‘तंत्रज्ञान शाप की वरदान’ असे म्हणण्याची वेळ सध्या आली असून इंटरनेटच्या आहारी गेलेल्या तरुणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामार्फत मनोविकास प्रकल्पांतर्गत व्यसनमुक्ती केंद्र पुण्यात सुरू करण्यात आले आहे. यासाठी संस्थेने सर्वेक्षण केले होते. त्यानुसार १६ ते २२ वयोगटातील तरुण इंटरनेटच्या सर्वाधिक आहारी गेल्याचे समजले आहे. ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे आनंदवन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे म्हणाले. या समस्येकडे समाजातील प्रत्येकाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
याविषयी सांगताना डॉ.दुधाणे म्हणाले, देशभरात इंटरनेटच्या आहारी जाणार्या तरुणाची संख्या मोठी आहे. पुण्यासारख्या शहरातही अशा तरुणांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या माध्यमातून शहरातील २७७ व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून १६ ते २२ या वयोगटातील तरुण इंटरनेटचा आधिक वापर करीत असल्याची माहितीपुढे आली आहे. मोबाइल आणि इंटरनेटचा वापर करणार्यांमध्ये लहान मुले, महिलांचे प्रमाण अधिक आहे. भविष्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट होत आहे. आपण सगळे इंटरनेटच्या जाळ्यात ओढले गेलो आहोत. मुले इंटरनेटचा वापर कशासाठी करतात याकडे पालकांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.
आपल्या इंटरनेट व्य़सनमुक्ती केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग विनामूल्य आहे. केंद्रात ई-व्यसन, ब्रेन फिडबॅक, ध्यान, समुपदेशन, किशोरवयीन मुलांच्या समस्या, भिती-नैराश्य, अस्थिरता या विषयावर तज्ज्ञ काम करीत आहेत असे डॉ. दुधाणे यांनी सांगितले. याशिवाय संस्थेतर्फे विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये इंटरनेट व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.