आम आदमी पक्षाचे निमंत्रक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. हा देश पंतप्रधान मनमोहन सिंग चालवित नसून मुकेश अंबानी चालवित आहेत आणि मोदी व राहुल अंबानीच्या खिशात आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. प्रचारासाठी केजरीवाल मुंबईत आले होते.मेधा पाटकर यांच्यासाठी त्यांनी विक्रोळी-कन्नमवार नगरमध्ये जाहीर सभा घेतली. सभेला मोठी गर्दी होती. या वेळी तासाभराच्या भाषणात केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपवर तुफान हल्ला चढविला. काँग्रेस व भाजप हे सारखेच भ्रष्टाचारी पक्ष आहेत, म्हणून या निवडणुकीत सत्तास्थानावरचा पक्ष बदलायचा नाही, तर व्यवस्था बदलायची आहे असे म्हणाले.

केजरीवाल यांचे टीकास्त्र
* राहुल गांधी, नरेंद्र मोदी अंबानींच्या हेलिकॉप्टरमधून व विमानातून फिरतात.
* देशातील सारे गुंड व भ्रष्टाचारी मोदींच्या सोबत मोदींनी गुजरातमधील शेतकऱ्यांच्या जमिनी लुटून अंबानी व अदानीला एक रुपये दराने दिल्या.
* गुजरातमध्ये बेसहारा झालेल्या ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
* विकासाच्या मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्या मोदींच्या कारकीर्दीत गुजरातमधील ६० हजार उद्योग बंद पडले.
* मोदींच्या विरोधात बोलण्याची माध्यमांची हिंमत नाही.