी पावसाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित कोणत्या मोठ्या समस्यांचा त्रास होतो आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

त्वचेची काळजी –

या काळात त्वचेची काळजी घेण्याची घेणं गरजेचं असतं. यावेळी सौम्य क्लिंजर वापरावे. याशिवाय तुम्ही त्वचेला पपई देखील लावू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर एक लहान चमचा पाण्यात लॅव्हेंडर तेल टाकून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेला आराम मिळतो.

एक्ने आणि ब्लॅकहेड्स –

पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे त्वचा तेलकट होते. ज्यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ, एक्ने आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढू लागते. हे टाळण्यासाठी आपण चांगले सॅलिसिलिक अॅसिड फेस वॉश वापरू शकता.

पाय स्वच्छ ठेवा –

पावसाळ्यात पाय नेहमी कोरडे आणि साफ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. पाय पूर्णपणे पुसून कोरडे करा. कारण ओल्या पायांमुळे अनेक समस्या उद्भवतात.पाण्यात कडुनिंबाची पानं घालून उकळा आणि नंतर या पाण्याने पाय धुवा. कडुनिंबातल्या अँटिबॅक्टेरियल गुणामुळे इन्फेक्शन वाढण्यापासून रोखता येतं.

हेही वाचा >> Skin care: त्वचेवर रोज लावा भेंडीचं पाणी, फरक पाहून विश्वास बसणार नाही; जाणून घ्या कसं बनवायचं

केस गळणे –

पावसाळ्यात केसांची काळजी घेणेही गरजेचे आहे. ओलावा, घाण आणि बॅक्टेरिया तुमच्या केसांकडे आकर्षित होतात, ज्यामुळे केस गळतात. अशा परिस्थितीत केस धुण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यात जास्त वेळ भिजणे टाळा. पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करावी. असे केल्याने शरीरावरील घाम, घाण आणि बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात साफ होतात.