Karishma Kapoor Lost 25 Kgs: लहान लहान बदलच मोठा फरक घडवून आणतात असं म्हटलं जातं, आज आपण अशी एक कहाणी पाहणार आहोत ज्यात हे वाक्य अगदी खरं सिद्ध होतंय. २०१५ मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्यासह आपल्या डाएटविषयी चर्चा करत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. अलीकडे या व्हिडिओची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. करिश्माने आपल्या आहारात अगदी साधे- सोपे व लहानसे बदल करत एक दोन नव्हे तर चक्क २५ किलो वजन कमी केल्याचे या व्हिडिओमध्ये सांगितले होते. अनेकांना असं वाटतं की हे सेलिब्रिटी तर उगाच वाढवून सांगतात यांचं डाएट म्हणजे आपल्याला झेपणार नाही, नुसती फळं खाऊन वगैरे राहताच येणार नाही, तुमच्याही डोक्यात हा विचार आला असेल तर करिश्मा कपूरचं मच्छी कढी व भाताचं डाएट तुम्हाला नक्कीच थक्क करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मच्छी कढी व भाताने वजन केले कमी

रुजुता दिवेकर यांनी आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये करिश्माने सांगितले होते की, “मी रोज रात्री मच्छीचा सार व भात खाऊन २५ किलो वजन कमी केलं आहे. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगते तेव्हा प्रत्येकजण मला विचारतो की रात्रीच्या वेळी कार्ब्स खाऊन वजन कमी करणं कसं शक्य आहे. पण तू (रुजुता) मला आवडीचे पदार्थ कसे खावेत हे शिकवलं आहेस, कार्ब्स खाऊन वजन कमी करायची योग्य पद्धत मी तुझ्याकडून शिकलेय. आता हीच माझ्या जगण्याची पद्धत झाली आहे आणि मी जिथे जाईन तिथे याविषयी लोकांना माहिती देतेच. मला असं वाटतं की लोकांनी स्वतःला उपाशी ठेवू नये, लिंबू आणि कसलीतरी पानं घालून पाणी प्यायल्याने कदाचित वजन कमी होईल पण ते पुन्हा वेगाने वाढूही शकतं. त्यामुळे वजन कमी करतानाच पद्धत लक्षात घेणं गरजेचं आहे “

पुढे करिश्माने तिच्या आवडत्या नाष्ट्याविषयी सांगत म्हटले की, “भरपूर मिरच्या घातलेले पोहे मला खूप आवडतात. आपल्याला अनेकदा वजन कमी करायचं म्हणजे उकडलेल्या भाज्या, गाजर, काकडी एवढंच खायला मिळेल असं वाटतं पण तुम्ही घरगुती पदार्थ खाऊन सुद्धा फिटनेस राखू शकता. केळी व चिकूसारखी फळं जी सहसा वजन वाढवण्यासाठी म्हणून ओळखली जातात ती तुम्हाला तणावात असताना किंवा कामात गुंतलेले असताना ऊर्जा देण्याचे काम करतात. याने पोट भरल्यासारखे वाटून वारंवार खाण्याचे प्रमाण कमी होते. “

डाएटविषयी तज्ज्ञ काय सांगतात?

करिश्मा कपूरच्या या आहाराविषयी पोषणतज्ज्ञ नुपूर पाटील यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, रात्रीच्या जेवणासाठी मच्छी व भात असे घरी शिजवलेले पदार्थ खाणे हे मुख्यतः तुमचा आहाराच्या बद्दल आरोग्यदायी व संतुलित दृष्टिकोन दर्शवतो. मात्र याच पद्धतीचा आहार प्रत्येकाला फायद्याचा ठरेल असे नाही, कारण व्यक्तिपरत्वे पदार्थांचा प्रभाव बदलत असतो. पाटील यांनी नमूद केले की भाज्यांचे सेवन वाढवणे, प्रथिनांचा पातळ स्त्रोत निवडणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ व साखरयुक्त पेये कमी करणे यासारख्या बदलांचा एकूण आरोग्याला हातभार लागू शकतो.

हे ही वाचा<< रिकाम्या पोटी ‘या’ पाच भारतीय पदार्थांचं सेवन केल्याने प्रत्येक सकाळ होईल सुंदर; पोट स्वच्छ होत नसेल तर पाहाच

दुसरीकडे, डॉ विकास जिंदाल, सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, सीके बिर्ला हॉस्पिटल दिल्ली यांनी सांगितले की, “खूप तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि साखर नसलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा काही वेळा कृत्रिम गोडवा आणला जातो याकडे सुद्धा लक्ष द्या.” तसेच डॉ. चावला यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “कार्बोनेटेड शीतपेये, तसेच काही फळे जसे की सफरचंद, नासपती यात आढळणारे फ्रुक्टोज तुमच्या पोटात अधिक हवा भरतात. त्यामुळे याकडे लक्ष द्यायला हवे.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karishma kapoor lost 25 kgs weight by eating machhi kadhi rice every night rujuta divekar on how to eat carbs benefits of poha svs
Show comments