हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com
पुरोगामित्वाची व्याख्या आणि तिचे काही मोजके आयाम तपासताना आपण गेल्या लेखात चर्चेला थोडं वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला. पुरोगामी-प्रतिगामी इत्यादी विषयांची चर्चा मुख्यत्वे जातीयता, पुरोगामी विचारवंत, तत्त्वज्ञ व नेते, पक्ष व राजकीय विचारसरणी या अंगाने बहुतांश जाते. आणि वेगवेगळ्या नामवंत अभ्यासक, कार्यकर्त्यांच्या, विचारकांच्या मांडणीतून किंवा गेलाबाजार सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि या ‘पोस्टी’य रणकंदनातून आपण ती नेहमीच वाचत असतो. अभ्यासकीय मांडणी आणि सिद्धांतन यांच्याशिवाय पुरोगामित्वावरील चिंतन पुढे जाऊ शकत नाही याविषयी काही शंका घ्यायचं कारण नाही. मात्र, आपल्या या लेखात नेहमीचा सिद्धांतपर बोजडपणा टाळून, एरवी चर्चेत न येणारे स्फुट मुद्दे हाताळून आपण या विषयाचा परामर्श घेऊ.
तर आपण गेल्या भागात पाहिलं त्यानुसार ऑर्कुटने भारतीय शहरी, निमशहरी भागांतील समाजात, विशेषत: तरुण आणि मध्यमवयीन समाजगटांत अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचा फायदा झालेल्या मध्यमवर्गीय आई-वडिलांची ८०-९० च्या दशकांत जन्मलेली, आपल्या आई-वडिलांचे वाढत जाणारे पगार आणि त्यामुळे सुधारणारं जीवनमान याचा कळत-नकळत अनुभव घेत वाढलेला मी व माझ्या पिढीतील निम्न-मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय मुलं या नव्या चावडीवर रमू लागली. तिथल्या कम्युनिटीज्, ग्रुपवर सहभागी होणारी स्वप्नील मध्यमवर्गीय कोशातील ही मुलं बौद्धिक-निमबौद्धिक चर्चा, गप्पाटप्पा, त्यातून सुरू होणारे ऑनलाइन आणि प्रत्यक्षातले कट्टे यांत रमू लागली. या व्यासपीठांचे राजकीय-सामाजिक घुसळण करण्याचे सामथ्र्य ही व्यासपीठे वापरणाऱ्या वर्गाला माहीत होण्यासाठी २०१० चं दशक उजाडायचं होतं. ऑर्कुट येऊ घालायच्या काही दिवस आधी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्था या जगभरातील अभ्यासकांमध्ये मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेवर झालेला हल्ला तोवर तुलनेनं थंडावलेल्या अशा मराठी सांस्कृतिक-सामाजिक विश्वाला हादरवून गेला. या हल्ल्याचे कारण सांगण्यात आलेली शिवरायांची बदनामी व त्याचा दोष माथी मारण्यात आलेल्या अभ्यासकांची ब्राह्मण जात (यातील काही अभ्यासक संबंधित जातीचे, ब्राह्मण जातीचे नव्हते, हा भाग अलाहिदा.) ही निमित्ते शासकीय स्तरावरील काही नामवंत व सभ्य अशा मंत्री इत्यादी घटकांकडूनही निर्देशिली गेली. या साऱ्यातून मराठी समाजातील वातावरण मोठय़ा प्रमाणात ढवळून निघाले आणि त्यातूनच पुढे चित्पावन संमेलन, बहुभाषिक ब्राह्मण संमेलन, मराठा संमेलन अशी जातीय संमेलनं भरवली गेली. आपल्या जातीच्या कळपाची अस्मिता चुचकारणाऱ्या या संमेलनांसाठी युरोप-अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या आणि संबंधित जातींत जन्मलेल्या व्यक्तींपासून ते पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ातील छोटय़ा गावांतून आवर्जून येऊन या संमेलनांमध्ये माणसं सहभागी झाली. जातीच्या संमेलनांसाठी खास विदेशांतून आलेल्या लोकांविषयी वृत्तपत्रं आणि नियतकालिकांतून पुष्कळ चर्चा झडल्या. त्यातून समोर आलं- महाराष्ट्रात पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी सिद्ध झालेलं ओंगळ, विषाक्त असं जातीय वास्तव! पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या पक्षांना यातून त्यावेळी येणाऱ्या निवडणुकांत राजकीय पीक उगवता आलं हे खरं असलं तरी एकीकडे राजकीय पटलावर ओबीसी आरक्षणाच्या राजकारणाचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली होती व दुसरीकडे ऑर्कुट आणि त्यावर मात करून अधिक लोकप्रिय झालेलं फेसबुक या समाजमाध्यमांवर वेगळीच खिचडी शिजू लागली होती. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात जात हे वास्तव संस्कृती, श्रद्धा आणि पुरोगामी विचारसरणीच्या पडद्याआडून वारंवार डोकावणं ही गोष्ट तशी नवीन नाही. भांडारकर संस्थेवर झालेला हल्ला, त्यातून मराठा आणि ब्राह्मण या जातींमध्ये निर्माण झालेली उभी दुही याचे पडसाद समाजमाध्यमांवर दिसू लागले. एरवी जातीय-धार्मिक वैशिष्टय़ं, सांस्कृतिक-भाषीय जाणिवा आणि देशी राहणीमान यापासून काळानुरूप दुरावू लागलेल्या, पाश्चात्त्य जीवनशैलीचं अनुसरण करणाऱ्या तरुण पिढीतील मुलामुलींचे जातीय-पोटजातीय गट, कंपू समाजमाध्यमांवर उभे राहिले. शुद्ध कडवे जातपण जपणारे, आंतरजातीय विवाह न केलेल्यांनाच प्रवेश देणारे फेसबुक ग्रुप १०-१५ हजारांच्या सभासद-संख्येने भरून गेले. तिथे आपल्या जातीवर झालेले अन्याय, हल्ले यांवर चर्चा झडू लागल्या. असुरक्षितांमध्ये स्थान पटकावण्यासाठी सज्ज असलेल्या पुनरुज्जीवनवादी वृत्ती आणि रूढीवाद पद्धतशीरपणे रुजवला गेला. दुसरीकडे उच्चजातीय पृष्ठभूमी/ अभिनिवेश नसलेल्या, पण व्यापक हिंदुत्वाची पताका फडकावणाऱ्या युवकांच्या वेगवेगळ्या सेना, प्रतिष्ठानंही सुरू झाली. रांगोळी, देव, देश, संस्कार इत्यादी शिकवणाऱ्या वर्गाची जागा इतिहासप्रेमी वर्ग, मोडी लिपीचे वर्ग यांनी घेतली. ट्रेकिंग क्लब, फिरस्तीचे समूह यांची जागा गड-किल्ले मोहिमांनी घेतली. आणि यातून उत्तराधुनिक काळातील तंत्रज्ञान-वैज्ञानिक प्रगतीचे फायदे घेणाऱ्या तरुण वर्गात पुनरुज्जीवनवादी विचार पद्धतशीरपणे रुजवला गेला व त्यातूनच धर्मवादी राजकारणाला गती मिळून संबंधित विचारसरणी समाजात खोलवर रुजली. या साऱ्याचे वर्तमान राजकीय पटलावर दिसून येणारे प्रत्यक्ष परिणाम आणि त्यांची युक्तायुक्तता यावर वाद-चर्चा मराठी समाजमाध्यमांवर रोज झडत असल्याने येथे त्याचा नव्याने उल्लेख करण्याची गरज नाही.
या साऱ्या गोष्टींचा विचार करताना लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे, की हे सारं काही विशिष्ट नागरी परिप्रेक्ष्यात घडतं आहे. अर्थात हा नागरी परिप्रेक्ष्य केवळ शहरी-निमशहरी भागात असतो असं नाही. शहरी जातीय/वर्गीय जीवनमान, आहार-आचारपद्धतींना ग्रामीण भागात पोहोचवून जातवास्तवाच्या शहरी अवताराला आपल्या ग्रामीण सरंजामी व्यवस्थेत पोहोचवण्याचं काम दूरचित्रवाणीवरील मालिका व चित्रपटांतून रीतसर होतच असतं. इंटरनेटचं महाजाल पसरवणारे सूत्रधार शहर-खेडय़ांतील आर्थिक दरी भरून काढण्याचं काम करण्यास फारसे उत्सुक दिसत नसले तरी सांस्कृतिक अस्मिता आणि तिच्याशी संबंधित घटकांना पोसण्याचं कार्य महाजालातून रीतसर पार पाडतात. त्यात भर घालायला इतर घटक आपसूकच कामी येतात. आधुनिक नागरी जगातील वाढती स्पर्धा, पाश्चात्त्यीकरण आणि या साऱ्याला पचवून पुन्हा डोकं वर काढणारं जातवास्तव हे ऐतिहासिक मालिकांतील आलवणातील बायका, उंची, श्रीमंती बंगल्यांतून पुढे येणारे गोरेगोमटे चेहरे आणि तथाकथित शुद्ध उच्चार, राजा-महाराजांच्या व देवी-देवतांच्या जीवनपटांतून जागवल्या जाणाऱ्या आणि कालानुरूप चौकटीत रुजवल्या जाणाऱ्या सांस्कृतिक स्मृती इत्यादी माध्यमांतून शहरी तसंच ग्रामीण समाजातील सर्वच वर्गात लोकप्रिय होत जातं. मात्र, त्याचा आकर्षणबिंदू एकांगी विकास होऊन फुगलेली शहरं आणि त्यातील उच्चभ्रू समाज हाच राहतो. एकीकडे पुरुषसत्ताक वर्णव्यवस्थेतून उभी राहिलेली विषमताप्रवण शोषणप्रणाली आजही खेडय़ापाडय़ांतून निम्नजातीय वर्गातील स्त्री-पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांतून, मेट्रो आणि बुलेट ट्रेनची स्वप्नं पाहणाऱ्या शहरांतील मैलासफाई करण्याचं पिढीजात काम करणाऱ्या वर्गाच्या असहाय, दुर्लक्षित मरणांच्या मालिकांतून अधिक ठळक आणि भयप्रद भासू लागते. अशावेळी समाजमाध्यमांवर वेळ घालवायचे प्रीविलेज लाभलेल्या सर्वजातीय-विचारसरणींच्या वर्गाचे नैतिक-धार्मिक-प्रागतिक हट्ट, त्यावरून झडणाऱ्या वाद-चर्चा, आक्रमक अभिनिवेश अनेकदा कृतक भासतात. अर्थात समाजमाध्यमांचे आपले असे महत्त्व आहेच. त्यांतून अनेक विधायक, समाजबांधणीची कामं झाल्याची शेकडो उदाहरणंदेखील देता येतात. मात्र त्यांचा वापर करणारा, समाजात, वैचारिक विश्वात सक्रिय असलेला गट आणि रोज उपलब्ध होणारा डेटा खर्च करण्यासाठी जातीय-धार्मिक चिखलफेक करणारा वर्ग यांचीही हजेरी या समाजमाध्यमांवर आक्रमकपणे सतत प्रत्ययाला येत असतेच.
