How to control hunger : भारतीय संस्कृतीत नवरात्रीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रीत अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. या उपवासात खाण्यापिण्याच्या सवयींवर कडक नियंत्रण ठेवले जाते. कमी खाल्ल्याने आणि उपवास केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पोट रिकामे राहते. पण, उपवासादरम्यान कमी खाल्ल्यानेही जास्त भूक लागते. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. मग एकादशी अन् दुप्पट खाशी! ही म्हण आठवते. अशा वेळी भुकेवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. मात्र, आता काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत; ज्या फॉलो करून तुम्ही तुमची भूकदेखील नियंत्रित करू शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खूप पाणी प्या

उपवासाच्या वेळी भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने पोट भरलेले वाटते आणि त्यामुळे भूक कमी होते. पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासही मदत होते. लिंबू पाणी प्यायल्यानेही भूकही नियंत्रित राहते. त्यामुळे उपवासात भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

फळे खा

उपवासाच्या वेळी भूक नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरयुक्त फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. फळांमधील फायबर्स पचनक्रिया सुरळीतपणे चालू ठेवण्यास मदत करतात. फळांचे सेवन केल्याने पोट भरलेले वाटते आणि भूकही नियंत्रित राहते. फळे शरीराला हायड्रेट ठेवतात. त्याशिवाय फळांमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे उपवासात फायबरयुक्त फळांचे सेवन करावे.

प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका

उपवासाच्या वेळी बाजारात उपलब्ध असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे. जास्त साखर, खड्यांचे मीठ आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढून भूक वाढू शकते आणि जास्त खाल्ले जाण्याचा धोका असतो. मग त्यामुळेच लठ्ठपणा आणि वजन वाढणे यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

जास्त वेळ उपाशी राहू नका

जास्त वेळ उपाशी राहिल्याने शरीरात अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्याशिवाय जास्त वेळ उपाशी राहिल्याने अन्न खाऊनही भूक भागत नाही, सारखी भूक लागते. त्यामुळे उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जेची कमतरता भासू नये म्हणून आपण ठरावीक अंतराने काही ना काहीतरी कमी प्रमाणात खात राहिले पाहिजे.

हेही वाचा >> Health Special : नूडल्स कशासोबत खाव्यात? त्यात पोषणमूल्ये किती असतात?

चांगली झोप घ्या

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उपवासाच्या काळात चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास जास्त भूक लागते. जर आपण पुरेशी झोप घेतली, तर मन भुकेपासून दूर राहण्यास मदत करते. दुपारच्या वेळी थोडी झोप घेतल्यानेही भूक नियंत्रणात राहते. झोप शरीराला विश्रांती देते आणि भूक कमी करते.

सूचना : या लेखात नमूद केलेली पद्धत आणि सूचना अमलात आणण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you feel hungry during nine days of fasting how to control it navratri 2023 srk
Show comments