'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे समर्थांनी यथार्थपणे म्हटले आहे. वैद्यकीय शास्त्रानेदेखील आहाराला आरोग्यासाठी एक मूलभूत अंग मानले आहे. किंबहुना शास्त्रशुद्ध आहार हा आरोग्ययज्ञासाठी आवश्यकच आहे. यज्ञाची तयारी करण्यासाठी आणि तो झाल्यावर जशा काही गोष्टी धर्मशास्त्राप्रमाणे करायच्या असतात, तशाच आहाराबाबतसुद्धा आहेत. रोजच्या जेवणापूर्वी आणि जेवल्यावर काय करावे आणि काय करू नये, याबाबत वैद्यकीयदृष्ट्या काही संकेत पाळणे आवश्यक समजले जाते.जेवणानंतर काही विशिष्ट गोष्टी पाळल्यास नक्कीच उपयोगी ठरू शकतात. शतपावली करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात * जेवण झाल्यावर कमी वेगाने अर्धा ते पाऊण तास पायी पायी फिरून आल्यास, आपण केलेल्या आहारातील अन्नघटकांचे पचन सुरळीतपणे होऊ लागते. अशावेळी खूप भरभर चालण्याऐवजी थोडे थोडे थांबत पदभ्रमण करणे अपेक्षित असते. * साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात, जेवल्यावर घरात किंवा अंगणात शंभर पावले चालण्याचा घरोघरी प्रघात होता. अनेक लोक रात्री रामरक्षा म्हणत अंगणात येरझारा घालत असत. भोजन झाल्यावर हे चालणे म्हणजेच शतपावली. * दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही जेवणांनंतर शतपावली केल्यास फारच उत्तम. आजच्या धावपळीच्या जीवनातसुद्धा, दुपारी लंच अवरमध्ये जेवण झाल्यावर थोडेसे म्हणजे शंभर पावले फिरून येणे अजिबात अवघड नाही. ऑफिसच्या भोजन समयात चालून आल्यास त्यानंतरच्या उर्वरित वेळात कामातली दक्षता आणि उरक वाढण्यास नक्कीच मदत होते. शतपावली भरभर चालून करायची नसते. सावकाश आणि जास्तीतजास्त १०-१५ मिनिटे चालणे उत्तम असते. शतपावलीचे फायदे १. शतपावली केल्यावर आपल्या मेंदूतून ‘एंडॉर्फिन’ नावाचे संप्रेरक स्त्रवते. या एंडॉर्फिनमध्ये निसर्गतः वेदना सहन करण्याची आणि ताणतणावाला सामोरे जाण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे एक आनंदी आणि समाधानी मूड तयार होतो. २. शतपावली केल्यावर जठरातील अन्न लहान आतड्यामध्ये सरकते आणि पचनक्रियेचा वेग वाढतो. ३. करपट आणि आंबट ढेकर, पोटातला गुबारा, पोटातील आम्लता असे त्रास ज्यांना नियमित होतात त्यांचे हे त्रास नियंत्रित होण्यास मदत होते. ४. जेवणानंतर शतपावली केल्यामुळे शरीराच्या १०० कॅलरीज खर्च होऊन वजनवाढ आटोक्यात राहते. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यांचे नियंत्रण सोपे राहते. ५. रात्री भोजनोत्तर शतपावली केल्यास वेळेवर आणि शांत झोप लागते. ६. चालताना काही विचार, काही समस्या मनात असतील त्यांची उकल होऊ शकते. ७. दुसऱ्या दिवशीच्या कामांची आखणी मनातल्या मनात करता येते, त्यामुळे वेळेचे नियोजन होण्यास मदत होते. डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन