समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच आहे. आंबेडकरी चळवळ पुढे नेणारे अनेक लोक आहेत. या आंबेडकरी चळवळीची वाटचाल पुढे कशा प्रकारे झाली याचा ऊहापोह करणारं पुस्तक म्हणजे ‘आंबेडकरी चळवळ : दिशा दर्पण’ हे होय. प्रा. शिरीष कांबळे यांनी या पुस्तकात आंबेडकरी चळवळीची तटस्थ चिकित्सा केलेली आहे. अगदी जेथे जेथे ही चळवळ आपल्या मूळ विचारांपासून फारकत घेती झाली, तेथे लेखकाने खडे बोल सुनावले आहेत. दलित समाजाचे नेते मुख्य प्रवाहातील कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर समस्त दलित-मागासवर्गीय-बहुजन समाजाचा एक स्वतंत्र बलशाली पक्ष असायला हवा, असं आग्रहाचं प्रतिपादन लेखक करतात.
लेखकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे विशेष सांगितले आहेत. ‘कुठे आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि कुठे आपले आचरण’ या लेखात आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आपण किती फारकत घेतली आहे यावर अचूक बोट ठेवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील विकसित भारताचे आदर्श चित्र शब्दबद्ध करताना, भारतीय राज्यघटनेचा आदर्श ठेवून वर्तणूक असावी असे लेखक सांगतात. पीपल्स एज्युकेशन संस्थेची स्थापना, आंबेडकरांची सामाजिक, राजकीय क्रांती, बाबासाहेबांचे विचार समोर ठेवून केलेला कामगार संघर्ष, मानवमुक्तीसाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची आदर्श समाजाची संकल्पना यांचा ऊहापोह लेखकाने या पुस्तकात केला आहे. आंबेडकरी चळवळीची सध्याची स्थिती यावर रोखठोक भाष्य करताना लेखकाने आंबेडकरी जनता आणि नेत्यांना आरसा दाखवला आहे. आंबेडकरी चळवळीविषयी लेखकाला कमालीची आत्मीयता आणि बांधिलकी असल्याची प्रचीती या पुस्तकातून वारंवार येते आणि त्याविषयी असलेली तळमळही दिसून येते.
‘आंबेडकरी चळवळ : दिशा दर्पण’, प्रा. शिरीष कांबळे, निर्मल प्रकाशन, नांदेड, पाने-२१६, किंमत- ३५० रुपये.