लेखिकेने व्यक्तीची जडणघडण कशी होते या संदर्भात जनुकीय घटकांपासून ते आजूबाजूचे लोक, पोषण, शिक्षण, कुटुंबीय, समाज, इत्यादी समग्राचा खूप बारकाईने विचार केला आहे. आपल्याला येणारे ‘अनुभव’ आणि भवतालाशी जोडले जाणे याबद्दलचे लेखिकेचे हे मनोगत लक्षवेधी आहे. ‘नाते स्वत:शी’, ‘लेखनाचा प्रवास’, ‘निर्मितीच्या वाटेवर’ यांसारख्या लेखांच्या शीर्षकांमधूनच हा एका सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचा स्वत:च्या सर्जनाच्या वाटेवरील चिंतन- मननाचा समृद्ध अनुभव देणारा ऐवज असल्याचे लक्षात येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखन प्रक्रियेबद्दल लिहिताना लेखिका मनातले सगळे अनुभव, दु:ख, यातना शब्दांत मांडून ‘माणसां करवी’, ‘मोकळं होणं’ या प्रक्रियेचे मार्मिक विश्लेषण करते. त्यासाठी ‘स्थलांतर’, ‘आवर्तन’ यांसारख्या स्वत:च्या कादंबऱ्यांचेही जागोजागी संदर्भ देते. ‘अवकाश’ कादंबरीच्या वेळचे झपाटल्या अवस्थेतील पुनर्लेखन तिला येथे आठवते. या सर्वांतून मागच्या लेखनातून जे सुटून गेलेले असते ते पुन्हा बोलावत राहते या अर्थाने कदाचित गोष्ट रचण्याची गोष्ट चालूच असावी म्हणणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एका निर्मितीक्षम लेखिकेने जाणीवपूर्वक स्वत:च्या लेखन प्रक्रियेबद्दल मांडलेला प्रामाणिक लेखाजोखा मुळातून वाचायला मिळणे ही वाचकांसाठी एक दुर्मीळ अनुभूतीच आहे.

हेही वाचा…विळखा काजळमायेचा!

वाचकांना आपल्या सभोवती सजगपणे पाहायला हे पुस्तक अगदी सहजपणे उद्याुक्त करते. खुला संवाद आजच्या काळात जाणीवपूर्वक जोपासण्याचे महत्त्व लेखिका अधोरेखित करते. राजकीय, धार्मिक, सामाजिक सत्तेने मुस्कटदाबीने बंदिस्त समाज अधिक बंद करण्याच्या प्रक्रियेचा लेखिकेने केलेला ऊहापोह महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर स्वत:च्या स्वातंत्र्याची कल्पना दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणारी नसावी. समता, समानता, सहअनुभूती, करुणा, मूल्यांचा आदर लेखकांनी आपल्या आवाजातून- संवादातून जाणीवपूर्वक करणे यांवर लेखिका भर देते. स्वत:च्या संवादाशी कटिबद्ध राहून मोकळ्या विचारांचे मार्ग चोखाळणे ही वर्तमानकाळाची गरज लेखिका दृगोचर करते.

समाज म्हणून आणि लेखक म्हणून आपण बदलत्या प्रवाहात सगळ्यांना सामावून घेऊ शकणाऱ्या संवादांचा पर्याय स्वीकारतो की स्व-केंद्रित, स्वार्थी सवयींनी जगण्याचा पर्याय हे जागरूकपणे तसेच जाणीवपूर्वक तपासून निवड करत जगण्याचे भान देणारा ‘संवाद’ विचार मांडते. ‘निवडलेल्या वाटेने जाताना…’ सारखा लेख समुपदेशन म्हणजे नक्की काय या विषयाचा थोडक्यात, पण अगदी मुद्देसूदपणे आढावा घेतो. लेखिका लग्न, लोक काय म्हणतील, कुटुंबातील सत्तेचे राजकारण, लैंगिक शोषण, शारीरिक आणि शाब्दिक हिंसा, त्यातून निर्माण होणारे ताण, दडपलेली समस्याग्रस्त स्त्री-पुरुष दोघांची आयुष्यं इत्यादी विषयांच्या अनुषंगाने लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, त्यातील स्त्री-पुरुष यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा व अपेक्षाभंग यांवर संवेदनशीलतेने भाष्य करते. ‘सकस सहजीवनाच्या शोधात’, ‘जोडीदार : अपेक्षा आणि वास्तव’, ‘स्त्री- पुरुष संबंध : अनेक पैलू’, ‘अर्ध्या जगासाठी’, ‘शरीर आणि नैतिकता’ या लेखांमधून स्त्री-पुरुष संबंधांच्या पूर्वापार सत्ताकेंद्री विचारांपासून ते बदलत्या काळात मानवी पातळीवर विचार करण्याच्या निकडीबद्दल लेखिका गंभीरपणे वैचारिक भूमिका मांडते.

या पुस्तकातील विद्या बाळ, अंबिका सरकार, श्री. पु. भागवत, गौरी देशपांडे यांसारख्या व्यक्तिमत्त्वांवर आधारित लेखांमधून सानिया यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी, वैचारिक जडणघडणीशी व लेखन प्रक्रियेशी असणारा या सर्वांसोबतचा स्वाभाविक मैत्रबंध हळुवारपणे उलगडून दाखवला आहे. गौरी देशपांडे यांना ‘पत्र’ लिहून एका लेखात स्मरले आहे. गौरीचे हळवे मन, कुणालाही मदत करण्याची वृत्ती इत्यादी कंगोरे दाखवताना सानिया यांची प्रगल्भ लेखणी वाचकांना भावुकही करते.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

आपल्या लेखक म्हणून झालेल्या जडणघडणीत वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या प्रवासांमुळे झालेल्या वास्तव्याने वाढलेली एकंदर जगाची आणि आयुष्याची समज यांचा आपल्या लेखन प्रक्रियेत मोलाचा भाग आहे हेही लेखिका नमूद करते. नव्या प्रगतिशील समाजाच्या निर्मितीसाठी पुस्तके वाचण्याची गरज आणि पर्यावरण रक्षणाची गरज या दोन्ही मुद्द्यांचे जाता जाता लेखिकेने ठामपणे समर्थन केले आहे. मिलिंद बोकील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेले, मुखपृष्ठापासून आतील लेखनापर्यंत वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे, विचारप्रवृत्त असे हे साहित्य लेणे प्रत्येक दर्दी वाचकाने आवर्जून अनुभवावे असेच आहे! ‘काही आत्मिक… काही सामाजिक’, – सानिया, रोहन प्रकाशन, पाने- २५२, किंमत-३७५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book sud o2