परवा परवाच दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असे करण्यात आले. मागे बॉम्बेची मुंबई झाली. मद्रासचे चेन्नई झाले. लहान-मोठय़ांच्या तोंडी असलेले व्ही.टी. (व्हिक्टोरिया टर्मिनस) सी.एस.टी. (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) झाले. मराठवाडा विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झाले आणि पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नामांकन मिळाले. कधी सहजरीत्या आनंदाने तर कधी धरणे आंदोलने करून हे बदल घडले. घडवले जातच राहतील. पुरातन नावे, विशेषत: ऐतिहासिक नावे बदलण्यामागे कधी काळी आपल्या अस्मितेला डागाळणाऱ्या पराभवाचा, एक पराभूत मनोवृत्तीचा आविष्कार असतो. बदला घेण्याची भावना असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामाजिक दृष्टीने आपल्या नेत्याला योग्य प्रतिष्ठा मिळाली नाही म्हणून त्याच्या नावाचा आग्रह धरला जातो. तसा खटाटोप होतच राहतो. चळवळी होतात. नवीन नामकरण करते वेळी तर राजकीय लाभ उठवण्यासाठी दुसरा कुठलाही संदर्भ विचारात न घेता सर्रास त्याच त्याच नावाचा जयघोष होतो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे कित्येकांनी सुचवूनसुद्धा न्हावा-शेवा बंदराला शिवाजी महाराजांच्या आरमारप्रमुखाचे- कान्होजी आंग्रे – यांचे नाही दिले गेले.

तसे तर नाव ठेवण्याची वा बदलण्याची आपली सांस्कृतिक परंपरा आहे. पाळण्यात ठेवण्यात येणाऱ्या नावापासून ते सासरी जाताना बदलून मिळणाऱ्या नावापर्यंत याचे गोडवे आहेत. आजही ‘प्रथमच माहेरी आली आहेस नाव घे पाहू’ असा आग्रह होत असतो. आणि मग काव्यमय उखाणे रंगतात. त्यासाठी आजही कुणा वृद्धेला ‘आजी, आता तुम्ही हं..’ असं म्हटले की आजीच्या चेहऱ्यावरचे भाव गतआठवणीने उजळून निघतात. सुरकुतलेल्या त्या चेहऱ्यावर लाजरं स्मित उमटतं..

नावाचा वापर मराठी भाषेत बहुविवधतेने होतो आहे. नावात धाक आहे. नावात वचक आहे, दरारा आहे. शोले सिनेमामध्ये उगाच नाही गब्बरसिंग म्हणत की मूल झोपेनासे झाले तर त्याची आई बजावते ‘बेटा सो जा नहीं तो गब्बर आयेगा.’ पूर्वी बागुलबुवा यायचा. मुला-मुलांच्या भांडणात हमखास ऐकू येणारी गोष्ट म्हणजे ‘माझे नाव घेऊ नकोस सांगून ठेवतो तुला! आत्ताच तुला हा गंभीर इशारा देऊन ठेवतोय! नीट ऐक हा  गंभीर इशारा!’

तसे तर ‘नावलौकिक हा शब्दच कसा भरजरी वाटतो. पोराने चांगले नाव कमावले हो. वाडवडिलांचा नावलौकिक वाढवला किंवा उलटपक्षी कारटय़ाने बापाच्या नावाला काळिमा फासला वगैरे. सगळं कसं नावाभोवती फिरत असतं.

तरीही तुम्ही असे कसे म्हणता, की नावात काय आहे म्हणून?

अहो सगळे आहे

सगळे काही

रंग आहे रूप आहे

गंध आहे स्वाद आहे

आहे उन्मादही.

नाही काय हेच कळत नाही.

विचारा कुणाही सौदामिनीला

नावात केवढी जादू आहे

शेरी आहे शाम्पेन आहे

हातभट्टीची मज्जा आहे

आज तर सगळे जगणे नावातच. त्यातच शिवाजी आहे. शिवाजी महाराज आहेत. शिवरायाचा प्रतापसुद्धा आहे. झालेच तर बाबासाहेबांचा बुद्धिभेदही त्यांच्या नावातच आहे.

विठूनामाचा गजर

केला लाखो लाख मुखांनी

सवे टाळ-मृदुंगाचा ध्वनी

गेली इंद्रायणी भारूनी

नावात सरू दे अवघे मीपण

मी पण उभवीन निशाण तोरण

मानवतेच्या वेशीवरती देईन टांगून

हळूच खालती लिहून ठेवीन

ना..वा..त का..य आ..हे?
अरविंद किणीकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renaming historic properties and roads