Indians to Motorcycle Round the World : पाऊस, बाईक आणि मित्रांबरोबर अचानक ठरणारे ‘लाँग बाईक राईड्स’ प्लॅन्स. या सगळ्या गोष्टी आजच्या इंटरनेट विश्वात किती सहज सोप्या वाटतात. बाईकवरून गूगल मॅप्सच्या मदतीने रस्ते शोधत देशभरात बाईक घेऊन प्रवास करणारे अनेक जण असतात. मात्र, आपल्या भारतात अशा प्रकारच्या प्रवासाच्या ट्रेंडची सुरुवात कोणी केली माहीत आहे का?

चार मित्र, दोन बाईक्स आणि तब्ब्ल एक लाख सात हजार ८२६ किलोमीटर अंतराची भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मोटारबाईक राईडची सुरवात २९ जानेवारी १९७१ रोजी झाली होती. त्यांच्या प्रवासाला जवळपास ५३ वर्षे लोटली आहेत. सुभाष शर्मा, संपूरण सिंग, मनमोहन सिंग आणि अशोक खैर अशा या चार मित्रांची नावे होती. सध्या आपण कुठेही आंतरराष्ट्रीय सहलीसाठी, भटकंतीसाठी जायचे म्हटले की सर्व माहिती आपल्याला इंटरनेटवरून सहज उपलब्ध होते. अनेकांकडे पासपोर्ट तयार असतात.

परंतु, १९७० च्या काळात सामान्य नागरिकाकडे पासपोर्ट असणे फारच दुर्मीळ गोष्ट असे. त्याकाळी पासपोर्ट ही गरज नसून, तो विशेषाधिकार होता. त्यामुळे सुभाष शर्मा आणि त्यांच्या मित्रांना सर्व गोष्टींची सुरुवात अगदी शून्यापासून करावी लागणार होती. भारतातून पहिली आंतरराष्ट्रीय मोटारबाईक राईड करणाऱ्या सुभाष शर्मा आणि त्यांच्या मित्रांचा थोडक्यात प्रवास पाहू.

हेही वाचा : रस्टी स्पॉटेड अन् दुर्मीळ ब्लॅक फुटेड शिकारी मांजरी! जगातील सर्वात लहान मनीमाऊबद्दल माहिती पाहा

मोटारबाईक राईड करण्याची सुरुवात

भारतातील जमशेदपूरमध्ये १९६९ साली सुभाष शर्मा त्यांच्या मित्रांसह चहा पित बसले असताना, आपण ‘बाईकवरून जग फिरावं’ असा विचार सुभाष यांच्या मनात चमकला, असे सुभाष शर्मा यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल लिहिलेल्या लेखावरून समजते. त्या काळात असेही काही होऊ शकते हा विचारच प्रचंड नवीन आणि अनोखा होता. परंतु, मनात हा भन्नाट विचार आल्यानंतर, सुभाष यांनी या प्रवासाबद्दल थोडा अभ्यास केला आणि त्यांच्या मित्रांसमोर मांडला. तेव्हा सुभाष या मोटारबाईक राईडबद्दल गंभीर असल्याची जाणीव त्यांच्या मित्रांना झाली आणि तेदेखील या प्रवासासाठी तयार असल्याची सहमती त्यांनी दर्शविली.

प्रवासाची तयारी

सुभाष आणि त्यांच्या मित्रांच्या नियोजनानुसार, बाईक घेऊन पहिले भारतातून पाकिस्तानात जायचे आणि त्यानंतर अफगाणिस्तान, इराण पार करून तब्ब्ल ६० देश फिरण्याचा विचार होता. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण १८ महिन्यांचा कालावधी लागणार होता. परंतु, ध्येय साध्य करण्यासाठी आधी भारतातून बाहेर कसे पडायचे असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.

सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सुभाष यांना समजले की, त्यांच्या प्रवासासाठी प्रत्येकाकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे. मात्र, त्याकाळात पासपोर्ट मिळवणे सोपे काम नव्हते. अनेक अधिकाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना भेटून सुभाष यांनी त्यांच्या प्रवासाचे कारण समजावून सांगितले. शेवटी दोन रात्रींचा रेल्वेप्रवास करून, सुभाष यांनी नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाला भेट दिली. तिथे त्यांनी प्रवासाचे कारण, त्यांचे नियोजन या सर्व गोष्टी व्यवस्थित एका लेखी पत्रात स्पष्ट करून पाठवले. अथक परिश्रमानंतर अखेरीस त्यांना पासपोर्टसाठी मान्यता मिळाली.

प्रवासाचा मार्ग आणि आवश्यक गोष्टींची जुळवाजूळव

सध्या प्रत्येक ठिकाणचा एका क्लिकवर उपलब्ध असणारा गूगल मॅप त्या काळात अस्तित्त्वातही नव्हता. संपूर्ण प्रवास योग्य मार्गाने करण्यासाठी सुभाष आणि त्यांच्या मित्रांना आंतरराष्ट्रीय नकाशाची आवश्यकता होती. हा नकाशा मिळवण्यासाठी सुभाष कोलकातामधील अमेरिकन माहिती केंद्रात पोहोचले. तिथे त्यांना त्यांच्या प्रवासातही आवश्यक असणारे नकाशे मिळाले, परंतु त्यांना ते तिथून घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सुभाष यांनी त्यांना हव्या असणाऱ्या रस्त्यांचा मार्ग, नकाशे कागदावर उतरवून घेतले. मोटारबाईक प्रवासासाठी आता नकाशे तयार होते.