ते असो. समाजमाध्यमांतून पुनरुज्जीवनवाद व त्यायोगे धर्म-समूहवाद कसा फोफावला जातो याचे ताजे आणि विद्यमान उदाहरण आपण वरच्या केसमध्ये थोडक्यात पाहिले. खरे तर पुरोगामी किंवा प्रतिगामी या धारणा किंवा जगातील कोणत्याच धारणा आणि त्या धारणांशी नातं सांगणाऱ्या व्यक्ती/व्यक्तिसमूह यांची प्रकृती आणि वृत्ती एकसाची असू शकत नाही. गेल्या लेखात आपण पाहिलं त्यानुसार ‘आर्य’ या शब्दाचा मागोवा घेतल्यास त्याचा एक अर्थ आपल्या समूहाशी संबंधित असलेली, भाग असलेली व्यक्ती असा होतो. ‘आर्य’ ही कल्पना आज रूढ असलेल्या वैदिक-ब्राह्मणी चौकटीतील व्यवहारांशी आणि त्यातून निपजलेल्या राजकीय-सामाजिक आयडेंटिटीशी संबंधित असली तरी त्या शब्दातून ध्वनित होणारा श्रेष्ठत्वगंड हा विचारसरणीनिरपेक्ष होऊ लागतो. खरं तर ‘आर्य’ हा शब्द वैदिक आणि बौद्ध-जैन या परस्परविरोधी विचारविश्वांत वापरला गेला आहे. आपला विचार हा श्रेष्ठ, सम्यक असल्याची धारणा या शब्दाच्या वापरातून अभिव्यक्त होते. पुरोगामी किंवा प्रतिगामी म्हणवून घेणाऱ्या वर्गात आपापल्या वैचारिक/ जीवननिष्ठा व त्यातून आलेल्या आपपरभावाच्या जाणिवा या अशाच श्रेष्ठत्वगंडातून एकसाची, कर्कश आणि बांधीव होऊ लागल्या आणि त्यातून बहिष्काराचे किंवा वर्जनाचे राजकारण (politics of exclusion) आकार घेऊ लागले. यातून अगदी पुरोगामी, प्रागतिक म्हणवून घेणाऱ्या वर्गातदेखील किंचित मतभेदावरून एकमेकांवर कुरघोडय़ा आणि आपल्या मतांचा आग्रह वाढून त्याला द्वेषाचे आयाम मिळू लागले.
गेली काही वर्षे समाजात टोकाचा विद्वत्द्वेष, प्रागतिक वर्गातील काही लोकांच्या विसंगतीपूर्ण वर्तनांच्या ठरावीक उदाहरणांवर बोट ठेवून सबंध पुरोगामी विचारव्यूहाला नकारात्मक रंगात रंगवायचे उद्योग अनेक समूहांतून सुरू झालेले दिसतात. टोकाच्या धार्मिक-कम्युनल वातावरणाला विरोध करता करता अधिक आक्रमक होऊ लागलेल्या पुरोगामी वर्तुळांतील काही घटकांकडून बहुसंख्याक (सर्वजातीय) समाजातील श्रद्धा, रीती किंवा आचार यांचा हिणकस, तुच्छतापूर्ण भाषेत समाचार घ्यायची रीत बळावू लागली आहे. वेगवेगळ्या जातसमूहांतील लोकश्रद्धा, धर्मआचार, कर्मकांडे ही आपल्या समाजातील ढळढळीत वास्तवे आहेत. त्यांच्या आधाराने उभ्या राहून फोफावलेल्या शोषणव्यवस्था आणि त्यांचे एजंट्स यांच्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्यांचा प्रसार थांबवून समाजाला विचारप्रवृत्त करणं, ही आजच्या एकारल्या सत्ताधीशांची चलती असलेल्या जगात मोठीच गरज बनत चालली आहे. यासाठी समाजाला आपलंसं करून घेत, त्यांच्या कलानं त्यांना त्यांच्या सामाजिक-नैतिक जाणिवा आणि श्रद्धा यांच्याविषयी विचार करण्याची सवय लावणं ही एक शाश्वत आणि दीर्घकालीन प्रक्रिया ठरणार आहे. अशावेळी संयम आणि आत्मीयता दाखवत समाजाला आपलंसं करत अभ्यासमूल्यं आणि वैचारिक शिस्त समाजात रुजवणं हे पुरोगामी वर्तुळासमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आजच्या काळात तुच्छतापूर्ण रीतीने समाजाला झिडकारून बौद्धिक श्रेष्ठतेचा गंड मिरवणं हे गतयुगातील धर्ममरतड आणि विद्येच्या ठेकेदारांच्या विकृत अहंगंडाशी साधम्र्य जागवणारं ठरेल, ही जाणीव पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या वर्गाने लक्षात घ्यायला हवी. माणूस वैयक्तिक स्तरावर आपला लिंगभाव, वातावरण, जडणघडण आणि आपणा सर्वाना जखडून टाकणाऱ्या बाजारपेठेच्या शृंखलांतून लादल्या गेलेल्या गरजा यांतून घडत असतो, हे आजच्या आधुनिकोत्तरतेला ओलांडून पुढे आलेल्या समाजातील खरं वास्तव अधिक गडद होत आहे. मुळातच वेगवेगळ्या परिस्थित्यनुरूप कारणांमुळे निर्माण होणारे वैयक्तिक आयुष्यातील विरोधाभास, वैचारिक निष्ठांच्या गाभ्याशी त्यांची असलेली विसंगती सर्वाच्या जगण्याला व्यापून दशांगुळे उरते आहे. अगदी हार्डकोअर अभ्यास-संशोधनविश्वाच्या वर्तमानाकडे लक्ष दिलं तरी आपल्या लक्षात येईल की जातीय संघर्ष, कामगार चळवळी, वर्गीय-जातीय शोषणाचा इतिहास, आर्थिक विषमता, धार्मिक श्रद्धांचे विरोधाभास तसेच श्रद्धा-नीतिधर्माच्या पताका फडकावणाऱ्या घराण्यांतील/ समूहांतील संघर्षांचा इतिहास इत्यादी विषयांचा अभ्यास केल्यावर ते विषय शिकवण्यासाठी आणि रोजगार मिळवण्यासाठी ज्या विद्यापीठांतून व संशोधन संस्थांमध्ये नोकऱ्या मिळवल्या जातात, त्या संस्थांची सूत्रे एकतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भांडवलशहांच्या हाती तरी आहेत, किंवा त्यांना उपलब्ध होणारा निधी अशा तऱ्हेच्या कॉर्पोरेट विश्वातूनच येतो. उत्तम शैक्षणिक दर्जा व विद्वत्ता संपादन करून अर्थनि:स्पृह वृत्तीने काम करणारी पिढी आणि त्या पिढीचे औचित्य बाजारपेठांनी अर्थहीन ठरवून टाकले आहे. अशा वेळी वैचारिक निष्ठा आणि चळवळीचा वारसा सांगताना हे विरोधाभास वारंवार समोर येत राहतात. विद्यमान करोनाच्या भयावह काळात देशातील भांबावलेल्या, मरण आणि मरणप्राय असहायतांनी वेढलेल्या श्रमिकवर्गाला उद्देशून ‘रेल्वेच्या रुळांवर झोपले म्हणून मेले, उघडय़ावर राहतात आणि करोना पसरवतात, यांच्या मोहल्ल्या/ वस्त्यांमुळेच करोना जास्त पसरतो आहे..’ वगैरे वाक्यं सर्वजातीय मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय समाजात वावरताना वारंवार कानी पडतात. करोनाच्या काळात निर्माण झालेल्या जागतिक बाजारपेठेतील तीव्र संघर्षांमुळे कदाचित या साऱ्या विरोधाभासांना, वर्गजाणिवांना आता नवी परिमाणं मिळू लागतील. वर्गसंघर्ष, विषमता यांच्या नव्या चौकटी उभ्या राहतील. जातीय अस्मिता आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या बाजारांची व्याप्ती अधिक व्यापक होईल. अशावेळी पुरोगामी आणि प्रतिगामी गटांतील विरोधाभासांनादेखील तितकीच गतिमानता प्राप्त होईल. अशा काळात श्रद्धा-अश्रद्धांविषयीचा विवेक, जातींच्या अस्मिता, धर्माचे आणि धर्मपालनाचे औचित्यानौचित्य यांचा नव्याने, नव्या चौकटींत विचार करायची गरज येऊन ठेपली आहे\
(लेखक ‘ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)