राम खांडेकर

सत्तेवर असोत वा नसोत, नरसिंह रावांच्या दैनंदिन जीवनात कधीच फरक पडला नाही. त्यांना ना कसले व्यसन होते, ना हौस होती. पंतप्रधानपदी आल्यानंतरही त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. त्यांनी कधी जमीन सोडली नाही की कधी वैभवाचा उपभोग घेतला नाही. अगदी साधे, सरळ असे त्यांचे जीवन होते. पद मिळाले म्हणून त्यांना कधी फार आनंद झाला नाही आणि सत्ता गेली म्हणून ते कधी कष्टीही झाले नाहीत.

१९७१ च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’चा नारा देत इंदिरा काँग्रेस बहुमताने निवडून आली. इंदिराजींनी या परिस्थितीचा फायदा घेतला नसता तरच नवल! आपले आसन, सत्ता व नेतृत्व बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक राज्यांत आपले विश्वासू मुख्यमंत्री नेमण्याचे ठरवले. त्यात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचीसुद्धा उचलबांगडी झाली होती. परंतु नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव समजताच सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्या बातमीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता. कारण निवड करण्यात आलेली व्यक्ती हा सद्गुणांचा पुतळा होती. राज्यातील कोणा एका गटाचे, वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी ती नव्हती. राजकीय कुरघोडींमध्ये फारसा रस न घेता ‘आपण बरे की आपले काम बरे’ अशा प्रवृत्तीची होती. बातमीची शहानिशा केल्यानंतर ती खरी असल्याचे कळले. ती व्यक्ती होती- पी. व्ही. नरसिंह राव!

अनेक वर्षे निष्ठेने कार्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना एकदम बडतर्फ (त्यास गोंडस नाव होते- ‘पदमुक्त’!) करण्याच्या इंदिराजींच्या या कृतीशी नरसिंह राव बिलकूल सहमत नव्हते. त्यांना ते पटले नव्हते. लोकशाही प्रक्रियेत ही गोष्ट धक्कादायक तर होतीच; शिवाय घटनेने निर्माण केलेल्या पंतप्रधानपदाइतकेच राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या मुख्यमंत्रिपदाचे प्रथमच अवमूल्यन झाले होते. अशा प्रथा लोकशाहीला घातक ठरणाऱ्या आहेत याची जाणीव इंदिराजींना नसावी. दुर्दैवाने सत्तेवर कोणताही पक्ष येवो; हीच प्रथा थोडय़ाफार फरकाने आजही चालू आहे. मुख्यमंत्र्यांची निवड दिल्लीतच होते आणि औपचारिकतेसाठी दिल्लीहून राज्यात पर्यवेक्षक येतात. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव पदमुक्त मुख्यमंत्री सुचवतात. आमदारांच्या सभेत एकमताने (असे गृहीत धरले जाते!) त्या व्यक्तीची निवड होते. अनेकदा ती व्यक्ती राज्यात आमदार म्हणूनही निवडून आलेली नसते. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारी १९७५ ते १४ मार्च १९९५ पर्यंत- म्हणजे केवळ २० वर्षांत १३ वेळा मुख्यमंत्री बदलण्यात आले! इथे मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी खो-खो खेळाचे रूपकच सयुक्तिक ठरेल. लोकशाही परंपरेला धक्का पोहोचवणाऱ्या अनेक प्रथांपैकी ही एक. आता ती सर्वाच्याच अंगवळणी पडली आहे.

नरसिंह राव मात्र मुख्यमंत्रिपदासाठी फारसे उत्सुक नव्हते. कारण त्यांच्यासारखा ‘बृहस्पती’ त्याकाळच्या राजकारणात ‘फिट’ बसत नव्हता. परंतु दैवात जे लिहिलेले असते तेच घडते! नरसिंह राव मुख्यमंत्री झाले खरे; पण त्यांना एकाकी वाटत होते. त्यांचे विचार पुरोगामी होते. पण काम मात्र प्रतिगामी राजकारण्यांबरोबर करावे लागत होते. मुख्यमंत्री होताच त्यांनी प्रथम जमीन धारणा कायद्याविषयी चौकशी केली. मात्र, याबाबत फारशी प्रगती होऊ शकलेली नाही व होण्याची शक्यताही कमीच आहे अशी माहिती त्यांना मिळाली. तोपर्यंत नरसिंह राव कमाल जमीन धारणा धोरणाचा पाठपुरावा करीत होते. परंतु सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हे धोरण राज्यात अमलात आणण्यापूर्वी अनेक प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. लोकांच्या भावनाही लक्षात घ्याव्या लागणार होत्या. पक्षावर पकड असलेल्या एका गटाची नाराजीही ओढवून घेण्याची तयारी ठेवावी लागणार होती. थोडक्यात, प्रश्न फार नाजूक होता व त्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या पेचात असतानाच हे धोरण ताबडतोब अमलात आणण्यासाठी पंतप्रधानांकडून दबाव येत होता. खरं तर आतापर्यंत इंदिराजी या धोरणाच्या विरोधात होत्या. परंतु निवडणुकीच्या वेळी दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणे काहीतरी पावले उचलली जात आहेत असे जनतेला वाटायला हवे म्हणून याबाबतचे पाऊल उचलणे गरजेचे होते. नरसिंह रावांनाही ते पटले होते. परंतु केंद्राने निश्चित केलेली अनेक धोरणे प्रत्येक राज्यात अमलात आणणे अवघड असते हे आजवर  केंद्राच्या लक्षात आल्याचे दिसत नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेला निर्णय यादृष्टीने महत्त्वाचा ठरावा. तो निर्णय असा- की एखाद्या जातीला एका राज्यात आरक्षण असेल, परंतु दुसऱ्या राज्यात ती जात नसेल वा तिथे आरक्षण नसेल तर तिथे गेलेल्या त्या जातीच्या व्यक्तीस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. प्रत्येक राज्याची भौगोलिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते ही बाब कोणीच लक्षात घेत नाही. असो. नरसिंह रावांनी इंदिराजी व दिल्लीतील इतर काही श्रेष्ठींना कमाल जमीन धारणा कायदा एकदम लागू करणे कसे अवघड आहे याची कल्पना दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांचा सल्ला दिल्ली दरबारच्या दस्तुराप्रमाणे बिनमोलाचाच असतो. नरसिंह रावांचा नाइलाज झाला. थोडय़ाफार विलंबाने शेवटी हा कायदा अमलात आला. नरसिंह रावांचा सल्ला न ऐकता इंदिराजींनी आपला आग्रह कायम ठेवला. मात्र, नरसिंह रावांनी अपेक्षिल्याप्रमाणे तेथील एका समुदायाने दबावाचे असे पाऊल उचलले, की त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरणच बदलू लागले आणि पक्षासाठी तो धोक्याचा इशारा ठरू लागला. दिल्ली दरबारी आणि पंतप्रधानांकडे सर्व रोगांना एकच औषध असते, ते म्हणजे- आपली कातडी वाचवण्यासाठी कोणाला तरी बळीचा बकरा बनवणे!

विरोधाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यासाठी बकरा मोठा असण्याची गरज होती. म्हणून मग नरसिंह रावांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या आयुष्यातील हे एकमेव अल्पजीवी पद ठरले होते. जेमतेम दोन वर्षे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच खरे! परंतु नरसिंह रावांना त्याचे काही सोयरसुतक नव्हते. कारण त्यांना सत्तेची लालसा कधीच नव्हती. त्यानंतर ते राज्यात कधीच मंत्री झाले नाहीत. त्यांनी स्वत:ला जनसेवेत गुंतवून घेतले.

ते सत्तेवर असोत वा नसोत; त्यांच्या दैनंदिन जीवनात कधीच फरक पडला नाही. त्यांना ना कसले व्यसन होते, ना हौस होती. पंतप्रधानपदी पोहोचल्यानंतरही त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. त्यांनी कधी जमीन सोडली नाही की कसल्या वैभवाचा उपभोग घेतला नाही. ते नेहमी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान उठत. आठपर्यंत तयार होत. वर्तमानपत्रांचे वाचन आणि नाश्ता झाला की ते कामाला सुरुवात करीत. जेवणाची वेळ साधारणत: एक ते दीडदरम्यानची असे. जेवण शुद्ध शाकाहारी दक्षिण भारतीय पद्धतीचे! मात्र, त्यांच्या डोक्यात इतके विचार असत, की आपण काय जेवत आहोत, ताटात काय आहे, चव कशी आहे याची त्यांना शुद्धच नसे. स्वयंपाकी स्वत: जेव्हा जेवत असे तेव्हा त्याला जेवणात काय कमी-जास्त झाले हे कळत असे. कपडय़ांबाबतही त्यांची विशेष आवड-निवड नव्हती. त्यामुळे त्यांच्यापाशी भरमसाट कपडेही नसत. अगदी गरजेपुरतेच.

