‘लोकरंग’मधील (४ फेब्रुवारी) ‘झुंडीला नेमके काय हवे असते?’ हा संकल्प गुजर यांचा लेख वाचला. राज्यव्यवस्था आणि कार्यकारी मंडळ आणि त्याचे मुख्य स्तंभ याचाच विसर आज पडत गेला आहे- तो जागतिक स्तर असो अथवा एखादा देश. जनआंदोलने ही होतच असतात. एकोणिसाव्या किंवा विसाव्या शतकात काही देशांत राज्यक्रांती घडून गेली, ती क्रांती एकविसाव्या शतकातील पिढीला माहिती आहेत का? याउलट आजची आंदोलने ही केवळ एका विशिष्ट विचारसरणीस अनुसरून होत नाहीत, तर त्यांना खतपाणी घालणााऱ्या राजकीय नेत्यांमुळे होताना दिसतात. त्यातील उदाहरण घालून द्यायचे असेल तर ट्रम्प यांचे उदाहरण नक्कीच डोळयासमोर येते. एखादा सत्ताधीश मोठमोठया बाता मारून सत्तेवर येतो, पण त्यातून काही चांगले घडले नाही. मग अशा झुंडी युवा वर्गातून निर्माण होतात. काही राज्यांत चाललेली आंदोलने ही आगामी काळातील चाहूल तर नाही ना, असा प्रश्न पडतो. पण एक मात्र खरे की, अशा झुंडशाहीला राजकीय पाठबळ असतेच आणि त्यातूनच अशी आंदोलने अथवा क्रांती घडवून आणली जाते.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.
रंगलेली मुलाखत
‘लोकरंग’मधील (२८ जानेवारी) पीयूष मिश्रा यांची ‘अभिनय ही गांभीर्याने करण्याची बाब!’ ही मुलाखत वाचली. या मुलाखतीत त्यांनी आयुष्यातील यश-अपयश, चढ-उतार, कडू-गोड आठवणी समर्पक, पण स्पष्ट शब्दांत अधोरेखित केल्या आहेत. मुलाखत इतकी रंगली आहे की, प्रत्येक वाचकांस आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असल्याची अनुभूती यावी. त्यांनी युवा कलाकारांना दिलेले प्रोत्साहन, तसेच अभिनयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज याची कलाकारांनी आवर्जून नोंद घ्यावी.- अशोक आफळे, कोल्हापूर</strong>
कुवत ना सत्ताधाऱ्यांची आहे, ना जनतेची
‘लोकरंग’मधील (२८ जानेवारी) पीयूष मिश्रा यांची ‘अभिनय ही गांभीर्याने करण्याची बाब!’ ही मुलाखत आवडली. नाटक पाहत असताना त्या त्या क्षणांचा थरार अंगावर येतो, ती अनुभूती नावीन्य घेऊन येते, त्यात शिळे काही नसते हे त्यांचे म्हणणे रसिक म्हणवणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. शालेय स्तरावर नाटयशिक्षण अनिवार्य करावे असे त्यांच्यातला नाटक सर्वांगाने जगणारा ‘वेडा’ कलाकार सांगत असला तरी आपल्या समाजात अभिरुचीचा एवढा मोठा स्तर गाठण्याची कुवत ना सत्ताधाऱ्यांची आहे, ना जनतेची!- प्रशांत देशपांडे, सोलापूर