‘प्रेम’ ही भावना प्रत्येक सजीवासाठी महत्त्वाची आहे. प्रेम ही माणसाला मिळालेली फार महत्त्वाची देणगी आहे. म्हणतात ना, की प्रेम हे देवाघरचे देणे. जीवनात काही जणांना भरभरून प्रेम मिळतं, तर काही जण अखेपर्यंत प्रेमाच्या शोधामध्ये राहतात, तरीही ते त्यांना मिळत नाही. प्रेम ही सुंदर भावना तर आहेच; परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भारतीय सिनेमांमध्येदेखील प्रेमाचं स्थान अव्वल आहे. ९८% भारतीय चित्रपट नायक-नायिकेच्या प्रेमाविना बनले जात नाहीत.
भारतीय चित्रपटांचा आरंभापासूनचा इतिहास बघितला तर लक्षात येतं की, हिंदी चित्रपटांच्या कथानकांमध्ये प्रामुख्याने ‘प्रेम’, ‘प्यार’, ‘इष्क’, ‘मोहब्बत’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कधी प्रेमाचा त्रिकोण, तर कधी दोन प्रेमी जीवांच्या विरुद्ध उठलेले दुनियावाले, तर कधी दोन धर्मामधले प्रेमिक अशा कथानकांवरचे चित्रपट सातत्याने बनवले जातात. चित्रपटाचं कथानक भले काहीही, कोणत्याही विषयावर असो; पण ते हिरो-हिरॉईनच्या प्रेमाशिवाय अधुरे असतात. भारतीय प्रेक्षकांनादेखील हिरो-हिरॉईनविरहित चित्रपट बघायला शक्यतो आवडत नाहीत. प्रेमचित्रपटांसाठी- रोमॅंटिक चित्रपट तर भारतीय प्रेक्षकांची पहिली पसंती असते.
हेही वाचा : विचित्रपट तयार करताना..
ज्या ‘लव्ह स्टोरीज’ आजपर्यंत रुपेरी पडद्यावर आल्या आणि त्यातल्या ज्या विविध कारणांमुळे ‘हिट्ट’ झाल्या, त्यातल्या काही वेचक प्रेमकथापटांचा रोचक परिचय कर करून देणारं पुस्तक म्हणजे सिनेविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ सिने पत्रकार अनिता पाध्ये लिखित ‘प्यार जिंदगी है!’ हे पुस्तक हिंदी रोमँटिक चित्रपटांच्या निर्मिती प्रवासावर आधारित असून, निवडक १२ प्रेमपटांचा पडद्याआडचा प्रवास त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये उलगडला आहे.
‘प्यार जिंदगी है!’, – अनिता पाध्ये, देवप्रिया प्रकाशन, पाने-३२७ , किंमत-६०० रुपये.