पंतप्रधान असताना ते तीन दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. एक दिवस सकाळी दहा वाजता राणीसोबत त्यांची भेट ठरली होती. नऊ वाजता ते तयार होऊन बैठकीच्या खोलीत येऊन बसले. (एका गोष्टीचे आश्चर्य वाटेल : नरसिंह रावांनी कधीही अंगाचा साबण वापरला नाही. एकदा मी कारण विचारले तर ते म्हणाले, ‘एकत्र कुटुंबपद्धतीमुळे आम्हा मुलांच्या दृष्टीस अंगाचा साबण कधीच पडत नसे. त्यामुळे तीच सवय आजही कायम आहे. आता तर त्याची गरजही वाटत नाही.’) माझे वरिष्ठ सहकारी रामू दामोदरन्सुद्धा तिथे आले होते. त्यांनी मला एका बाजूला नेऊन हळूच सांगितले की, ‘‘साहेबांचे मोजे सूटला मॅच होत नाहीएत. राणीकडे जायचे आहे. त्यामुळे त्यांना ते बदलायला सांगा.’’ दामोदरन् परराष्ट्र सेवेतले असल्यामुळे पोशाखाबाबत त्यांचा कटाक्ष असे. इंग्लंडची संस्कृतीही त्यांना माहीत होती.

नरसिंह रावांजवळ जाऊन मी त्यांना- ‘‘तुमचे मोजे सूटला मॅच होत नाहीत. आणि राणीला भेटावयास जायचे असल्याने ते बदलून याल का?,’’ असे विचारले. त्यावेळी पंतप्रधानांच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून तर मी पुतळ्यासारखा स्तब्धच झालो. काही सुचेचना. त्यांचे उत्तर होते, ‘‘माझ्याकडे दुसरे मोजे नाहीत. हेच आहेत.’’ मी दामोदरन् यांच्याकडे गेलो आणि पाचएक मिनिटे काही बोललोच नाही. हे पाहून त्यांनी विचारले, ‘‘अरे, क्या हुआ?’’ पंतप्रधानांचे उद्गार ऐकून त्यांनासुद्धा हसावे की रडावे, हे समजत नव्हते. मी आपल्या खोलीत जाऊन माझ्याजवळचे नवीन मोजे त्यांना दिले. सुदैवाने ते मॅच होत होते. नरसिंह रावांकडे गेल्यापासून त्यांच्या स्वभावाची आणि प्रवृत्तीची पारख करत गेल्याने कपडय़ांच्या बाबतीतील असा प्रकार होण्याची शक्यता गृहीत धरून बूट सोडून इतर कपडय़ांचा एक संच मी कार्यालयात व प्रवासात सदैव माझ्याजवळ बाळगत असे.

कपडय़ांप्रमाणेच पैशाचेही! त्यांच्या खिशात कधीच एक पैसाही नसे. एकदा ते पंतप्रधान असताना आम्ही अजमेर दग्र्यात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे दोन दर्गे होते. मोटारीतून उतरल्याबरोबर हळूच मी दोन्ही ठिकाणी टाकायचे पैसे निरनिराळे करून त्यांच्या खिशात ठेवले आणि त्यांना समजावूनही सांगितले. पहिल्या दग्र्याचे दर्शन घेऊन पाच-दहा मिनिटांनी पुढच्या दग्र्याच्या दर्शनाला गेलो, तर रावांनी मला जवळ बोलावून सांगितले की, ‘‘मी दोन्हीकडचे पैसे तिथेच टाकून दिले.’’

आमच्या मराठीतून बोलण्याचा फायदा आम्हाला अनेकदा मिळे. नरसिंह राव आपली सत्त्वपरीक्षाच घेतात की काय असे मला वाटू लागले. बाजूला जाऊन पुन्हा माझ्याजवळचे पैसे काढून त्यांच्याजवळ जाऊन कोणाच्या नकळत मी त्यांच्या खिशात टाकले. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा रीतीने अशी कामे करावी लागत असल्याने मला नेहमी त्यांच्या जवळूनच चालावे लागत असे. त्यांनाही इतकी सवय झाली होती, की काही देणेघेणे असले की मागे न पाहताच ते हात करीत.

पंतप्रधानपदी नसताना निमंत्रणावरून एकदा एका कार्यक्रमासाठी त्यांना आठ-दहा दिवसांसाठी परदेशी जायचे होते. ही साधारणत: २००० सालची घटना असावी. एक महिना अगोदर त्यांनी मला बोलावून सांगितले की, ‘‘आठ-दहा दिवसांसाठी नवीन सूट शिवण्यात काही अर्थ नाही. माझे जुने सूट आहेत ते एखाद्या शिंप्याला बोलावून उसवून पुन्हा फिटिंग करून घ्या.’’ मी माझ्या कॉलनीतील दोन-तीन शिंप्यांकडे जाऊन त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. पण त्यावर त्यांचा विश्वास न बसल्यामुळे त्यांनी येण्यास नकार दिला. शेवटी ज्यांच्याकडून मी किराणा माल घेत होतो त्याला सांगून एका शिंप्याला तयार केले. त्यांनी रावांचे माप घेऊन पुन्हा व्यवस्थित फिटिंग करून दिले.

