– प्रदीप कोकरे

मानवाच्या उत्क्रांत इतिहासात आदिम काळापासून सर्वाधिक संदर्भ कोणी पेरले असतील तर ते पावसाने. ओलेकंच, हिरवेगार, लुसलुशीत, गंधाळलेले, झड-बेभान, स्वप्नाळू संदर्भ पेरणारा पाऊस स्वत:च आताशा एवढा अनाकलनीय होऊन बसलाय की, त्याने माणसाच्या स्वप्निल डोळ्यांना दिलेले सगळेच्या सगळे संदर्भ धड पुसूनही टाकता येत नाहीत आणि जपावेत अशा भरवशाचेही उरले नाहीत. असे सगळे अवघड होऊन बसलेले असताना राज्यातील वेगवेगळ्या भूभागांत वाढलेल्या युवा लेखकांच्या नजरेतला हा पाऊस. कुणाला त्याचे भारदस्त रूप घाबरवते, तर कुणाला त्याच्या धोकेबाजपणाचा राग येतो. आठवणींच्या अनेक फांद्यांमध्ये दडलेल्या धारांची ही ओंजळ..

केरळमधल्या मान्सून आगमनाची चाहूल वगैरे लागायच्या आधीच खोलीच्या पत्र्यावर चढून साफसफाईला सुरुवात होते. साफसफाई करणाऱ्यांच्या घरावर ताडपत्रीची गरज भासत नाही. त्यांच्याकडं उभं राहायला जागाच नाहीय या शहरात. पॉलिटिकल पार्ट्यांचे मोठमोठे बॅनर डोईवर टाकून पावसाळा ऋतू संपतो. पुन्हा दुसरीकडं पायांची वणवण असतेच स्थलांतरासाठीची!

हेही वाचा – वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

तर सांगत होतो की, आधीच्या ताडपत्रीवर नवी ताडपत्री चढते नि खोलीच्या छतावर निळाई पसरते. आता रंगीबेरंगी ताडपत्र्या मिळत असल्या तरी चाळीला निळाच रंग आवडतो कधीपासूनचा. निळी ताडपत्री मुंबईची कविता आहे- अंत:करणात विश्रब्धतेचा गाभारा असलेली. आभाळाचा रंग पारखाय आम्हाला. वर बघितलं की डोळे ओले होतात एकाएकी. आणि मुसळधार पावसात ते दिसत नाहीत. असंख्य पावसाळे माणसांनी ताडपत्र्यांवर निर्धास्त जिरवले. कालपरवापर्यंत मेच्या उंबरठ्यावर कुणाचं लग्न लागलं की लग्नात एकाने तरी ताडपत्री आहेर म्हणून घातलेली दिसते. माळ्यावर बसलं की पत्रा डोक्याला लागतो. तेव्हापासून वर जपूनच बघावं लागतं. माळ्यावर बसून पत्र्यांवर थडाथडा पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचं संगीत तुम्ही ऐकलंय? एकदम बवाल चाल असते थेंबांना. कुठल्याशा सिनेमातलं ‘beautiful things don’t ask for attention’ असं वाक्य आठवतं अशा वेळी. अशा गोष्टी स्वत:च्या चालीत घडतात. निळ्या ताडपत्रीवर पडणारे पावसाचे थेंब मला त्या स्वत:च्या चालीतल्या घटनेसारखे वाटतात.

टेरेसची गोष्ट आणखी वेगळी असेल. माहीम आणि बांद्रा यांच्यामध्ये माहीमची खाडी आहे. ईस्ट-वेस्ट इतकाच भेदभाव आहे पावसात. नैसर्गिकरीत्या नाही. त्यामुळं पाऊसही मला असा विभागलेलाच दिसतो. त्यामुळं आपोआप पावसाला सामाजिक संदर्भ म्हणून पाहणं येतं. पावसाळ्यात धा बाय धाच्या खोलीची इवली खिडकीही प्लास्टिकच्या कागदाने बंद करावी लागते याचं कारणही सामाजिकतेत आहे. त्याचीही वेगळी कविताय. इवल्या खिडकीत अशा कित्येक कविता गुदमरून आहेत. पाऊस, खिडकी, वाफाळता चहा वगैरे अस्थेटिक सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतं. माळ्यावर बसून मुंबईची सात बंदरं ते स्क्रोल करत असतात. रात्रपाळीचं घरकाम आटपून पुन्हा भिजत घराकडं येणारी बाई घरात शिरलेलं पाणी बघून पावसाला शिव्या घालते नि सोशल मीडियाचा अल्गोरिदम आपल्याला लता-किशोरचा रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन रिम-झिम गिरे सावन.. असा गळा लावताना दाखवतो. भर पावसाळ्यात अनधिकृत बांधकाम म्हणून घरं तोडायची आणि बायकामुलांनी टाहो फोडत विझलेल्या चुलीकडे नुसतं बघत बसायचं हेही पावसाशी जोडलेलं दृश्य आहे. ते वरचेवर दिसत राहतं आणि माणसं संपून जातात एकेक करत; नाहीतर चप्पल उशाला घेऊन सकाळ होण्याची वाट तरी बघतात काही जण.

आणखी कुठे कुठे वेगळीच आठवण असेल प्रत्येकाची मुंबईतल्या पावसाबद्दलची. नगरसेवकानं आणून दिलेल्या भगव्या छत्र्यांची आठवण काढतात लोक. तशी दहीहंडीला मंडळाने छापलेल्या टीशर्टची आठवणही. म्हणजे पावसातही पॉलिटिक्स आहे. एकाच छत्रीत चौपाटीला किंवा वरळी सीफेसला मका खातानाची आठवणही असते. शहरातल्या कुणा चाकरमान्याची गावातली तान्ही म्हैस अचानक तोंडात फेस येऊन मरते पावसाळ्यात आणि हा इकडे तळमळत असतो दिवसभर. किती आठवणींना हा पावसाळा पोसतो! किती आठवणी वर काढतो, दुखावतो, सुखावतो आणि अचानक मातीला पारखाही होतो.

सामाजिक लोकेशनवरून प्रत्येकाला त्याचा गंधही जाणवत असेल. सपाट स्लाइड खिडकीतून कितव्याशा मजल्यावरून तर वेगळीच अनुभूती येत असेल. बॅग्राऊंडला बंदिशही असेल सुरेल कुठली तरी. एकाच वेळी कोसळतोय, पण अनुभवाशी जोडलेली जाणीव मात्र भिन्न. दरवाजावर वाळत घातलेल्या टॉवेलचा दर्प या अनुभवाशी संलग्न नाही. तो दर्प निराळाच कारण लोकेशन निराळं. एकाच घरात आपापल्या खोल्यांत वेगवेगळी आयुष्य जगतात तसा त्यांचा प्रत्येकाचा पावसाळाही असेल वेगवेगळा. तशा निरनिराळ्या आठवणीही असतील स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या. निळ्या ताडपत्रीखाली अशी वेगवेगळी स्पेस नसते. कदाचित त्यामुळं सगळे गप्पच राहतात- कुणी काही बोलत नसल्याचं लक्षात येऊन. काहींची हीच अवस्था असेल थोड्याबहुत फरकानं. या अनुभवाची कविता झाली तर तीही हा फरक स्वच्छपणे मांडेल. म्हणजे यात कुणा एका अमुक वर्गाविषयीची तुच्छता नसेल तर सामाजिक-सांस्कृतिक प्रतीकं कशी भौगोलिकतेनुसार बदलत जातात, त्यांचा अर्थ कसा सामाजिक भेदभावाच्या संरचनेत दडलाय याचंच विवेचन सापडेल किंवा त्या दिशेने सजगतेनं उचललेलं पाऊल असेल. मुंबईत उड्डाणपुलाच्या अलीकडे-पलीकडे सामाजिक संदर्भ बदललेले त्वरित लक्षात येतात.