प्रवासाच्या या खटाटोपादरम्यान सुभाष यांच्या मित्रांमधील एका मित्राने या नियोजनातून बाहेर पाडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना अजून एका साथीदाराची आणि प्रवासासाठी बाईकची आवश्यकता होती. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने प्रवासातही दोन उत्तम बाईक्स त्यांच्याजवळ असणे गरजेचे होते. यासाठी त्यांनी रॉयल एन्फिल्ड नेण्याचा विचार केला. बाईकसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी सुभाष आणि त्यांच्या मित्रांनी टेल्को क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट दिली. मात्र, त्यांनी सुभाष यांच्या विनंतीला नकार दिला. टेल्कोमधील मनमोहन सिंग नावाच्या एका अधिकाऱ्याने सुभाष आणि त्यांच्या मित्रांसह या प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला. मनमोहनसिंग यांकडे स्वतःची १९६७ ३५० रॉयल एन्फिल्ड बुलेट होती. एका बुलेटचा जुगाड झाल्यांनतर, त्यांनी दुसरी बुलेट लष्कराच्या एका लिलावातून घेतली. अशा प्रकारे भारतातील पहिले चार बाईक रायडर्स आंतरराष्ट्रीय मोटारबाईक राईडसाठी सज्ज झाले.

बुलेटवरून कोणकोणत्या देशांना भेट दिली?

२९ जानेवारी १९७१ रोजी टेल्को ऑफिससमोर शंभरएक कर्मचाऱ्यांनी सुभाष शर्मा, मनमोहन सिंग, संपूरण सिंग आणि अशोक खैर यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सुभाष आणि त्यांच्या मित्रांनी सकाळी ९ वाजता प्रवासाची सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यात भारत-पाकिस्तानातील निर्माण तणावामुळे दोन्ही देशांनी आपल्या सीमा प्रवासासाठी बंद केल्या होत्या. त्यामुळे या रायडर्सनी तातडीने मुंबईकडे धाव घेतली. नशिबाने त्यांना मुंबई ते कुवेत अशा जहाजात जागा मिळाली. अशा प्रकारे, चौघांची समुद्रप्रवासाने आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात झाली.

पुढे बाईकवरून त्यांनी कुवेत ते इराक, इराण, तुर्कस्थान, सीरिया, जॉर्डन असे देश गाठले. नंतर आफ्रिका खंडातील नाईल नदीसह नयनरम्य प्रवास करत, वाळूच्या विस्तृत प्रदेशात म्हणजेच, सहारा वाळवंट येथे आपले भारतीय रायडर्स पोहोचले. विविध देशांना भेट देत, आफ्रिका खंडाची सफर संपवून सुभाष आणि त्यांचा मित्रपरिवार युरोपातील स्पेन, फ्रांस आणि इटलीसारख्या सुंदर देशात पोहोचले.

मात्र, या चौघांपैकी कुटुंबापासून खूप काळ लांब राहिल्याने, संपूरण सिंग आणि अशोक खैर यांनी आपला परतीचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला; तर सुभाष शर्मा आणि मनमोहन सिंगने ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी त्यांचा पुढील प्रवास चालू ठेवला. पूर्व युरोप फिरून झाल्यावर ते दोघे डिसेंबर १९७१ साली युनायटेड किंगडमला पोहोचले आणि तिथून त्यांनी अमेरिका गाठायचे ठरवले. शेवटी एप्रिल १९७२ साली अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आपल्या या मोटारबाईक राईडचा शेवट करायचे ठरवले. १० जुलै १९७२ साली सुभाष शर्मा आणि मनमोहन सिंग दोघेही भारतात परतले.

प्रवासातील अनुभव

१९७० च्या दशकात बाईकवरून फिरताना या भारतीय रायडर्सना असंख्य गोष्टींचा सामना करावा लागला होता. विविध देशांच्या सीमारेषा ओलांडणे, इथियोपियातील देशांतर्गत युद्ध, प्रदेशासह होणारे वातावरणातील बदल, हवामान, प्रवासादरम्यान गाड्यांमधील बिघाड अशा नानाविध गोष्टींनी प्रवासात अडथळे आणले होते. मात्र, या प्रवासातून त्या चौघांनाही आयुष्यभरासाठी आठवणीत राहतील असे सुंदर अनुभव अनुभवायला मिळाले होते. असंख्य नवीन लोकांशी ओळख झाली होती. संस्कृती, परंपरा पाहायला मिळाल्या. इतकेच नाही तर त्यांच्यातील प्रत्येकाला आयुष्याबद्दल नवीन दृष्टिकोन मिळला होता.

सध्याचे अशा रायडिंग प्रवासाच्या बदलत्या स्वरूपाबद्दलदेखील सुभाष शर्मा यांनी आपल्या लेखात लिहिले आहे. त्यानुसार “आत्ताची तरुण पिढी कशाही प्रकारे प्रवास करत असले तरीही इतर समाजास समजून घेणे, इतर संस्कृती आणि परंपरांची ओळख करून घेण्यासाठी मात्र असे प्रवासच अविस्मरणीय अनुभव देऊ शकतात. मी जर अजून थोडा तरुण असलो असतो आणि साठीत असतो, तर मी या सर्व गोष्टी पुन्हा करण्यासाठी एका पायावर तयार असतो”, असे त्यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे.