आकाशात उंच उंच उडणाऱ्या पक्ष्यांचं आकर्षण सर्वानाच असतं.. मला या पक्ष्यासारखं आकाशात उडता आलं असतं तर किती छान झालं असतं.. असं प्रत्येकाला वाटतं. चिमण्या विहारापासून गरुडाच्या गगनभरारीपर्यंतचा पक्ष्यांचा उडण्याचा आवाका प्रचंड असतो.. तो मनाला भुरळ घालतो..रानावनातून भटकताना मध्येच चित्रविचित्र आवाज काढणारे आणि आपल्या नयनरम्य रंगांनी मन मोहून टाकणारे पक्षी, त्यांच्या आकाराने, आवाजाने, रंगाने, लकबीने आपले लक्ष वेधून घेतात.

पक्षी निरीक्षण हा अनेकांचा छंद असतो. पण त्याच्या यशाचा प्रवास संयम आणि शिस्तीच्या वाटेवरून पुढे जातो. पक्षी कुठले. िपजऱ्याला नाही बरं का? अगदी स्वच्छंदपणे निसर्गात विहरणारे.. आपल्या भरदार पंखांनी आकाशाला कवेत घेणारे.  आपल्या पिसाऱ्याने, डोक्यावरच्या तुऱ्याने, रंगीबेरंगी शेपटय़ाने मनाला मोहून टाकणारे..

एकदा पक्षी निरीक्षणाची सवय लागली की ऋतुमानानुसार त्या त्या स्थळी असलेले आणि पाहुणे म्हणून येणारे असे दोन्ही पक्षी आपल्या परिचयाचे होऊन जातात. पहिल्या वर्षी दिसलेल्या पक्ष्यांमध्ये नव्या पक्ष्याची भर पडली तर आनंद होतोच, पण एखादा जुना पक्षी पुन्हा त्याच जागी भेटला नाही तर त्यांच्या अस्तित्वाची काळजीदेखील वाटायला लागते.

पक्ष्यांची संख्या कमी-जास्त होणं हादेखील एक अभ्यासाचा विषय होतो. जो फक्त पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्यायला जातो तो कदाचित पहिल्यांदा पाहिलेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवणार नाही, पण खऱ्या अर्थानं पक्षी निरीक्षणातून संशोधनात्मक दृष्टी विकसित करणारा माणूस या नोंदी नक्कीच ठेवतो. मग तो पाण्यावरचे पक्षी, शेतातले पक्षी, शहरातले आणि जंगलातले पक्षी अशा वेगवेगळ्या दृष्टीने त्यांचे विश्लेषण करतो.. त्यांचा आवाज कानात साठवून ठेवतो. त्यावरून तो त्या पक्ष्यांना ओळखायलादेखील शिकतो.. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यत माळढोक पक्षी अभयारण्य आहे. अहमदनगर-औरंगाबादच्या मार्गावर जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर, रायगडमध्ये कर्नाळा, धुळ्यात अनेर डॅम, बीडमध्ये नायगाव मयूर अभयारण्य आहेत.

सातपुडा समृद्ध आणि दुर्मिळ अशा वनराईने नटलेला आहे. पूर्णा, तापी नद्यांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर गवताळ, झुडपांचा भाग असल्याने अनेक तृणभक्षीय प्राणी या भागात आहेत. याच सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी शिरपूरपासून १६ किलोमीटरवर मुंबई -आग्रा रस्त्याला लागून साग, अंजन, पळसाच्या झाडांची दाटी आहे. अरुणावती नदीच्या पाणलोट क्षेत्रानजीकचे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने १९८६ मध्ये ‘अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित केले.

उंच अशा सातपुडा पर्वतरांगांनी घेरले गेलेले आणि शुष्क पानगळीच्या आणि खुरटय़ा काटेरी वनांसाठी ओळखले जाणारे हे अभयारण्य ८२.९४० चौ.कि.मी क्षेत्रात पसरले आहे.

अभयारण्यात प्रामुख्याने साग, अंजन, पळस, धावडा, बाभूळ, हेंकळ, चिंच, मोहा, आवळा, आपटा, सलई  या वृक्ष प्रजाती असून जैवविविधतने संपन्न असा हा प्रदेश आहे.  कोल्हा, भेकर, खार, मोर, चिंकारा, सुगरण, कोकिळा, घुबड, ससा, तित्तर, बटेर, गिधाड, सुतारपक्षी, मना, मुंगूस, कोब्रा, सायाळ, घोरपड, मन्यार, सरडा, लांडगा, अस्वल, हॉर्नबिल, पाणकोंबडी, रानडुक्कर, बगळे, तडस अशा प्राणी आणि पक्ष्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. शिवाय स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची खूप मोठी संख्या या अभयारण्यात आढळते.अभयारण्यात महाराष्ट्राचे राज्यपक्षी ‘हरियाल’देखील आहे. अभयारण्यामध्ये कडरागड येथे अखंड दगडात कोरलेल्या गुंफाही आपले लक्ष वेधून घेतात. येथील बगीचा सुरेख आहे. बोटिंगच्या सुविधेसह सनसेट पॉइंटवरून मावळत्या दिनकराचे होणारे दर्शन विलोभनीय आहे. निसर्ग पाऊलवाटावर तयार केलेले नक्षत्र वन, चिरंजीव वनही पाहण्यासारखे आहे. पर्यटकांसाठी बोटीची सुविधा उपलब्ध आहे.

कधी जाल?

फेब्रुवारी ते सप्टेंबर हा अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे. धुळे येथून शिरपूर येथे जाण्यासाठी दर अध्र्या तासाला बससेवा उपलब्ध आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे -drsurekha.mulay@gmail.com