चहाच्या पेल्याचे राजकारण हे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे आगळेपण ठरणार आहे. लहानपणी कधी चहा विकणारे नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी केलेली बोचरी थट्टा आता या चहाच्या पेल्यातील वादळाप्रमाणे उसळली आहे. अय्यर यांनी मोदींवर टीका केली आणि चहा हे जणू भाजपचे राष्ट्रीय पेय झाले. चहा हे ‘व्यसन’ मानणाऱ्या संघ परिवारातील चर्चादेखील चहाशिवाय पुढे सरकेनाशा झाल्या, अशीही चर्चा आहे..
भाजपने तर आता देशभरात ‘चाय पे चर्चा’ अशी चळवळच उघडली, आणि ‘मोदी चहा स्टॉल’ही जागोजागी उभे राहिले. आता यापुढेही एक मजल मारण्याची तयारी मोदी समर्थकांच्या एका गटाने सुरू केली आहे, अशी चर्चा आहे. मोदी यांच्या नावाने होणाऱ्या ‘चाय पे चर्चा’ उपक्रमासाठी ‘नमो टी पार्टी’ या नावाने ‘ट्रेडमार्क’ नोंदणी करण्यासाठी या गटाने सरकारकडे अर्जदेखील केला आहे. ‘नमो टी पार्टी’ ही एक ‘राष्ट्रीय चळवळ’ व्हावी, यासाठी अहमदाबादमधील शैलेश तिवारी नावाच्या एका मोदी समर्थकाने मोहीम उघडली असून, त्याच्या निमंत्रकपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. चाय पे चर्चा या कार्यक्रमाची दुसऱ्या कोणासही नक्कल करता येऊ नये, म्हणून ही शक्कल लढविण्यात आल्याचे तिवारी म्हणतात. एकाच व्यवसायातील अनेकांनी एकत्र येऊन चहाचे घुटके घेत एखाद्या विषयावर चर्चा करावी आणि विधायक विचारमंथन करावे हा या चळवळीचा उद्देश राहील, असे सांगण्यात येते. देशभरातून हजारो कार्यकर्ते या चळवळीशी जोडले जातील, असा तिवारींचा विश्वास आहे. चहाला राजकारणाची अशी मान्यता मिळाल्यावर, ‘बसू आणि बोलू’ असे ‘धोरण’ असलेल्या अनेकांच्या सवयी बदलून जातील, अशीही एक छुपी चर्चा सध्या सुरू आहे.
असे होणार असेल, तर ‘इस चाय पे’ चर्चा होणारच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा