आपल्यातील अनेक जण दैनंदिन कामांमुळे थकून जातात. या थकव्यावर नेमका काय उपाय करावा हे न कळाल्याने मग हा त्रास अंगावर काढला जातो. पण रोजची कामे करताना प्रसन्न राहणे शक्य आहे. त्यासाठी काही गोष्टींत नियमितता ठेवल्यास हे नक्कीच साध्य होऊ शकते. वजन कमी करणे, ताकद वाढवणे, शरीराची लवचिकता वाढवणे, त्वचा टवटवीत ठेवणे, त्याचबरोबर मन प्रसन्न ठेवणे व आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. दिवसातील सर्वाधिक काळ घराबाहेर असल्याने आपण ताजेतवाने राहण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान यांची नक्कीच मदत घेऊ शकतो. योग या गोष्टीकडे आजही फक्त व्यायाम प्रकार म्हणून पाहिला जाते. पण प्रत्यक्षात त्याहीपलिकडे जात योग हा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या आठ गोष्टींनी मिळून बनलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगाभ्यासात ‘जिवनशैली कशी असावी’ हे समजावले आहे. यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. योगाचे विविध प्रकार, प्राणायाम, सात्विक आहार, ध्यान याने जीवन सुखकर होते. योगासनांमुळे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. मन स्थिर होण्यास मदत होते. मनाची चंचलता, नकारात्मकता कमी होते. त्यामुळे २१व्या शतकातील ताणतणावांना आणि स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.

योग –

योगासने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. योग म्हणजे चित्त वृत्तीचा निरोध करणे. वृत्ती म्हणजे काय? त्यावर नियंत्रण ठेवायचे म्हणजे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्राणायाम (श्वसनाचा व्यायाम)

प्राण म्हणजे जीवन शक्ती, आयाम म्हणजे तिला नियंत्रित करणे, श्वासाची गती जर कमी केली तर आयुष्य तेवढे जास्त. ही श्वासाची गती जर कमी करायची असेल तर प्राणायाम करणे गरजेचे आहे. श्वास कसा घ्यावा, संथ श्वसन, दीर्घ श्वसन कसे करावे, कोणी व कधी करावे याला महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी प्राणायाम वेगवेगळे असतात. आपले शरीर अन्न,पाणी, याशिवाय काही काळ राहू शकते. पण प्राणवायूशिवाय नाही. जसे व्यायामाने शरीरावर सकारात्मक बदल घडतात. तसेच प्राणायामामुळे शरीर, मन आत्मा यामध्ये सकारात्मक बदल घडून ते बळकट होतात.

आहार –

आपण काय खातो, कसे व केव्हा खातो, याला जीवनशैलीमध्ये महत्त्व असायला हवे. कारण खाण्याचा शरीरावर तसेच मन व विचारांवर परिणाम होतो. जसे अन्न घेऊ तसे विचार घडत जातात. यामुळे आहारालासुद्धा तितकेच महत्त्व असायला हवे. आपण कुठल्या प्रदेशात राहतो, राज्य कोणते, तिथले हवामान कसे आहे, यावरून आपला आहार ठरतो.

विज्ञानाची प्रगती माणसाला सुखी करण्यासाठी होत आहे. पण त्याच्या अयोग्य वापरामुळे तो अधिक तणावपूर्वक आयुष्य जगत आहे. जग जास्त जवळ आले, माणसातील संवाद वाढले, लोक
एकमेकांशी जोडले गेले. जवळची माणसं लांब व लांबचे लोक जवळ आले. माणसांचे त्रास वाढले, कष्ट कमी झाले पण माणूस असमाधानी होत गेली. मनावरील ताण वाढला व त्याचा परिणाम शरीरावर, वाढते वजन, गुडघेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी अशा छोट्या त्रासापासून मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, त्वचेचे रोग, अल्सर, ऍसिडिटी असे अनेक विकार जडत जातात. म्हणजेच प्रत्येक व्याधीला ‘मन’ कारणीभूत असल्याचे दिसते. या सर्व त्रासासाठी आहार, विहार, व्यायाम, विचार यात बदल करणे आवश्यक असून योगाभ्यास हा या सगळ्यावरील उत्तम उपाय ठरु शकतो.

मनाली मगर-कदम

फिटनेसतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How yoga is useful for good health here are some important tips