‘स्वातंत्र्य दिन विशेष’ अंक फारच छान आहे. अंक वाचून मानसिक समाधान झाले; कारण प्रत्येक लेख वाचनीय आहे. वाचाल तरच विचार करू शकाल. अगदी वेळात वेळ काढून फक्त संपादकीय वाचले; तरी स्वातंत्र्याचा मथितार्थ कळेल. सावकाशीने नंतर एकेक सदर वाचा. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे असते, पण त्याची जबाबदारी घ्यायचीपण तयारी पाहिजे. स्वत:च्या मनाप्रमाणे वाटेल तसे स्वातंत्र्य घेतले की, ते केव्हाना केव्हा अंगाशी येते.
दूरदर्शनच्या मालिकांना स्वातंत्र्य दिले की त्या मारुतीच्या शेपटीसारख्या वाढवतात, ज्याला काही अर्थ नसतो. सिनेमांना ‘सेन्सॉर-बोर्ड’ असते; म्हणजे स्वातंत्र्यावर घाला असे वाटते. स्वातंत्र्याची लक्ष्मणरेखा कोण ठरवणार? कारण एकाला जे अश्लील वाटते, ते दुसऱ्याला नैसर्गिक आहे, असे वाटते; तेव्हा काहीही दाखवायला त्यांची ‘ना’ नसते. समाजात चांगली-वाईट दोन्ही माणसे असतात. विकृत मंडळी नको ते पटकन उचलतात. तसेच मध्यम वयाची मुले स्वत:ला पुढारलेली समजून पाहिजे ते करतात; कारण त्यांना स्वातंत्र्य पाहिजे असते. गुन्हेगारीच्या वाटेवर स्वातंत्र्यामुळे कधी जातात, हेच कळत नाही.
स्त्रिया कमवत्या झाल्यावर त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले; म्हणजे त्यांच्या मनात येईल, तसे वागणार. त्यामुळे कोणाला त्रास होतो, याचे भान ठेवायचे नाही. पैसा हातात असल्यामुळे मनमानी खरेदी! जीवन एकदाच मिळते, ते उपभोगायचे नाही का? -हे तत्त्वज्ञान! आजकाल तरुण मुलींना शक्यतो उशिरा लग्न करायचे स्वातंत्र्य हवे असते. तसेच वाट्टेल तसे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य पाहिजे असते; म्हणून मग ‘ड्रेसकोड’ केला की वैतागतात. स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तिगणिक बदलते. पिढीगणिक बदलते. मी आहे तशीच ‘स्वतंत्र’ राहणार, बदलणार नाही. परिस्थितीनुसार व प्रेमाखातर काही वेळेस बदलावेच लागते. त्याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे. बदलण्याचे स्वातंत्र्य सर्वाना आहे. वयानुसार माणूस बदलतोच. माणूस म्हणजे ठसा नाही, की जो कधीच बदलणार नाही.
‘शादी करे तो पछताए और न करे तो भी पछताए।’ याचा अर्थ एकटे राहून जीवन जगायचे असा होत नाही. एकटे राहण्यात स्वातंत्र्य आहे, असे वाटते, पण वय वाढायला लागल्यावर कोणीतरी असावे, असे जाणवायला लागते. एकटे राहण्यामुळे माणसाचा स्वभाव एकलकोंडा, तुसडा बनतो व व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन येईल, असे वाटते; पण ते खरे असते असे नव्हे.
वैचारिक स्वातंत्र्य पाहिजे; म्हणजे आपली मते मांडता आली पाहिजेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, तसेच व्यक्ती तितकी मते असणारच. दुसऱ्यांची मते ऐकून घेऊन, आपली मते बदलली पाहिजेत, असे नाही. लहान मुलांनी आपली मते मांडली, तर त्यांचा विचार करावा, व चुकीची मते असतील तर ती बदलण्याचे स्वातंत्र्य पालकांना व मोठय़ांना असावे.
२८ ऑगस्टचा ‘फूड टूरिझम’चा अंक वाचून पोट भरले. इतके नानाविध (माहिती असणारेपण) प्रकार वाचून मनसोक्त आनंद मिळाला न खाता. आता ज्येष्ठ नागरिक असल्याने खूपसे पदार्थ खाता येत नाहीत. तरीपण वाचून बरे वाटले; कारण वाचून पोट बिघडणार नाही, हे माहीत आहे.
मूळची मी मुंबईची; तरीसुद्धा इतके अनंत प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात, हे माहीत नव्हते. खूपसे पदार्थ त्या त्या जागी जाऊन खाल्ले आहेत; पण तरी खूप प्रकार खायचे राहिले आहेत; हे आपल्या अंकावरून कळले. बरे झाले, मी तरुण असताना कळले नाही. नाहीतर त्या त्या जागी पोहोचण्याचा आम्ही मैत्रिणींनी प्रयत्न केला असता. असो. भूतकाळाला मानगुटीवर बसून द्यायचे नाही; त्यामुळे आजचा दिवस आनंदात घालवते आहे.
‘पोटोबासाठी जिवाची मुंबई’ हा प्रियदर्शन काळे यांचा लेख अप्रतिम आहे. मुंबई दर्शनबरोबर खाद्य यात्रेचीपण छान माहिती दिली आहे. (त्याकरता मुंबईत महिनाभर ठाण मांडायला पाहिजे.). खाद्यप्रेमी प्रत्येक स्थळाला भेट देईलच, इतके सुंदर वर्णन केले आहे. ‘ढबोले’ घेऊन येऊन ‘खरेदी व खाणे’ होईल. पण ते पूर्वीच्या मुंबईत आता सर्वत्र ‘मॉल्स’ निघाल्याने वरच्या मजल्यावरच्या ‘फूड-कोर्ट’ मध्येच जातात. असो. ज्याची-त्याची आवड! पण माझ्या जुन्या मुंबईची माहिती वाचून मस्त वाटले.
रेखा केळकर, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा