संयोगिता ढमढेरे
‘लोहा गरम हैं, हथौडा मार दो’ हा संवाद सर्वाना जेवढा चिरपरिचित, तेवढाच हे काम प्रत्यक्ष करणारा समाज आपल्याला अपरिचित आहे. शहर, गावाच्या रस्त्यालगत तापत्या भट्टीवर राबत, अवजड घणाचे घाव घालत लोखंडाला नानाविध आकार देणारी घिसाडी जमात. औद्योगिकीकरणाने त्यांच्या उपजीविकेवर गदा आणली. इंग्रजांच्या एका फतव्याने अशा अनेक भटक्या जमाती गुन्हेगार ठरल्या. देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही या जमाती आजही गावकुसाबाहेर पालावर आणि शहरातल्या बकाल झोपडय़ांत हातातोंडाची मिळवणी करण्यातच जीवन व्यतीत करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा समाज वर्षांनुर्वष गाव, शहरात असूनही नसल्यासारखा. कारण यांच्याकडे ना शिक्षण, ना संपत्ती, ना सत्ता, ना उपद्रवमूल्य होईल अशी संख्या. सामाजिक आणि राजकीय वंचित असलेल्या भटक्या समाजातील पुरुषांची फारशी दखल घेतली जात नाही तर महिलांची काय गत. परंपरा आणि अंधश्रद्धा यांमुळे इथे पुरुषप्रधान व्यवस्थेचा काच आणखी घट्ट असेल. त्यामुळे महिलांची स्थिती बिकट असणार याची कल्पना असणं आणि या महिलांचं जगणं, त्यांचा संघर्ष प्रत्यक्ष अनुभवणं या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. याचा प्रत्यय दीपा पवार यांच्या ‘पोलादी बाया’ वाचताना पानोपानी येतो.

आजवर इंग्लंडच्या आणि भारताच्या पंतप्रधान बायांसाठी ही उपमा वापरली गेली आहे. पण या पुस्तकातल्या पोलादी बाया आहेत राबून निर्मिती करणाऱ्या! जगण्याचं हलाहल पचवलेल्या. उपेक्षा, वंचना, जाचक परंपरा, बालविवाह, शारीरिक-मानसिक-आर्थिक-लैंगिक हिंसेच्या आगीतून तावून निघालेल्या, गरम काम करणाऱ्या घिसाडी समाजाच्या आठ महिलांच्या कहाण्या या पुस्तकात आहेत. या आठ कहाण्यांपैकी सर्वात थक्क करणारी कहाणी स्वत: दीपा पवार यांच्या आईची आहे.

लेखिकेने हे जग, हे जगणं स्वत: अनुभवलं आहे. त्याबरोबर सामाजिक कार्य क्षेत्रात टाटा इन्स्टिटय़ूटमधून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेलं आहे आणि अनुभूती नावाची संस्था स्वत: चालवत आहेत. लेखिका आंतरशाखीय स्त्रीवाद आणि जातीअंत चळवळीची कार्यकर्तीही आहे. त्यामुळे या कहाण्या केवळ हृदयस्पर्शी गाथा राहत नाही.  आजूबाजूच्या समाजाचं निरीक्षण करताना दीपाला ‘आपला वेगळेपणा विचित्र आहे का? आपण या गर्दीचा एक किरकोळ, बिनगरजेचा भाग आहोत या भावनेने पोरकं वाटत असे. न्यूनगंड, लाज, कमीपणा, अपराधीपणा याचे काळोखी विश्व दाट होऊ लागले. लोकांबरोबर चालताना आपलेच पाय एवढे का पोळत आहेत? आपली दमछाक इतरांपेक्षा जास्त का होत आहे?’ हे प्रश्न पडले. परंतु शिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा आणि सावित्रीबाई फुले आदींच्या साहित्यामुळे ‘न्यूनगंडाची जागा धैर्याने भरून निघाली. एखाद्या झाडाला वारा, पाणी, उजेड न देता कोमेजण्याचा आरोप त्याच्यावरच लादण्याचा वर्चस्ववादी, प्रस्थापित, आक्रस्ताळय़ा वृत्तीचा थांगपत्ता मला पुरेपूर लागला,’ असं लेखिका प्रस्तावनेत म्हणते. 

म्हणूनच एक स्त्री म्हणून त्या महिलेची होणारी फरपट, हतबलता, पुरुषसत्तेचा जाच याबरोबर जात वर्चस्व, भांडवली व्यवस्था आणि पर्यावरणीय बदल याची निरीक्षणं लेखिका नजरेआड करत नाही. जमिनी कलांची आणि ती अंगी असलेल्या समाजाची भांडवली बाजारात हेतुपूर्वक उपेक्षा केली जाते. त्यांना कमी मोबदला देणं आणि राजमान्यता नसणं यामुळे ढोर मेहनत करूनही कायमची आर्थिक चणचण त्यात अंधश्रद्धा आणि व्यसनांचा विळखा याची कारणमीमांसा स्पष्ट करते.  हे पुस्तक केवळ कथासंग्रह नाही तर भटक्या विमुक्त समाजाचा विशेषत: महिलांच्या संघर्षांचा एक मजबूत दस्तावेज झाला आहे.

‘राबून निर्मिती करणाऱ्या पोलादी बाया’,

– दीपा पवार, हरिती प्रकाशन,

पाने- १९२, किंमत- ३०० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang book raabun nirmiti karnarya poladi baya stories of eight women of the ghisadi community amy