मराठी भावगीतांच्या दुनियेतील योगदानात शंभरहून अधिक कलाकारांची कामगिरी ठळकपणे दिसून येते. गीतलेखन, संगीत दिग्दर्शन आणि गायनाच्या माध्यमातून ही मंडळी श्रोत्यांना भेटत राहिली. ध्वनिमुद्रिका कंपन्यांची निर्मिती व वितरण, आकाशवाणीसारखे सशक्त माध्यम, गायन मैफली, संगीत संयोजनाचे योगदान, ध्वनिमुद्रणशास्त्र अशा अनेक गोष्टींमुळे भावगीत बहरले. प्रत्यक्ष गायनाच्या कार्यक्रमांतून वाद्यमेळ वाढला. अनेक तरुण मंडळी भावगीतगायनाचे कार्यक्रम करू लागली. स्वत: गायलेली नसली तरी मनात ठसलेली, रसिकप्रिय झालेली गाणी वाद्यवृंदांतून गाणे ही गोष्ट रूढ झाली. गायन कारकीर्दीसाठी हा मार्ग शिडी ठरू लागला. अशा कार्यक्रमांना लोकाश्रय मिळू लागला. भावगीतगायन म्हणजे शब्दप्रधान गायकी हे मनावर ठसले. अशा प्रकारच्या सुगम गायनासाठी फक्त मधुर आवाज असून चालत नाही, तर असे गायन हा वेगळा व पद्धतशीर अभ्यास आहे हे समजले. या विषयाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे झाले. या क्षेत्रातील पुरेसा अभ्यास व अनुभव असणाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे नीटपणे समजावून सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली. या क्षेत्रातील चौफेर निरीक्षण व सूक्ष्म दृष्टी म्हणजे काय, हे समजणे गरजेचे झाले. श्रोत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या गायकांमध्ये कोणते गुण असतात? गाण्याची चाल आवडते त्याचे नेमके कारण काय? गाण्यामधील म्युझिक पीसेस पूरक वाटतात म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींच्या मागे शास्त्र आहे हे हळूहळू जाणवू लागले. रेडिओवर किंवा रेकॉर्डवर गाणे ऐकले आणि कार्यक्रमात सादर केले, इतके हे सोपे नसते, तर त्यामागे विचार, चिंतन आणि व्याकरण आहे हे सिद्ध होऊ लागले. भावगीतांच्या प्रवासात हे शास्त्र अधिकारवाणीने सांगणारा व शिकवणारा असा एक बुद्धिमान गुरू भेटला- ज्याच्यामुळे शब्दप्रधान गायकीला शिस्त आहे हे कळले. असा गुरू भेटणे महत्त्वाचे असते. यातले ठळकपणे सांगता येईल असे नाव म्हणजे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा