लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत आहे. प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्याबरोबरच रिंगणाबाहेरच्या प्रस्थापित राजकारण्यांचीही प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक आहे. त्यात शरद पवार, नारायण राणे, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आर.आर.पाटील, गणेश नाईक, एकनाथ खडसे, रामदास आठवले, डॉ. विजयकुमार गावित आदी नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसमधील दुसरे एक तहहयात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम पुण्यातून राजकीय भवितव्य अजमावत आहेत. पतंगरावांचेही राजकीय स्थान ठरविणारी ही निवडणूक आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांची निवडणूक गणेश नाईक यांना राजकीय संजीवनी देणारी ठरणार आहे. अर्थात निकाल काय लागणार, त्यावरच सारे ठरणार आहे.  
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेही रिंगणात आहेत. खडसे यांच्या राजकारणाला वळण देणारी ही निवडणूक आहे.
काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्या इशाऱ्यावर नगरचे राजकारण चालते, असे मानले जाते. शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाघचौरे हे त्यांचे उमेदवार आहेत. विखे-पाटील यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे. नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे भाचे राजीव राजळे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. राजळे यांच्या जय-पराजयावर विखे-थोरात यांच्यातील वर्चस्वाच्या राजकारणा निकाल लागणार आहे. 
सांगलीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील आहेत. परंतु आर. आर. पाटील यांचे कट्टर विरोधक संजयकाका पाटील यांनी त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे सांगलीतील निवडणूक आबांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. महायुतीतील रिपब्लिकन पक्षाला सातारा ही एकच जागा मिळाली आहे. त्या ठिकाणी उदयन राजे यांच्याशी टक्कर देणे सोपे नाही. रिपाइंच्या उमेदवाराचा केविलवाणा पराभवही आठवले यांच्या पुढील राजकीय वाटचासाठी अडचणीचा ठरू शकतो.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे साडेचार दशके लोकांमधून निवडून जाण्याची परंपरा खंडित करून शरद पवार पहिल्यांदाच निवडणूक मैदानाच्या बाहेर राहिले आहेत. परंतु बारामती मतदारसंघातून त्यांची कन्या सुप्रिया सुळे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघावरील पवारांची हुकुमत लक्षात घेता, सुप्रियांचा विजय अवघड नाही. परंतु विरोधकांनी उभे केलेले आव्हानही दुर्लक्षण्यासारखे नाही. मताधिक्य घटले तरी, पवारांसाठी हा राजकीय चिंतेचा विषय बनू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसधील एक बडे नेते नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गात आपली सारी ताकद पुत्र निलेश राणे यांच्या पाठिशी उभी केली आहे. राणे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील नेते आहेत. या मतदारसंघात शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. मुलाच्या जय-पराजयावर नारायण राणे यांचेही राजकीय भवितव्य ठरणार आहे.

मुलीच्या राजकीय भवितव्यासाठी सत्तात्याग करणारे डॉ. विजयकुमार गावित यांची तर नंदुरबारमधील निकालावरच पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. त्यांची कन्या हिना गावित निवडणूक लढवित असल्या तरी, गावितांचे भवितव्य पणाला लागले आहे. दुसऱ्या बाजुला नंदूरबार हा गांधी घराण्याचा आवडता मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील माणिकराव गावित यांच्या जय-पराजयाशी गांधी घराण्याचीही प्रतिष्ठा बांधलेली आहे.