प्रचारक असलेल्या व्यक्तीचे रोजचे जीवन कंटाळवाणे असते. जोपर्यंत आपण राष्ट्रकार्य करत आहोत ही भावना असते तोपर्यंत त्याचे काम चालू राहते. त्यानंतरही तो कामात राहिला व त्याला वैयक्तिक प्रगतीची ओढ नसेल तर त्याला नंतर कुठे लपवावे अशी परिस्थिती तयार होते. लेखात दिलेल्या पहिल्या पाच प्रचारकांपैकी कोणीच सरसंघचालक झाले नाहीत. अचानक प्रचारक नसलेले गोळवलकर गुरुजी प्रमुख झाले. त्यांनी देशाची फाळणी स्वीकारली, पण संघटना वाचवत जवळपास तीन पिढ्या नेतृत्व केले. दरम्यान त्यांनी काही वादग्रस्त मुलाखती दिल्या, विधाने केली व लेख लिहिले. यातील अनेक विचार आजही संघ परिवारच्या गळ्याशी येतात. तरीही त्यांचे उदात्तीकरण आजून थांबत नाही. गुरुजींचे मोठेपण लोकांना समजत कसे नाही? असा भाबडा प्रश्न त्यांना पडतो. त्यांनतर सरसंघचालक झालेल्या देवरसांनी जातिप्रथेच्या विरोधात जी ठाम भूमिका घेतली, त्यांना संघटनेत गुरुजींच्या एवढी किंमत नाही.

गेल्या १०० वर्षांत संघाचा चेहरा अजूनही एका विशिष्ट वर्गाचा आहे. तो आणखी काळ तसा राहील असे दिसते. एका मागास समाजातील मुलाला हिंदू समाजातील इतिहासात गौरवशाली काही आहे असे कसे पटू शकेल हे समजत नाही. आदिवासीबहुल क्षेत्रात काम असलेल्या वनवासी कल्याण आश्रमातून अनेक पदवीधर, डॉक्टर, इंजिनीअर झाले असे सांगण्यात येते, पण तो आश्रम चालवण्याचे काम वनवासी समाजाकडे अजून नाही. अजून त्यांची तयारी नाही असे सांगण्यात येते. अजून दोन-तीन पिढ्या लागतील असे म्हणतात. त्यामुळे जातिभेद मनात नसतानादेखील एका विशिष्ट समाजाचा प्रभाव सर्वत्र दिसत राहतो हे लक्षात न येण्याइतक्या जाणिवा प्रगल्भ नसतात. क्वचित असल्या तरी अधिकारपद व त्या अनुषंगाने येणारी सामाजिक प्रतिष्ठा, जी पूर्वी जन्मजात होती ती सोडायची इच्छा नसते.

Maharashtra assembly election, caste division Maharashtra , Maharashtra number of parties,
दहा दिशांनी, दहा मुखांनी…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
rbi bans four micro finance from issuing loans
अग्रलेख : ‘मायक्रो’चे मृगजळ!
information about RSS, RSS,
प्रचारक… संघाचा कणा!
Chandrababu Naidu and MK Stalin Push For More Kids
अग्रलेख : जनांचा प्रवाहो आटला…
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
steering committee approves maharashtras revised curriculum
अग्रलेख : आम्ही अडगेची राहू….
political article lokrang
आबा अत्यवस्थ आहेत!

आयआयटीमाधील उच्चविद्याभूषित प्रचारक मोठ्या संख्येने संघाकडे आहेत असे विधान लेखक करतात. पण ती काही संघाची एकट्याची मक्तेदारी नाही. वेगवेगळ्या एनजीओमध्ये व डाव्या चळवळीतदेखील असे तरुण मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या विद्योला संघटनेत फार किंमत नसते. त्याला भलतेच काम दिलेले असते. उच्चविद्याभूषित असले तरी राजकीय वा सामाजिकदृष्ट्या हे लोक भोळसट असतात व संघटनेत आल्या आल्या त्यांचा त्यांच्या क्षेत्राशी संबंध संपतो. मी एकदा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेल्या व संघाच्या विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या खरगपूर आयआयटीमधून पदवीधर व्यक्तीच्या भाषणाला हजर होतो तर ते माँ अमृतमायी यांच्याकडे कशी दैवी शक्ती आहे व त्या लोक कसे बरे करतात याबद्दल अस्खलित हिंदीत बोलले. गर्भसंस्काराच्या प्रचाराचे काम दिलेल्या एका तरुणाशी एकदा गाठ पडली आणि त्याच्याकडे पुरावा म्हणून अभिमन्यूच्या गोष्टीशिवाय काही नव्हते. हे काम मनुष्य निर्माणाचे कसे काय म्हणता यावे?

शाकाहाराचे अवडंबर माजवत सामाजिक समरसता कशी साधता येईल हे समजत नाही. संपूर्ण भारतीय समाज संघात विसर्जित करण्याची ही हास्यास्पद धडपड आहे. भागवत म्हणतात, ‘‘खाण्यावर काही अवलंबून नसते.’’ पण परिवारातील इतर जबाबदार लोक याबद्दल आग्रही विधाने करतात. कदाचित याबद्दल कोणी काय बोलायचे हे ठरलेले असावे. मांसाहाराला टोकाचा विरोध असणाऱ्या जैन समाजाचे संघ परिवारात बरेच वजन आहे. हा समाज अकबराच्या काळापासून सत्ताधाऱ्यांना धरून आहे. संघाच्या युनिफॉर्ममध्ये असलेला चामडी बूट व पट्टा त्यांच्या आग्रहाखातर बदलण्यात आला असे समजायला वाव आहे.

कम्युनिस्टांनी मार्क्सला जितके अडगळीत टाकले आहे त्याच्यापेक्षा जास्त परिवाराने दीनदयाळ उपाध्याय यांना अडगळीत टाकून दिले आहे. गेल्या १५ वर्षांत संघ स्वयंसेवकांनी मोठी फूट हिंदू समाजात पाडलेली आहे. भाजपला मतदान करणारे तेवढेच हिंदू व इतर लोक देशद्रोही ठरवले गेले आहेत. हिंदू समाज एक नाही. तो एकजीव करणे हे संघाचे सर्व समस्यांवर उत्तर आहे असे सांगितले जायचे. खरे तर हिंदू समाज सांस्कृतिकदृष्ट्या एक आहेच. तो राजकीयदृष्ट्या एक नाही व तो आपल्याला मतदान करत नाही. आपले ऐकत नाही ही परिवाराची अडचण आहे. इतर राजकीय पक्ष फोडून हिंदू समाज एक करायचा हे तर्कशास्त्र अजब व स्वार्थी आहे.

सध्या देशातील बरावाईट बदल हा संगणकीय क्रांतीने घडवलेला आहे. कोणच्याही विचारधारेचा प्रचारक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे ग्लॅमर आता तरुणांच्या मनात नाही. ४० वर्षांपूर्वी जे तरुणाला माहीत असायचे त्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती तरुणांच्याकडे आजकाल असते. पूर्वी जी अर्धसत्ये पूर्ण म्हणून खपवली गेली ते आता चालणार नाही. लोक प्रश्न विचारणार, प्रतिवाद करणार व संघ प्रचारकाकडे त्याची उत्तरे असली पाहिजेत. पण ती देण्याइतपत त्याचा अभ्यास नसतो व व्यक्तिमत्त्वही नसते.

जे स्वयंसेवक पूर्वी थोडी वर्षे प्रचारक म्हणून काम करून संसारात स्थिरावले त्या बहुतेकांची मुले परदेशात आहेत. किंवा जाण्याच्या प्रयत्नात आहेत. संघ परिवाराचा पाया आता उच्चवर्णीय असणार नाहीत हे ३० वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले. नजीकच्या भविष्यात बहुजन समाजातून संघाला कार्यकर्ते मिळवणे आवश्यक असताना जातवार जनगणना किंवा राखीव जागांच्या विरोधात काही भूमिका घेणे संघ परिवाराला परवडणार नाही. आणि प्रचारकदेखील त्यांच्यातूनच मिळवायचे आहेत व त्याचबरोबर त्या संस्थेचे विरणारे वलयदेखील टिकवून ठेवायचे आहे. प्रचारक या संस्थेचा कसोटीचा काळ खरे तर पंधरा वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. तेव्हा प्रचारकांनी उपाशी राहून, स्टेशनावर झोपून, गर्दीच्या डब्यात प्रवास करून संघटना वाढवली हे कौतुक फार दिवस पुरणार नाही. -सुनेत्र जमखिंडीकर

प्रचारकांचा उदो उदो!

जर स्वयंसेवकांत राष्ट्रासंबंधी गौरवाची भावना निर्माण झाली असती तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सरदार वल्लभभाई पटेल जे त्यावेळेसचे गृहमंत्री होते त्यांना १४ मार्च १९४८ रोजी ‘‘मला असे सांगितले गेले आहे की, आरएसएसच्या लोकांनी तंटा निर्माण करण्यासाठी योजना तयार केलेली आहे. त्यांचे बरेचसे लोक मुसलमानांचे पोशाख घालून मुसलमानांच्या रूपात हिंदूंवर आक्रमण करणार आहेत, त्यामुळे दंगा निर्माण होईल आणि हिंदू भडकतील त्याचबरोबर काही हिंदूंच्या रूपातील लोक मुसलमानांवर हल्ला करतील, त्यामुळे मुसलमान भडकतील त्याचा परिणाम हिंदू-मुस्लीम लोक एकमेकांविरुद्ध उभे राहतील.’’ असे का बरं लिहिले असते? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या देशात असे कृत्य करणे म्हणजे निश्चितच मातृभूमीची सेवा करणे नव्हते. गांधीजींनी पुकारलेल्या चळवळींना विरोध करून अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांना सोयीची अशी भूमिका घेणे म्हणजे राष्ट्रभक्ती होती काय? स्वत:ची संघटना वाढवण्यासाठी ज्या प्रचारकांचा उपयोग करण्यात आला त्यांना मातृभूमीच्या सेवेत अर्पण करणे असे म्हणणे कितपत योग्य?

हिंदू राष्ट्र हेच जर जीवनध्येय होते तर घटनेतील अनुच्छेद १५ (धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध करतो ) ला विरोध करायची मुभा होती, पण ते केल्याचे इतिहासात आढळत नाही. विविधतेत एकता आत्मसात केलेल्या देशात एका समाजाचे वर्चस्व कदापी मान्य नव्हते आणि नसणार म्हणून प्रचारकांचा उदो उदो लेखकाने केला आहे. त्यात संघटना वाढवण्यापलीकडे देश वाढवण्याच्या कार्यक्रमात काडीचंही योगदान नाही. प्रचारक हे कसे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होते असे बळजबरीने घुसवण्याचा प्रयत्न लेखकाने केविलवाणा प्रयत्न केला आहे. -परेश संगीता प्रमोद बंग, अकोला</strong>

व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेला तिलांजली देण्याची वेळ

संघकार्य आणि संघविस्तार करण्यात संघप्रचारकांचे योगदान अतुलनीय असेच आहे. या लेखात रास्व संघाचे माजी प्रचारक आणि विद्यामान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ज्योती पुंज’ पुस्तकाचा उल्लेख आहे. त्यात त्यांचे गुरू आणि गुजरातेत प्रांतप्रचारक म्हणून भरीव योगदान दिलेल्या लक्ष्मणराव इनामदार यांचा विशेषत्वाने उल्लेख आहे. दोघांचे एकत्रित छायाचित्रही आहे. खटाव ( जि. सातारा ) हे मूळ गाव असलेले लक्ष्मणराव इनामदार यांचा परिचय गुजरातेत वकीलसाहेब या नावाने होता आणि आहे. ते सहकार भारतीचे संस्थापक होते. त्यांच्या स्मरणार्थ ‘लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अॅकॅडमी ऑफ को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्च’ (गुरुग्राम, हरियाणा) तसेच लक्ष्मण ज्ञानपीठ (साणंद, अहमदाबाद, गुजरात) या शिक्षण संस्थांची स्थापना अनुक्रमे गुरुकुल पद्धतीने आधुनिक शिक्षण आणि सहकार शिक्षण यांसाठी झाली आहे.

संघाची एक राजकीय उपशाखा भाजपत ‘आयाराम गयाराम’ संस्कृती फोफावत असून, भाजपची ‘केडर’ ही सत्ताकारणाला शरण गेल्याचे चित्र दिसत आहे. आजमितीला भाजपतील ४० नगरसेवक, आमदार, खासदार बाहेरून प्रविष्ट झालेले आहेत. त्यामुळे एका भाजपत ‘दोन भाजप’ तयार झाले आहेत- (१) मूळचे पिढीजात, परंपरागत निष्ठावान (२) बाहेरून येऊन मोठमोठ्या पदांवर आरूढ झालेले संधीसाधू!

संघाचा एक हितचिंतक म्हणून सांगावेसे वाटते की, व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेला समाजकारणात आणि राजकारणात तिलांजली देण्याची वेळ आली आहे. संघकार्य आणि संघविस्तार करताना ‘संघ समाजात विलीन व्हावा’ ही संघ संस्थापकांची मूळ धारणा होती. याचा अर्थ संपूर्ण समाजच संघमय व्हावा म्हणजे संघाच्या वेगळ्या अस्तित्वाची गरजच उरणार नाही. संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर हे उद्दिष्ट गाठायला अजून कित्येक दशके जातील. ‘वाढ, गुणवत्ता, समावेशकता’ या त्रिसूत्रीनुसार वाटचाल केल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. -डॉ. विकास हेमंत इनामदा