दोनेक वर्षांपूर्वी समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत आले की विमानतळ ते नवीन महाराष्ट्र सदनापर्यंत त्यांच्या मागे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असत. तेव्हा अण्णांचा ‘टीआरपी’ चांगला होता. शिवाय देशभर बातमी पोहोचवायची असेल तर कोणत्या वृत्तसंस्थेचा प्रमुख आल्यावर बोलायचे हे तत्कालीन सहकारी सुरेश पठारे अण्णांना सांगत असत. पण गेल्या दोन दिवसांपासून अण्णा दिल्लीत आहेत. रामलीला मैदानावर सभा घेणार होते. पण समोर गर्दी नव्हती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे नव्हते. त्यात अण्णांची तब्येत ‘बिघडली’ आणि ते सभेला पोहोचलेच नाहीत. बरं महाराष्ट्र सदनात अण्णांची खोली तळमजल्यावर आहे. तेथे जावं, तर सुरक्षारक्षकांचा गराडा. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच अण्णा प्रसारमाध्यमांना टाळत आहेत. आज, गुरुवारी अण्णांनी नवीन महाराष्ट्र सदनातल्या दुसऱ्या मजल्यावरील कक्षात बैठक घेतली. ही बैठक संपल्यावर जीना वा लिफ्टने जाण्याऐवजी अण्णा मागच्या ‘फायर एक्झीट’ दाराने बाहेर पडले. का तर म्हणे प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी. ‘फायर एक्झिट’ मधून ‘पार्किंग’ओलांडत अण्णांनी धावत-पळत आपली रूम गाठली. त्यामुळे छायाचित्रकारांची मोठी निराशा झाली. अण्णा कधी सुरक्षारक्षकांच्या मागे तर कधी धावत-पळत छायाचित्रकारांना टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधीकाळी जनलोकपाल आंदोलन भडकपणे घराघरात पोहोचवणाऱ्या प्रसारमाध्यमांचे कौतुक करताना अण्णा थकत नसत. पण आता अण्णांचे दर्शनही पत्रकारांना दुरापास्त झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा