सध्याचं देशातील राजकारण, निवडणुकीच्या धुरळ्यात अंधूक दिसणाऱ्या आणि अजिबात आकलनात न मावणाऱ्या घडामोडी हे सारं पाहताना वाटतं, भारतीय मतदाराचा ‘अर्जुन’ झाला आहे. त्याचा संभ्रम दूर करायला त्याला कुणी तरी भेटायला हवा! त्याच्या संभ्रमावरचं उत्तर त्याच्यापाशीच आहे ‘संविधान’. या कल्पनाभिंगातून भारतीय युद्धाचं वेगळंच चित्रबिंब दिसायला लागतं. या कर्मयोगसाराचे कर्ते आहेत जंबुद्वैपायन. भारतीय उपखंडाचं प्राचीन नाव ‘जंबुद्वीप’. बेटावर जन्म झाल्यामुळे आणि वर्णामुळे व्यासांचं नाव पडलं ‘कृष्णद्वैपायन’. तसं जंबुद्वीपात जन्म झाल्यामुळे जंबुद्वैपायन. मग साधंसरळ ‘भारतीय’ का नाही? तर त्याचं कारण ही सुचलेली कल्पना. या कल्पनेची ठिणगी पडायला कारणीभूत कृष्णद्वैपायन व्यासांचे ‘गीता’रूपी उपकार. अध्याय पहिला : जनविषादयोग ला अडवान उवाच जन्मक्षेत्री कार्यक्षेत्री मत्पक्षी आणि विपक्षी।युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय, मनोहरा ।। १।। मनोहर उवाच पाहिली ‘इंडिया’सेना सज्ज राजनाथे तिथे।जाउनी नितीनापाशी त्यास हे वाक्य बोलिला ।। २।।दुर्गपाला, पाहसी ना समोर इंडियादळ ।राजीवपुत्र तुझाच मित्र असे दीर्घकाळ ।। ३।।धूर्त मुत्सद्दी सारे हे मल्लिकार्जुनासारिखे।शरच्चंद्र, गेहलोत, स्टालिन साथीस उभे ।। ४।।आदित्य तसा सचिन, अखिलेश नि तेजश्वी।कमलनाथ, बघेल, दिग्विजय हा वीर्यवान् ।। ५।।अरविंद, भगवंत, फारुख नि मेहबूबा।ममता, उद्धव, नाना, राजकारणपटू बा ।। ६।।आता जे आमुच्यातले सैन्याचे प्रमुख वीर।सांगतो रे दुर्गपाला, जाणून घेई सत्वर ।। ७।।सर्वप्रथम नमू या नरेंद्र मोदी विश्वगुरू।प्रधानसेवक तेच रे, तेच सेनानायकही ॥ ८॥ १ अनेक दुसरे वीर पक्षासाठी झिजावया।बटवे ढिले केलेले इलेक्शन विशारद ।। ९।।केडर आपले अफाट, नमोनेतृत्व त्या मिळे।इंडियादळ तुच्छ ते, भासे कस्पटासमान ।। १०।।राहुनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले।चहुकडुनी नमोस रक्षाल अवघे जण ।। ११।।हर्षवीत चि तो त्यास घोषनाद करुनीया।संघवृद्ध भागवते मोठ्याने शंख फुंकला ।। १२।।तत्क्षणी शंखभेर्यादी रणवाद्यो विचित्र ती।एकत्र झडली झाला कोलाहल भयंकर।। १३॥मताभिलाषी सारे ते उमेदवार देखुनी ।सामान्यजन भांबावे संविधानास वदे तो ॥ १४॥‘‘नाना ध्वज, नाना रंग, वाहने, चिन्हे ही नाना।दोन्ही दंळांमधे स्थान दे मज, अच्युता ॥ १५॥म्हणजे कोण पाहीन राखिती आपुला नामा।मताभिलाषेने मज देती काय आश्वासना।। १६॥निवडणूक लढा हा पंचवार्षिक उरूस।सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट साधण्या सिद्ध हे सारे’’॥ १७॥ऐकून जनवचना संविधाने शीघ्रतेने।दोन्ही दळांमधोमध स्थान दिधले जना ते॥ १८॥ २ हेही वाचा - चारशे कोटी विसरभोळे? दावुनी नमो, राहुल, अन्य सारे शूरवीर।म्हणे, ‘‘पहा, सुजाणा रे, सर्व हे उमेदवार’’।॥ १९॥आश्चर्ये जन तो पाही परस्परसंबंधित।दोन्ही दळांत भरले आप्त नि नातेवाईक॥ २०॥आजे, काके, तसे मामे, सासरे, सोयरे, सखे।नातवंडे, सुना, लेकी दोन्ही दळांत सारखे॥ २१॥पाहता त्या हताशेने जन वदे संविधाना।‘‘देखुनी दोन्ही दळांना विशाद हो मम मना॥ २२॥गात्रेचि गळती माझी होतसे तोंड कोरडे।शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती।। २३॥ईव्हीएम् न टिके हाती त्वचा सगळी खाजते।कसे निवडू कुणाला? मन माझे हे भ्रमते॥ २४॥संविधाना पाहतो मी विपरीतचि लक्षणे।कल्याणप्रद दिसेना मार्ग हा स्वमतदाने॥ २५॥नको मज मंदिर वा मशीद, मेट्रो, ‘समृद्धी’।नको विश्वपरिषदा, ना भव्य जगत्प्रतिमा॥ २६॥अन्न-वस्त्र-निवारा अन् आरोग्य-शिक्षण सर्वां।बेपर्वा याप्रति सारे फक्त मताभिलाषी हे॥ २७॥आजे, बाप, मुले, नातू, जावई नि लेकीसुना।परस्परसंबंधी हे दोन्ही दळे एक जाणा॥ २८॥ ३ यांच्यापैकी कुणालाही मत माझे मी अर्पावे।पंचायतीसही नाही, संसदेला विसरावे॥ २९॥सत्तेने नासली बुद्धी त्यामुळे हे न पाहती।राष्ट्रहानी दोष घोर, जनद्रोह पातक ते॥ ३०।।पाप हे कसे टाळावे, सुचेना मजला काही।राष्ट्रद्रोह महापाप सर्वलोकविघातक।। ३१।।राष्ट्रनाशे नष्ट होती राजधर्म सनातन।प्रजासत्ताक देश हा सकलजनांचा आधार।। ३२।।राष्ट्रधर्मा त्यागलेल्या जनांचे हे भागधेय।नरकवास तयांच्या भाळी लिहिलेला नित्य॥ ३३॥त्याहुनी मता त्यजून उगा राहीन ते बरे।जसे जन, शासनही तैसे लाभे हेच खरे॥ ३४॥ऐसे वदुनी जन तो हतोत्साह हताशसा।टाकुनी मतपत्रिका सुन्न बसुनी राहिला॥ ३५॥श्रीराजगीतेतील संविधानजनसंवादे जनविषादयोग नाम प्रथम अध्याय।। ४ अध्याय दुसरा : सत्ताप्रयोग असा तो विषादग्रस्त जनसामान्य देखुनी।संविधान वदे त्याला बळेच धीर देउनी॥ १॥ संविधान उवाच कोठुनी भलत्या वेळी दुर्बुद्धी सुचली तुला।असे रुचे न धीरास ह्याने दुष्कीर्ति दुर्गति॥ २॥नको धीर असा सांडू, शोभे न हे मुळी तुज।क्षुद्र दुबळेपणा हा सोडुनी हो यत्नशील॥ ३॥ जन उवाच संभ्रमाने मारिली मती माझी। मोहाने नाशिले ज्ञान सारे।कैसे मला श्रेय लाभेल सांगा। पायांशी पातलो शिष्यभावे॥ ४॥संविधानासी बोलून जन तो गुडाकाधीन।‘‘नकोच ते मतदान!’’ उगा राहिला बैसोन॥ ५॥दो दळांमधील स्थानी शांत उभा संविधान।जनामनी गोंधळासी वदला त्यास हसून।। ६।।५ संविधान उवाच करिसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी।हरता-जिंकता शोक ज्ञानवंत न जाणती॥ ७॥शरीरी या बालपण, तारुण्य, आणखी जरा।सत्ताप्राप्ती, सत्तांतरां तशाच गती लाभती॥ ८॥सत्तापदे ही नश्वर सुखदु:खकारक ती।येती तैसी जाती, त्यांचे अनित्य रूप जाण तू॥ ९॥सत्तामृत कुणा लाभे स्वपक्षा वा परपक्षा।हर्षखेदास ना माने खरा तो राष्ट्रकारणी।। १०।।सत्तातत्त्वास मानिती अंतिम उदिष्ट सारे।तयाकडे फिरवणे पाठ कुणा नच साधे॥ ११॥पक्ष सारे नाशवन्त, अनुयायी बदलते।निवडप्रक्रिया स्थायी, म्हणूनी मत दे रे जना।। १२॥टाकून देतो जुनी जीर्ण वस्त्रे लेवून पोशाख नवीन भारी।तसे सोडुनी पक्ष जुनाट जीर्ण नेते नव्यांशी जुळवती सोयरीक॥ १३॥सत्ता करी भ्रष्ट, भ्रष्टां लाोभते सत्ता खचित।हे अटळ स्वीकारुनी निज कर्तव्या जाग बा।। १४।।सत्तापदे काही दिसती, काही अदृश्यांच्या हाती।त्यांचे रूप येते-जाते समजून नीट घेई॥ १५॥६ सत्तेस पाहून खिळतात सारे सत्तेस स्पर्शून चळतात सारे विद्वान वा कोणी असो गणंग सत्ता करी पात्र किंवा अपात्र॥ १६॥सत्तेठायी गहाण हे सर्वाचे शहाणपण।सत्ताप्राप्ती येनकेन सर्वपक्षीय धोरण॥ १७॥प्राप्त तुज अनायासे मतदानाचा हक्क हा।प्रजासत्ताकी मिळे सज्ञाना अधिकार हा॥ १८॥मतदान टाळून हे पापाचा होशील धनी।हितकर पथ्यकर कर्तव्य हे जाण मनी।। १९।।कोणता पक्ष जिंकेल, हरेल वा कोण रणी।नको विवंचना वृथा, मतसंकल्प करी मनी॥ २०॥निर्णय लागल्यावरी पाच वर्षे मूग गिळी।सुख-दु:ख, हानी-लाभ समान चित्ती सांभाळी॥ २१॥बाधा येते न आरंभी, विपरीत न घडे काही।सत्तेची साथ मिळता मिळतसे भयमुक्ती॥ २२॥अधिकार तुझा फक्त मतदान एवढाच।सत्ताफळी वांछा नको, नको त्यजू मतदाना॥ २३॥लंघुनी जाईल बुद्धी जेव्हा हा मोहकर्दम।आले येईल जे कानी तेव्हा जिरवशील तू॥ २४॥७ जन उवाच सत्तातुर बोले कैसा, सत्तावंत कसा दिसे।कसा चाले, कसा वागे, सत्ताधीश कसा असे॥ २५॥ संविधान उवाच ज्यास लज्जा कधी नसे, आत्मस्तुती सदा रमे।प्रतिक्षणी संधिसाधू, सत्तातुर ओळखावा॥ २६॥स्वहिताप्रति लालची, परदु:खी शीतलता।क्रोधे-भये आविष्ट जो सत्तोवंत नाम तया॥ २७॥वेदुनी भक्ष्या पूर्णत: अष्टपाद गिळे जसा।सर्वंकष गिळंकृत करी जो तो सत्तातुर॥ २८॥सत्तेपासून असता दूर तेव्हा विवेकी जे।सत्तापदी बसताच भ्रष्टाधीश बनती ते॥ २९॥सत्तापदी जोडी ध्यान भ्रष्टसंग त्या लागला।संगातुनी जडे काम, त्यातुनी क्रोध जन्मला॥ ३०॥क्रोधे उपजला भ्रम, संभ्रमे मती मोहली।मोहापायी बुद्धिनाश, आत्मनाशे राष्ट्रनाश॥ ३१॥सर्वासाठी रात्र असे, तेव्हा जागा शर्विलक।जागृत जेव्हा सारेच, शर्विलकास रात्र ती॥ ३२॥न भंग पावे भरताही नित्य समुद्र घेतो पाणी जिरवुनी तथा सर्व बाँड घेतो रिचवुनी सत्ता मिळे त्या पक्षा खचित॥ ३३॥८ निर्दय आणि कृतघ्न, स्वार्थी आणि अहंकारी सदासावध कुटिल, सत्ताधीश तोच बने॥ ३४॥ऐसी सत्तास्थिती, जना, मिळता न त्यागो वाटे।आमरण जरी मिळे, शाश्वताची इच्छा उरे॥ ३५॥श्रीराजगीतेतील संविधानजनसंवादे सत्ताप्रयोग नाम द्वितीय अध्याय।। अध्याय तिसरा : विवेकभ्रष्टप्रयोग जन उवाच मत आणिक सत्ता ही विजोडच सांगसी तू।तरीही मतदानाच्या कर्तव्या का आग्रहीसी॥ १॥तुझ्या बोले माझी मती अधिकच भांबावते।श्रेयस्कर जे खचित सांग ते एक निश्चित॥ २॥ संविधान उवाच जगी या विविध निष्ठा आधीही मी सांगितले।नेते सारे सत्तानिष्ठ, अनुयायी कर्माप्रति॥ ३॥नीतिअनीति विचारे राही सत्तापराङ्मुख।सत्ताहीन मूढमती वदती ‘मिथ्याचारी’ त्या॥ ४॥एके काळी सहमते निर्मिले तू संविधाना।लाभो तयाने उत्कर्ष, प्रगतीचे भागधेय॥ ५॥ ९ हेही वाचा - स्थितप्रज्ञ वैज्ञानिक नेत्यांना पूजिले धने, धनवंत बने नेता।दोहोंचे एकचि लक्ष्य सत्ताप्राप्ती कशी करू॥ ६॥सत्तातुष्ट प्रसन्न जे नेते वाटती पदे।पदफळांच्या फोडींना वाटेकरी अनेक ते॥ ७॥जे पदार्थपदान्न खाती विपरीतात टिकती।पदा नकार देणारी नष्ट होय प्रजाती ती।। ८॥भ्रष्टाचारापोटी सत्ता, सत्तेतून मिळे पद।पदासाठी अनुयायी, भ्रष्ट सत्तासमुद्भव॥ ९॥धन आणिक पदेही येती सत्ताक्षरांतुनी असे सत्ता सर्वव्यापी मनी नित्य ठसवी हे॥ १०॥नित्य फिरते सत्तेचे चाक न जो नेई पुढे।विजनवास त्या भाळी सर्वा वाटे व्यर्थ जिणे॥ ११॥जे जे आचरतो नेता, ते करी इतरेजन।वाकडे त्याचे पाऊल, सारे त्या अनुसरती॥ १२॥सोडले जर विधान नष्ट होतील हे लोक।घटनेचा घातकर्ता ठरेन जनभक्षक।। १३।।गुंतुनी करिती अज्ञ, ज्ञात्याने मुक्त राहुनी।करावे कर्म तैसेच लोकसंग्रह इच्छुनी।। १४।।अज्ञ त्या कर्मनिष्ठांचा करू नये बुद्धिभेद।गोडी कर्तव्यी लावावी ममत्वे आचरुनी त्या॥ १५॥१० उणाही अपुला पक्ष, विपक्षाहुनी बरवा।स्वपक्षे मृत्यूही भला, परपक्ष भयावह॥ १६।। जन उवाच भ्रष्टाचारी बने व्यक्ती प्रेरणेमुळे कोणाच्या।नसता तयाची इच्छा वेठीस धरला जसा॥ १७॥ संविधान उवाच रजोगुणे उद्भवे हा सर्व पापास कारण।हाच काम-क्रोध-मोह षड्रिपूंचे निवासन॥ १८॥धुराने झाकिला अग्नी, धुळीने आरसा जसा।वारेने वेष्टिला गर्भ, भ्रष्टाने विवेक तसा॥ १९॥भ्रष्टाचार महावन्ही न हो तृप्त कधीही जो।विवेकाचा सदा वैरी, शत्रू सर्व जनांस जो॥ २०॥अहंकार, धन, सत्ता याचे अधिष्ठान सर्वथा।जनमतीसही मोही माती करी लोक-मता॥ २१॥म्हणुनी हे सर्व जाण विवेकेचि मतदान।टाळुनी भ्रष्टाचरण राष्ट्रधर्मविनाशन॥ २२॥श्रीराजगीतेतील संविधानजनसंवादे विवेकभ्रष्टप्रयोग नाम तृतीय अध्याय।।