राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘ईडी’ (सक्तवसुली संचलनालयाने) समन्स पाठवून चौकशीसाठी हजार राहण्यास सांगितलं होतं. मात्र, अनिल देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं आहे. तसेच, प्रत्येक चौकशी ऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. करोनामुळे त्यांनी ऑडिओ / व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. यावरून भाजपाकडून आता अनिल देशमुखांवर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेत्यांकडून टीका सुरू झाली आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील अनिल देशमुखांना टोला लगावला आहे.

“करोना लॉकडाउन काळात मुंबई-नागपूर विशेष विमान फेऱ्या सुरू होत्या तेव्हा वय, आजारपण हे अनिल देशमुखांना आठवत नव्हतं. आता मुंबईतून ईडी कार्यालयात जायचं म्हटल की वय, आजार आठवायला लागले.” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

 

तर, आज ईडीला लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, “मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. २५ जूनला तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही व मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.”

“म्हणून मी हजर होऊ शकत नाही…” अनिल देशमुखांनी ईडीचं समन्स टाळत केली विनंती

तसेच, ईडीने त्याच्यांसंदर्भात दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाची (ईसीआयआर) प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचे देशमुख म्हणाले. ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक स्वरुपातील उपस्थिती राहावे लागेल असे स्पष्ट केलेल नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

“कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही” ; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा

“कायद्यासमोर कुणालाही पळवाट काढता येत नाही. कायदा हा सगळ्यांना सारखा असतो, कायद्या समोर कितीही कुणी, काही कारण काढलं तरी जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या काही कायद्याबाबत वयाच्या बाबतीत शिथिलता असतील, कायद्यामध्ये ज्या सूट असतील, आजारपणाबाबत निश्चितपणे ते गृहीत धरूनच तशाप्रकाच्या सवलती किंवा ज्या काही शिथिलता देता येतील ते यंत्रणा देऊ शकते, कोर्ट देऊ शकतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात तपास यंत्रणा योग्य तो निर्णय घेतील.” असं या अगोदर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे.