गणपती विसर्जनानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरु होतो हे आपल्याला माहित आहे. आपल्या कुटुंबातील मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्याची शांती करण्यासाठी हा कालावधी चांगला मानला जातो. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी ‘पक्ष पंधरवडा’ म्हणून पाळला जातो. घरातील व्यक्ती मृत पावल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. या काळात कोणतेही चांगले कार्य केले जात नाही. हा कालावधी यंदा २४ सप्टेंबरला सुरु होणार असून तो ८ ऑक्टोबरपर्यंत आहे. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निधन पावली तर आपण त्या व्यक्तीचे त्या तिथीला श्राद्ध करतो. मात्र काही कारणाने हे श्राद्ध करणे राहून गेले असेल तर या कालावधीत ते केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.
या कालावधीत केले जाणारे पींडदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. हे पिंडदान सकाळी किंवा रात्री करत नाहीत तर ते मध्यान्येला करणे योग्य मानले जाते. याचे कारण म्हणजे या वेळात सावली मागच्या बाजूला पडते. या काळात ब्राह्मणांना दिले जाणारे भोजन हेही चांगले दान समजले जाते. पितृपंधरवड्यात आपले पूर्वज आपल्या आसपास असतात आणि ते आपल्या सोबत अदृश्यपणे राहत असतात असेही म्हटले जाते. यावेळी करण्याचे सर्व विधी दक्षिण दिशेला तोंड करुन केले जातात. यामागेही शास्त्रीय कारण असल्याचे दिसते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेचे चक्र आपल्याला माहित आहे. पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासांचा मानला गेला आहे, पण जे मृत झाले, त्या जिवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र, तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते असे म्हटले जाते.