‘लोकरंग’मधील सिंहस्थ आणि कुंभमेळा यांच्याशी संबंधित लेख वाचले. ते वाचून आपण सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रात राहतो आहोत असे वाटले. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळ व आत्महत्यांचा क्षणभर विसरच पडला. कुंभमेळ्यावर २५०० कोटी रुपये खर्चा पडले. पण राज्याच्या तिजोरीत तर खडखडाट आहे! मग हे पैसे कुठून येणार? शेवटी ते जनतेच्या खिशातूनच जाणार आहेत. त्यात मंत्री, सरकारी अधिकारी हात धुऊन घेतात, हे न कळायला सामान्य जनता नक्कीच दुधखुळी नाही.
तेव्हा प्रश्न असा पडतो, की यांना दगडातला देव दिसतो, पण माणसांतला देव कधी दिसणार? अशावेळी आठवण येते ती बाबा आमटे यांची. पंचाहत्तर वर्षांपूर्वी त्यांना एका महारोग्यात देव दिसला. मग अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर सगळेच आनंदवनात येऊ लागले. बाबा आणि साधनाताई त्यांनाच देव मानून त्यांची सेवा करू लागले. आज बाबा आमटे यांची तिसरी पिढी आनंदवन, हेमलकसा येथे कार्यरत आहे. तेथे देऊळ नाही. कारण त्यांची धारणा आहे की, देव देवळात नसतो, तो पीडितांत असतो. त्यामुळेच आनंदवनात देऊळ नाही, तरी ते आधुनिक तीर्थस्थळ झाले आहे. दु:खाची बाब एवढीच आहे की, सरकार एवढा प्रचंड खर्च कुंभमेळ्याकरिता करते, पण आनंदवन आणि हेमलकसाला आर्थिक मदत मात्र मिळत नाही. तरीही आम्ही आमचा महाराष्ट्र ‘पुरोगामी’ आहे असं म्हणायचं. कुठं नेऊन ठेवला आहे तुम्ही आमचा महाराष्ट्र?
प्रफुल्लचंद्र आणि शिल्पा पुरंदरे, वर्सोवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा