परतवाडय़ावरून मेळघाटच्या जंगलात जाण्यासाठी दोन प्रचलित मार्ग आहेत, पहिला धामणगाव गढीमाग्रे चिखलदरा व दुसरा सेमाडोह माग्रे धारणी. धारणी रस्त्यावरून घटान्ग गावावरूनदेखील चिखलदरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. धामणगाव गढीमार्गे जाणारा रस्ता हा वापरातला आणि कमी अंतराचा आहे. धामणगाव गढीच्या पुढे लगेच घाट वळणाचा व कठीण चढणीचा रस्ता सुरू होतो. पहिली चढण संपली की सपाटीवरचे मनभंग गाव ओलांडून पुढे निघालो की पुन्हा चढण सुरू होते अन् काही वेळातच एका वळणावर आडनदी गावाचा फाटा लागतो. फाटय़ापासून गावापर्यंत डांबरी सडक आहे. खोलगट दरीत सपाटीवर वसलेले गाव, भोवतालची शेती, गावापर्यंतचा उतरणीचा नागमोडी हे सारे फाटय़ावरील नजरेच्या एका टप्प्यात दिसून येते. गावात प्रवेश करण्याआधी नदी आडवी येते म्हणून या नदीचे नाव आडनदी आणि गावालादेखील तेच नाव पडले आहे. गावातून एखादा मार्गदर्शक शोधायचा आणि नदीच्या काठाने पदभ्रमण सुरू करायचे. वाटाडय़ाशिवाय गेलात तरी नदीच्या सोबतीने दोन्ही बाजूंनी उंच डोंगरांमधून जाणारा रस्ता तीनेक तासात कलालकुंड धबधब्याजवळ घेऊन जातो. मात्र त्यासाठी तब्बल पाच वेळा तीच नदी पुन्हा पुन्हा ओलांडावी लागते. चार वेळा नदी ओलांडून झाली की आजूबाजूचे डोंगर हळूहळू जवळ येत असल्याचा भास होतो व पुढे डोंगर उंच व दरी अगदी अरुंद होऊन जाते. मोठाल्या दगडी शिळावरून मार्ग काढत कधी पाण्याचा प्रवाह ओलांडत आणखी एक वळण घेतले की समोरचे दृश्य पाहून अचंबित होऊन जातो. दोन्ही बाजूंनी प्रचंड उंच दगडी कडे व त्यामधून वाट काढत पावसाळ्यात कोसळणारा संपूर्ण प्रवाह अंगावरच येतो. घोंगावणारा आवाज व दूपर्यंत उडणारे तुषार प्रथम भीतीदायक जाणवतात. हा धबधबा जेथे कोसळतो तेथे खोल डोह तयार झाल्यामुळे पाण्यातून पुढे वाट काढत जाणे अशक्य होऊन जाते. या खोल डोहामुळे या धबधब्याखाली जाता येत नाही. धबधब्याच्या डोक्यावर जाण्यासाठी बाजूंच्या उभ्या दगडावरून, झाडाझुडपांमधून वाट काढत पुढे जावे लागते. कधी दोर (रोप) वापरून तर कधी एकमेकांना हात देत वर चढण्यास अर्धा तास लागतो. वर चढून गेल्यावर तेथील दृश्य अप्रतिम असे आहे. नदी उंचच उंच कडय़ांच्या मधून चिंचोळ्या जागेतून दाट झाडीतून वाहत येते.वेगाने कोसळणाऱ्या नदीचा घोंघावणरा आवाज हे सारे त्या गुढतेत भरच टाकते. सभोवार नजर टाकली की त्या दरीचे सौंदर्य पाहून मन मोहून जाते. कलालकुंडच्या माथ्यावर थोडा वेळ थांबून पोटपूजा करावी आणि बाकादरीकडे निघावे.
नदीतून वाट काढत मोठाले दगड ओलांडून पुढे गेल्यावर नदी व दरी डावीकडे वळताना दिसते. त्या वळणावरचे खोल पाणी व दोन्ही बाजूचे कातळ आपली वाट रोखून धरतात. येथे प्रस्तरारोहणाचे कसब अजमावायला लागते. पुढे दोर बांधून मग उरलेल्यांनी हे ४०-५० फुटांचे अंतर पार करायचे. पुढे थोडय़ाच अंतरावर नदी ओलांडल्यावर पाण्याचा कोसळण्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा आपण बाकादरीच्या टोकावर असलेल्या धबधब्याजवळ पोहोचल्याची जाणीव होते. परंतु धबधबा मात्र दिसत नाही. आणखी थोडे चालून गेलो की दरी संपते अन् साहजिकच उजवीकडील खोलगट घळीत नजर जाते. बाकादरी नावाने परिचित असलेला हा धबधबा जेथे कोसळतो त्या दरीत पोहोचता येत नाही. मात्र दुरूनच झालेले त्याचे दर्शन अधिकच मोहून टाकते.
परतीच्या वाटेवर आतापर्यंत लागला तेवढाच वेळ लागतो. दरीतून बाहेर पडण्यास येथून दोन वाटा आहेत, एक म्हणजे आल्या वाटेने आडनदी गावापर्यंत जाणे किंवा बाकादरीच्या लगत असलेल्या वळणावरील एका घळीतून दोर लाऊन थेट बेला गावाजवळच्या पठारावर जाणे. बेला गाव हे बाकादारीलगतच्या पठारावर वसलेले आडवाटेवरचे एक गाव असून या गावात घटांग चिखलदरा रस्त्यावरील सलोना व मासोंडी गावांच्या मधील फाटय़ावरून जाता येते.
सप्टेंबर उत्तम
बाकादरीत कोसळणारी नदी किंवा नाला हा चिखलदरा ते घटांग रस्त्यावरील मासोंडी या गावाजवळून वाहत येतो. चिखलदरा पठारावर जर अचानक पाऊस झाला तर या नाल्यास लोंढा येतो. अशा वेळी बाकादारीत कुठेही असल्यास अडकून पडण्याची किंवा नदीचा स्तर अचानक वाढल्यामुळे वाहून जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून या ठिकाणी शक्यतोवर सप्टेबर किंवा त्यानंतरच जावे. तसेच प्रस्तरारोहणाची साधनसामग्री बरोबर असणे आवश्यक आहे. दोर, इतर संबंधित साहित्य व अनुभवी व्यक्ती सोबत असल्याखेरीज जाऊ नये.
डॉ. जयंत वडतकर – jayant.wadatkar@yahoo.co.in