‘लोकरंग’मधील (९ जून) ‘‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!’ महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. या लेखात राहुल गांधी यांचे उदात्तीकरण करून सहानुभूती मिळवणे हा कच्चा खेळ आहे. त्यांनी भोगलेले कौटुंबिक दु:ख नक्कीच वेदनादायक आहे, यात दुमत नाही. परंतु राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना आपल्या भावना, दु:ख हे वैयक्तिक ठेवावे लागते. असे काही लोकोत्तर नेते होऊन गेले ज्यांनी व्यक्तिगत भावना, दु:ख जनतेसमोर व्यक्त केले नाही. त्याचे एक उदाहरण म्हणजे वल्लभभाई पटेल. ते एका देशभक्ताच्या फाशीच्या शिक्षेवर कोर्टात त्याचा बचाव करत असताना त्यांना मधेच थांबवून चिठ्ठी देण्यात आली. ती त्यांनी वाचली आणि कोटाच्या खिशात ठेवून बचाव सुरूच ठेवला. बचावावरील चर्चा संपल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना चिठ्ठीबद्दल विचारले तेव्हा ती चिठ्ठी म्हणजे त्यांच्या प्रिय पत्नीच्या निधनाची वार्ता होती असे कळले. एवढी गंभीर बाब असूनसुद्धा त्यांनी बचावात अडथळा येऊ दिला नाही, कारण त्यांनी हा विचार पक्का केला की पत्नीचे तर निधन झालेच आहे, पण जर बचाव अर्धवट सोडला तर तो देशभक्त वाचू शकणार नाही.

राहुल गांधींच्या विचारसरणीत बदल होतोय हे एक नेता म्हणून नक्कीच स्वागतार्ह आहे, पण त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की त्यांचे बहुतांश मतदार हे धार्मिकतेवर आधारित आहेत. समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेला भ्रष्टाचार आणि तो जपणारेही त्यात बहुसंख्येने सामील आहेत, कारण त्यांना इंडिया आघाडी ही त्यांच्या कारनाम्यास बिनधोक वाटते.

बिपीन राजे, ठाणे.

आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख

‘लोकरंग’ (९ जून ) मधील गिरीश कुबेर यांचा ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा!’ हा लेख नेमका व सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. वंचित व डॉ. आंबेडकरी चळवळ याबाबत झालेली पीछेहाट मात्र मनास दु:ख देणारी आहे. संविधान वाचवा हे प्रथम त्यांनी व्यक्त केलं व ते सामान्य मतदारांनाही पटलं. वैविध्य व सौहार्द आणि समानता हा आपल्या देशाचा आत्मा आहे.

रंजन जोशी, ठाणे

बोधाचे मात्र जरा कठीणच!

‘लोकरंग’ मधील (९ जून) गिरीश कुबेर यांचा ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा!’ या राजकारणाच्या जंगलातील प्राण्यांच्या वर्तनाच्या, आणि माणसावर बसून त्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांना बोध करू पाहणाऱ्या कथा वाचल्या. इसापच्या किंवा हितोपदेश इ. ग्रंथातील अशा कथांचे तात्पर्य आतापर्यंत कोणी मनावर घेतले असेल असे दिसत नाही. प्राण्यांना वाचता येत नाही त्यामुळे त्यांचे स्वभाव, वर्तन बदलत नाही आणि माणसांत गैरसोयीच्या तात्पर्याकडे कानाडोळा करण्याचे चातुर्य असल्याने तेही बदलत नाहीत. कथांनी मनोरंजन नक्कीच होते, बोधाचे मात्र जरा
कठीणच आहे !

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर.

मुस्लीमविषयक दृष्टिकोण बदलणे गरजेचे

‘लोकरंग’मधील (९ जून) गिरीश कुबेर यांचा ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा…!’ हा लेख वाचला. या लेखातील कथांचे श्रेय, कथापरत्वे जरी निरनिराळ्या व्यक्तीचं असलं, तरी या सर्व घटनांच्या मुळाशी मुस्लीम मतदारांचा संघटित व ठाम भाजपविरोध आहे व त्यामुळेच भाजपची लोकसभेतील खासदारांची संख्या रोडावली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील ५ विधानसभा मतदारसंघात मिळालेली २ लाखांच्या आसपासची बढत, एकट्या मालेगाव विधानसभा मतदारसंघाने (बहुसंख्य मुस्लीम) पुसून टाकली व भाजपचे डॉ. सुभाष भामरे पडले, ही वस्तुस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. ही परिस्थिती भाजपच्या अनाकलनीय व अनावश्यक मुस्लीम विरोधामुळे उद्भवली आहे. लोकशाहीत लोकसंख्येच्या अंदाजे १५ टक्के असलेल्या घटकाला दूर सारणं कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. केवळ भूतकाळ कवटाळून बसलात तर २९च्या निवडणुकीमध्ये (किंवा त्या आधीही) सत्ता हातातून जाण्याची शक्यताच जास्त! विचार करण्यासारखा मुद्दा हा की, एवढ्या मोठ्या समाजाला दूर लोटल्याची भावना निर्माण होणे इष्ट आहे का? भारताला खरोखरच प्रगतिपथावर न्यायचं असेल तर राज्यकर्त्यांचा मुस्लीमविषयक दृष्टिकोण बदलणे गरजेचे आहे! ‘सबका साथ, सबका विकास’ प्रत्यक्षात दिसला पाहिजे आणि पटलाही पाहिजे!

मधुकर पानट, तळेगाव दाभाडे

भाजपची सामूहिक खच्चीकरण आघाडी

‘लोकरंग’ मधील (९ जून) ‘युवराज ते धीरोदात्त नेता’ हा महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. भाजपमधील काही नेत्यांमध्ये एखाद्याला पद्धतशीरपणे नाउमेद तसेच खच्चीकरण कसे करावे हीच शिकवण असते. विरोधक असावेत आणि ते गरजेचेच आहे, पण समोरच्या विरोधकांचे कोणत्या प्रकारात अवमूल्यन करावे याचेही प्रमाण असावे. राहुल गांधी यांना ‘पप्पू’ बनवण्याचा डाव पद्धतशीरपणे रचण्यात आला. इतकेच नव्हे तर मानसिक खच्चीकरण केले- तेही प्रसार माध्यमाच्या आधारे. ही व्यक्ती किती निर्बुद्ध आहे हे दाखविण्याची चढाओढच लागलेली दिसते. मात्र यावर मात करीत राहुल गांधी यांनी भारत जोडोच्या माध्यमातून काँग्रेसला संजीवनी मिळवून दिली. त्यानिमित्ताने देशपातळीवरील प्रश्नांची उकल झाली. जनतेत मिसळल्याने त्यांना जनतेची दु:ख, अडचणी, समस्या समजून घेता आल्या. किती अडचणी भाजप सरकारने आणल्या तरी ते डगमगले नाहीत. त्यामुळे ते कणखरपणे उभे राहत आहेत. विरोधकांमध्ये केवळ काही वाचाळवीर आहेत जे सत्य दडवत असतात. पण राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत हे आत्ताच्या निवडणूक निकालात एव्हाना समजले असेलच.

संतोष ह. राऊत, लोणंद, सातारा

पण विश्लेषण वाचायला मिळाले नाही

‘लोकरंग’ मधील (९ जून) गिरीश कुबेर यांचा ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा…!’ हा लेख वाचला. लेखकाला या बोधकथा लिहिण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिली हेही तेवढेच खरे. यातून माझ्यासारखे कार्यकर्ते नक्कीच काही बोध घेतील असाही विश्वास लेखकाला देतो. लेखकाकडून निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेल्या बाबींवर त्याचे मत ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण या बोधकथेच्या लेखातून असे विश्लेषण वाचायला मिळाले नाही.

दिनेश सूर्यवंशी

समाज विचार करेल

‘लोकरंग’ मधील (९ जून) गिरीश कुबेर यांचा ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा…!’ हा लेख वाचला. या लेखामुळे देशभरातील अनेक न कळलेल्या वास्तव गोष्टींची माहिती मिळाली आणि हे वास्तव तितक्याच प्रभावीपणाने समाजमनावर उमटलेले दिसावे. अशा लेखांमधूनच समाज विचार करायला लागेल.

अशोक शंकर बने

या मनोरंजन कथा

‘लोकरंग’ मधील (९ जून) गिरीश कुबेर यांचा ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा…!’ हा लेख वाचला. यावेळची लोकसभा निवडणूक ही १८ व्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी असते लोक प्रतिनिधी निवडण्यासाठी नसते. म्हणजे लोकप्रतिनिधित्व म्हणजे काय हे बाजूला ठेवून निवडणूक निकालाच्या बोधकथा समोर ठेवल्या आहेत त्यासाठी दिलेले आधारभूत स्पष्टीकरण
राज्यशास्त्रीय नाही, त्यामुळे त्या बोधकथा होत नाहीत तर मनोरंजन कथा होतात.

दिलीप सहस्राबुद्धे, कोल्हापूर</p>

आपण पप्पू नाही हेच सिद्ध केले

‘लोकरंग’मधील (९ जून) ‘‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!’ हा महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि त्रयस्थ पद्धतीने तसेच पारदर्शकपणे लेखकाने राहुल गांधी यांचे चिकित्सक विश्लेषण केले आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पप्पू बनवण्याचा कट रचला हे सर्व जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले. परंतु या गोष्टीने खचून न जाता फिनिक्स पक्ष्यासारखी झेप घेत संपूर्ण भारत देश दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम पालथा घातला आणि खरा पप्पू कोण हे देशाला दाखवून दिले. समोरासमोर पत्रकार परिषदेसाठी आपण तयार आहोत हे सांगून पप्पू कोण यावर शिक्कामोर्तब केले. कोवळ्या वयात आजी आणि वडील गमावल्यावरही मनात सूडाची भावना न धरता उलट मोहोब्बत की दुकान सुरू करतो असे आवाहन केले. ‘इंडिया’साठी खूपच आशादायक चित्र आहे. लेख खूप आवडला.

डॉ. दिनेश कांबळे

मनाचा कणखरपणा सिद्ध केला

‘लोकरंग’मधील (९ जून) ‘‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!’ हा महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. राहुल गांधी यांच्यावरील लेख माझ्यासारख्या दूरवरून राजकारण पाहणाऱ्या लोकांना विचार करायला लावणारा आहे. मनाचा कणखरपणा कसा असतो हे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांनी उत्तमपणे विदित केले आहे.

अनिल पाटील

लेखामुळे रंगतदार पैलू समोर

‘लोकरंग’ मधील (९ जून) गिरीश कुबेर यांच्या ‘निवडणूक निकालाच्या बोधकथा!’ या लेखातून अनेक रंगतदार पैलू समोर आले. तथापि, त्यातील एक तपशील अधिक लक्षवेधी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात असा उल्लेख आला आहे की अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘सलग’ तीन वेळा पंतप्रधानपदी आरुढ होण्याचा विक्रम आधीच केला आहे. वास्तव असे आहे की, वाजपेयी तीनदा पंतप्रधान झाले खरे; परंतु १९९६ नंतर ते पुन्हा १९९८ मध्ये या पदावर आले. त्या दरम्यान दोन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल होऊन गेले होते. म्हणजेच वाजपेयी ‘सलग’ तीनदा पंतप्रधानपदी आले नव्हते. नेहरू आणि मोदी या दोघांनीच ‘सलग’ तीनदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. वाजपेयी आणि इंदिरा गांधी (१९६७, १९७१ आणि १९८०) तीनदा निवडणुकीनंतर पंतप्रधान झाले, पण त्यांची कारकीर्द ‘सलग’ नव्हती. खरे तर इंदिराजी चार वेळा पंतप्रधान झाल्या. मात्र सर्वप्रथम त्या पदाची शपथ त्यांनी घेतली तेव्हा लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते.

दिलीप चावरे, अंधेरी