‘मतदार नकोत, नागरिक हवेत!’ (‘लोकरंग’- १० जुलै) हा विश्वंभर चौधरी यांचा लेख वाचला. आता मतदार तरी भारतीय राज्यघटनेनुसार राहिलेत का, हाही प्रश्नच आहे. कारण ग्रामीण भागात ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदारांनाच मतदानापूर्वी शपथ घ्यावी लागते. निवडणुकीपूर्वी ग्रामीण भागात कपडय़ात गुंडाळलेला नारळ घेऊन स्थानिक पुढारी कुणाला मतदान करणार हे त्यांच्याकडून वदवून घेतात. तो नारळ विशिष्ट देव/ देवीचा असल्याचं सांगितलं जातं. या प्रथेला निरक्षरांपासून सुशिक्षितांपर्यंत सर्वच बळी पडतात. आणि हे महाराष्ट्रात घडतंय.. ज्या महाराष्ट्रानं अंधश्रद्धेसंबंधी कायदा केला आहे! दुसरा मुद्दा- ग्रामसभा. लोकांना लोकशाहीत सामावून घेणारी घटनात्मक व्यवस्था! पण ग्रामीण भागात नजर फिरवली तर लक्षात येईल की किती ठिकाणी ग्रामसभा वेळेवर होतात! ज्या होतात त्या केवळ ग्रामसेवकाकडून रजिस्टरवर सरकारी नोंद म्हणून होत असतात. परंतु अजून ग्रामीण भागातील किती लोकांना ग्रामसभा म्हणजे काय हे माहीत आहे? दुसरं म्हणजे विधीमंडळ किंवा संसदेत निवडून जाणारा माणूस हा आपला प्रतिनिधी आहे हेच आपण विसरून चाललो आहे. त्यामुळेच ज्यांना निवडून दिलं त्यांना आपण ‘मालक’ झाल्यासारखं वाटू लागतं. एखाद्या नेत्यानं गावात केलेली सुधारणा ही मतदाराला त्याच्यावर केलेले उपकार वाटतात. ते काम आपणच दिलेल्या करांच्या पैशातून झालेलं आहे हे मतदार विसरूनच जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा