ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांची पोकळी भरुन काढण्यासाठी व त्यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासाठी संघर्ष यात्रा ही शक्तीप्रदर्शनाची संधी ठरणार आहे. संघर्ष यात्रा यशस्वी झाल्यास विधानसभेसाठी भाजपला फायदा होईल व मुंडे यांच्या पश्चात स्वतचे स्थान निर्माण करण्यासाठी पंकजा यांनाही ती उपयुक्त ठरणार आहे. ही यात्रा राजमाता जिजाई यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथून २७ ऑगस्टपासून सुरु होणार असून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.
गोपीनाथ मुंडे यांनी १९९४-९५ मध्ये संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला. त्याच संघर्षांचा वारसा घेऊन पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रेचा संकल्प जाहीर केला. भाजपचे केंद्रीय व राज्यातील नेते यात सहभागी होणार असून समारोपासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा किंवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना निमंत्रित करण्याचा विचार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी दिली.

यात्रेची वैशिष्टय़े
२७ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर पर्यंतचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही यात्रा २१ जिल्ह्य़ांमधील ७९ विधानसभा मतदारसंघातून जाईल. त्यात सुमारे ६५ सभा व २०० हून अधिक मेळावे होतील. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थानी यात्रेचा समारोप होईल.