निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांच्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर १६ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल तेव्हा जनतेने आम्हालाच पसंती दिल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. तर जनमत चाचण्या किती चुकीच्या होत्या हे सिद्ध होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.
आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांच्या प्रचारसभांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार, असा दावा भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केला आहे. तर देशात ऐक्य आहे आणि काँग्रेस सत्तेवर असताना सर्व नागरिकांना समान वागणूक मिळते, असे केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
भाजप या निवडणुकीत आघाडीवर असेल, असे विविध जनमत चाचण्यांमधून समोर आले आहे, त्याबाबत विचारले असता सिब्बल म्हणाले की, २००४ मध्येही अशाच प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि भाजप आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे २००९ मध्येही काँग्रेसला विजय मिळेल, असे भाकीत वर्तविण्यात आलेले नव्हते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, नऊ टप्प्यांत मतदान घेण्याचा निर्णय म्हणजे कालापव्यय असून त्यामुळे राजकीय पक्ष आणि पर्यायाने जनतेला वेठीस धरल्यासारखे होईल, असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.
‘पेड न्यूज’ आणि ‘पेड ओपिनियन पोल्स’ अर्थात जनमत चाचण्या यांविषयी निवडणूक आयोगाने थेट सूचना दिल्या नसल्यामुळे त्यावर बोलता येणार नाही, असेही येचुरी म्हणाले. मात्र खर्च मर्यादा वाढविण्याच्या निर्णयाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आपणच जिंकणार, असे चित्र भाजप सातत्याने रंगविते, २००४ मध्येही ‘इंडिया शायनिंग’ प्रचार करण्यात आला. त्याचीच पुनरावृत्ती २००९ मध्ये झाली, यात भाजप माहीर आहे, अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनी केली तर काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन विरुद्ध भाजपचा जातीयवादी दृष्टिकोन असा सामना होईल, असे मनीष तिवारी म्हणाले.
१६ वी लोकसभा निवडणूक
3 टप्प्यात मतदान
२ दिवसांची निवडणूक प्रक्रिया
८१.४५ कोटी
एकूण मतदार (२००९ च्या तुलनेत १०.१५ कोटी अधिक)
२. ३० कोटी  
मतदार १८ते १९ वयोगटातील
(मतदार संख्येच्या २.८८ टक्के)
२८,३१४ तृतीयपंथी मतदार
९,३०,००० मतदान केंद्रे (मागील निवडणुकीपेक्षा १ लाख ८६६ ने जास्त)
१८,७८३०६ मतदान यंत्रे
९८.६४ टक्के मतदार याद्या छायाचित्रांसह तयार
निवडणूक खर्च मर्यादेतील वाढ
निवडणूक आयोगाने गेल्याच आठवडय़ात जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, उमेदवारांना निवडणुकांसाठी करता येणाऱ्या प्रचार खर्चात वाढ करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीम वगळता अन्य राज्यांमधील तसेच दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना प्रचारासाठी ७० लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल, तर उपरोक्त तीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांना ही मर्यादा ५४ लाखांपर्यंत असेल.
नोटा nota
(वरीलपैकी कोणीही नाही)
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे यंदा प्रथमच मतदारांना ‘वरीलपैकी कोणीही नाही’ अर्थात नोटा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान यंत्रांवर सर्वात शेवटी गुलाबी रंगात ‘नोटा’ हा पर्याय असेल. एकाही उमेदवारास आपली पसंती नसेल तर मतदार या पर्यायावर मोहोर उमटवू शकतात.
१.१ कोटी निवडणूक कर्मचारी (निम्मे सुरक्षा कर्मचारी)
‘पेपर ऑडिट ट्रायल’मतदाराने मत दिल्यानंतर
ते ‘नेमके कोणत्या उमेदवाराला’ आणि ‘कोणत्या चिन्हास’ गेले आहे याची खातरजमा करणारी ‘पेपर स्लीप’ उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रायोगिक तत्त्वावर निवडणूक आयोगातर्फे करण्यात येणार आहे. ‘व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल’ अर्थात व्हीव्हीपीएटी यंत्रणा राबविण्यात येईल.
मतदारांनो तुमच्यासाठी..
यंदा निवडणूक आयोगाने अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मतदारांना आपलं नाव मतदान यादीत आले आहे किंवा कसे याबाबत माहिती मिळविण्यासाठी आयोगाने १९५० हा टोलफ्री क्रमांक सुरू केला आहे. शिवाय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारेही अनुषंगिक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मतदारयादीत ज्यांना आपल्या नावाचा समावेश करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आपली नावे वेळेत निवडणूक यादीत नोंदविता आलेली नाहीत, अशांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ती ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येतील.

यंदा महिला, वृद्ध, शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या मतदारांसाठी आयोगाने विशेष माहिती केंद्रे सुरू करण्याचा निर्णय गेतला आहे. मतदार हेल्पलाइन, मतदार ओळखपत्रे, मदत केंद्रे, केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत संकेतस्थळे आणि एसएमएस सुविधा यांचा वापर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रभावीपणे करण्यात येणार आहे.

मतदारांना जर आपले नांव यादीत कोठे आहे याबाबत नेमकी खात्रीशीर माहिती नसेल तर, मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन तेथे आपल्या नावाबद्दल खातरजमा करता येवू शकेल. मतदार ओळखपत्र नसेल तरीही पारपत्र, पॅनकार्ड अशा सरकारी फोटो ओळखपत्राद्वारे इच्छुक आणि पात्र मतदारांना आपले मत देता येवू शकेल.

एखाद्या कारणामुळे जर मतदाराचे नांव अतदार यादीतून वगळले गेले असेल तर अशा मतदारांसाठी येत्या ९ मार्च रोजी देशातील ९ लाख ३० हजार मतदान केंद्रांवर मतदार नांव नोंदणीसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे, संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले आहे.

Story img Loader