पशूमध्येसुद्धा पाणी समतोल राखतं
प्रदेशासारखं पाणी निळं हिरवं
ढग-आकाश जंगल-प्रकाश व्यापतं
पाणी अंतर वाढवतं
डोळ्यातल्या पाण्यापासूनचे
हृदयातल्या पाण्यापर्यंत
नि त्या पाण्यापासूनचे
परत मानवी पाण्यापर्यंत

तुळसी परब यांच्या कवितेतील हा तुकडा आहे. त्यातील ‘पाणी अंतर वाढवतं’ या ओळीला मी सहजासहजी सामोरं जाऊ शकत नाही. पाण्यात शोषण आहे आणि अंतर पडण्याचं कारणंही या शोषणात आहे. पाऊस शोषणाचेही अंधारकोपरे दाखवतो. मुंबईत हे कोपरे उजळून निघत नाहीत. एक कटिंग मारतानाच्या मधल्या वेळेत बकाल वस्त्या, नाले-नद्या, रिडेव्हलपमेंट, मराठी माणूस, म्युच्युअल फंड, SIP, अस्मिता, वगैरे कैक गोष्टी वर्तुळासारख्या वारंवार चालत असताना हा शोषणाचा मुद्दा कसा काय पद्धतशीरपणे राजकीय डावपेचांसारखा बाजूला सारला जातो हेही ठळक होण्याइतपत लक्षात येतंय, हेही चांगलंच म्हणायला हवं. पाऊस निनादत असतो तेव्हा शहर कसं दिसतं हेही आतून पाहायला हवं. आतलं पोखरलेलं गर्भाशय त्याशिवाय दिसणार नाही. पाऊस ही देखील एक बाजू वर आणतो. आल्हाददायक, मनोरम्य वातावरण कसं असतं हे पावसाळातल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून समजत नाही, ही एक मोठीच गोष्ट म्हणायला हवी.

पावसाळ्यात मन प्रसन्न होतं म्हणजे नेमकी कायकाय घुसळण होते मनात, डोक्यात याचाही शोध घ्यावासा वाटतो कधी नव्हे तो. हे सगळं एकरेषीय वाटत असेल, पण तसं बिलकूल नाहीय. अनुभव अस्सल असल्यावर कृत्रिमतेचा आव आणता येत नाही. अनुभवाला काही प्रोसेस करता येत नाही फोटोसारखं.

हेही वाच – तवायफनामा एक गाथा

दुसरीकडे मरीन ड्राइव्हने पावसाळ्यातले उमलते होकार-नकार पचवले असतील कैक, पण वरळी किल्ल्यावर मारुतीच्या मंदिरासमोर ओळखीचं कुणीतरी बघेल म्हणत आपल्या प्रेयसीला जन्माच्या शपथाही घातल्यात कैक जणांनी या भर पावसात. ही एक सुसंगत आठवण आहे. मुंबईच्या पावसाची आणि रंग उडालेल्या खोलीतील बुरशीची ओल भिंतींना पाठ टेकून बसल्यावर गारव्यासारखी लागते अशीही एक अविस्मरणीय आठवण आहे. मालडब्यात गालाला हात लावून एकरेषीय पाहणारी कित्येक माणसं पाऊस कसा पाहत असतील? असं वाटल्यावर पुन्हा पाऊस पाहण्याच्या शक्यता विस्तारतात. केवळ नैसर्गिक कृतीशी अशा आठवणींना जोडता येत नाही. एका गोष्टीचे सहसंबंध दुसऱ्या कशात तरी सापडतात तसं पाऊस या घटनेकडे पाहताना कुठल्या लोकेशनवरून कोण कसा त्याकडे पाहतोय हेही अस्पष्टसं जाणवू लागतं. आनंद देणाऱ्या घटना दु:खही देतात. पावसाळ्यात कुठं तरी गळतंय म्हणून पाय आखडून झोपावं लागणाऱ्या डोळ्यांना कोणती lokrang स्वप्न पडत असतील?

दु:खात प्रेयसीनं प्रियकराचा हात हातात घेऊन चोळावा तसा मी या अनुभवांना चोळत राहतो. पावसाळ्यात मला अजिबात मस्त वाटत नाय.

Pkokare26@gmail.com

(कवी मनाचा गद्यालेखक आणि संपादक. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या पहिल्याच कादंबरीला यंदाच्या साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी नामांकन.)