नरसिंह रावांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते कधीही अधिकारवाणीने बोलत नसत. परंतु त्यांच्या वाणीत अधिकार मात्र असे. एकदा मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेलेलो असताना पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आटोपून नागपूरला परत मुक्कामासाठी येण्यास रात्रीचे साडेबारा वाजले होते. दौऱ्यात रात्रीचे जेवण एखाद्या कार्यकर्त्यांकडेच असे. यानिमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी निवांतपणे होत. कार्यक्रमास निघण्यासाठी दुसऱ्या दिवशी ते तयार होऊन दिवाणखान्यात आले. आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वगैरे मंडळी बसली होते. नरसिंह राव म्हणाले, ‘‘आज मला किती वाजता परत आणणार आहात?’’ मी म्हणालो, ‘‘रात्रीचे जेवण आजही कार्यकर्त्यांकडेच आहे. त्यामुळे कालचीच वेळ गृहीत धरावी लागेल.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘उद्या सकाळी आपल्यासाठी येणारे विमान रात्रीच मागवता येईल का? म्हणजे इथे येण्यापेक्षा दौऱ्यावरून आपण रात्री विमानतळावरून सरळ दिल्लीला जाऊ. दिल्लीत मुक्कामाला गेलो तर सकाळपासून कामास सुरुवात करता येईल. तसंच झोपसुद्धा पूर्ण होईल.’’ हे ऐकून आमदार म्हणाले, ‘‘साहेब, विमान रात्रीच बोलावून घ्या असे का नाही सांगत त्यांना?’’ त्यावर नरसिंह रावांनी उत्तर दिले, ‘‘दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण ते कितपत शक्य होऊ शकेल हे पाहण्याची जबाबदारी व त्यातल्या अडचणी त्यांना माहीत आहेत. याबाबत काय अडचणी येण्याची शक्यता आहे याची मला कल्पना आहे. कारण विमान गृह मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रातील आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते दुसरीकडे असण्याची शक्यता असते. म्हणून हा प्रश्न कसा सोडवायचा, हे ते पाहतील.’’ त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण गप्प झाले. खरं तर मंत्रिमंडळातील नरसिंह रावांचे स्थान पाहता त्यांना सीमा सुरक्षा दलाचे विमान वापरण्याची परवानगी होती.

सर्वसामान्यांचा विश्वास बसणार नाही असे अगदी साधे, सरळ त्यांचे आयुष्य होते. पद मिळाले म्हणून त्यांना कधी फार आनंद झाला नाही किंवा सत्ता गेली म्हणून ते कधी कष्टीही झाले नाहीत. त्यांचे हे जीवन पाहून मला गीतेतील एका श्लोकाची आठवण होते..

‘अद्वैष्टा सर्व भूतानाम् मैत्र: करुणकवच।

निर्ममो निरहंकारी समदु:खसुखदा मी।।’

अर्थात कोणाशीही शत्रुत्व, वैरभाव नसलेल्या, सर्वाबद्दल सहानुभूती, मित्रत्व असलेल्या शांत, स्थिर स्वभावाचा माणूस सुखात व दु:खातही खंबीर राहतो. सर्व धीराने घेतो.

..दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना नरसिंह रावांवर केलेल्या अन्यायाची कुठेतरी खंत वाटत असावी. शिवाय पक्षातील इतक्या विद्वान कार्यकर्त्यांस वाऱ्यावर सोडून देणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे याची कल्पना त्यांना आली असावी. म्हणूनच पंतप्रधान इंदिराजींनी त्यांना दिल्लीत बोलावून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरीपद तर दिलेच; शिवाय राजकीयदृष्टय़ा आव्हानात्मक अशा ईशान्येकडील राज्यांची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर सोपवली. नरसिंह रावांनी याचा पूर्ण उपयोग करून घेतला व तेथील राजकीय-भौगोलिक स्थिती, लोकांच्या गरजा, वृत्ती-प्रवृत्ती यांचा सखोल अभ्यास करून पक्षाला तिथे प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नरसिंह रावांचे दिल्लीतील हे पाऊल त्यांच्या भावी उत्कर्षांचा मजबूत पायाच ठरला. यशवंतरावांप्रमाणे आपल्या राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या नरसिंह रावांच्या व्यक्तिमत्त्वाला आता राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळाले होते. दिल्ली दरबारालाही त्यांचे महत्त्व समजले असावे. म्हणूनच..

ram.k.khandekar@gmail.com