‘भावगीत पुढे नेले’ या विधानात संगीतशैली, कामाच्या जबाबदारीचे भान, श्रोत्यांची अभिरुची घडणे, कानसेनांची दाद मिळणे, कवितेमधील प्रगल्भता, वाद्यमेळ संयोजन, गायनातील स्वरभाव सांभाळणे आणि या सगळ्यात वर्षांनुवर्षे राहील असा आदर्श निर्माण करणे ही सारी अवधाने असतात. हा विचार जपलेले एखादे गाणे समोर येते तेव्हा काही वेगळे गवसल्याचा आनंद होतो. अशा गीतात पंडित आणि अपंडित या दोघांना ‘हलवण्याचे’ सामर्थ्य असते. अशी गाणी रसिकांच्या स्वीकृतीची मोहोर घेऊनच जन्माला येतात. असे गीत जन्माला येणे हा आपल्या सर्वाच्या कुंडलीतला भाग्ययोग असतो. आपल्यामधील रसिकता अशा गाण्यामुळे प्रगल्भ होते. कवी, गायक, संगीतकार, वाद्यमेळातील वादक या सर्वाच्या प्राणशक्ती भावगीताच्या ठायी एकवटलेल्या दिसतात. भावगीतातील अचूक भावना मिळते व एखादी शास्त्रशुद्ध मैफल ऐकण्यासारखा आनंद मिळतो. गाणे शास्त्रकाटय़ाच्या कसोटीला न्याय देते व गाण्यातला शब्द मोहात पाडतो. त्या गीताच्या म्युझिक अरेंजमेंटमधील संगीत हेसुद्धा आदर्श आणि परिपूर्णतेचा आनंद देणारे ठरते. असे गाणे गाण्याचा व वाजविण्याचा मोह होतोच, पण हे सारे बिनचूक होण्याचे दडपण असते. तसे पाहिले तर कोणत्याही आदर्शवत कामाचा पुन:प्रत्यय देताना ही अवस्था येतेच. किंबहुना ही अवस्था आली तरच हातून चांगले काम घडते. त्यासाठी मूळ गीत वारंवार ऐकणे आवश्यक बनते, तरच त्यातील ‘खोली’ सर्वार्थाने समजते. ती समजली, की आनंद गगनात मावेनासा होतो. नादाच्या अलौकिक पातळीवर आपण तल्लीन होतो आणि आपण त्या विश्वात थांबणे पसंत करतो. तो नादब्रह्म हाच परब्रह्म आहे याची जाणीव होते. त्या भावगीताने निर्माण केलेल्या समाधी अवस्थेतच राहावेसे वाटते. अशी अनुभूती देणारे ‘माईलस्टोन’ भावगीत म्हणजे – ‘श्रावणात घननिळा बरसला..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा