येत्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आल्यास कोकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळावारी येथे जणू निवडणूक प्रचाराचे शिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथील जिमखाना मदानावर उद्धव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या जनतेने चमत्कार घडविला असून राजकीय नरकासुराचा वध केला आहे. आता त्या विषयावर बोलण्याची गरज उरलेली नाही. आता कोकणच्या जनतेला हवा असलेला विकास करण्याची आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचे सरकार सत्तेवर आणल्यास हा विकास आम्ही निश्चितपणे घडवून दाखवू.
राज्याचे उद्योगमंत्री नारायणे राणे यांचा भाषणात नामोल्लेख न करता ठाकरे म्हणाले, कोकणचा माणूस शांतताप्रिय आहे, पण डरपोक नाही. कोकणात गुंडगिरीची हिंमत यापुढे कोणी करू नये. आयुष्यात संधी एकदाच मिळते. त्याचे सोने करायचे की माती, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. बाळासाहेबांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या संधीची तुम्ही माती केली आणि फक्त स्वतचे सोने केले. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी छत्रपती शिवाजीमहाराजांची ताकीद असे. पण गरिबालाच उखडून टाकणारी तुमची अवलाद आहे. इथल्या माणसाला तुम्ही नेस्तनाबूत केले. त्याची परतफेड कोकणी जनतेने केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा