मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; अण्णा हजारेंचाही पाठिंबा

मुंबई : करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने सोमवारी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला. मात्र, ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

राज्य सरकारला केवळ नोटांचा व मद्य दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी शंखनाद करण्यात आल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. करोना निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. मात्र मंदिरे सुरू झाली नाहीत. त्यामुळे भाजपला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागल्याचे सांगत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये सर्वानी निर्बंधांचे कटाक्षाने पालन करून सरकारला सहकार्य केले आहे. मात्र, करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतरही हे सरकार लोकांना जगण्याचा अधिकार नाकारू लागले. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिर परिसरातील छोटय़ा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे उघडण्याची परवानगी तातडीने न दिल्यास भाजप कार्यकर्ते मंदिराची कुलपे तोडतील व मंदिरे खुली करतील, असा इशाराही पाटील यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पुण्यातील कसबा गणपतीला साकडे घालून महाआरती केली. नागपूरला सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शिर्डी येथे खासदार डॉ. सुजय विखे, नाशिक येथे आमदार देवयानी फरांदे व आचार्य तुषार भोसले, मुंबईत बाबुलनाथ येथे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर आदी नेत्यांनी आंदोलन केले.

हजारे यांचा सरकारला सवाल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र, या आंदोलनात सहभागी होणे त्यांनी मंदिर बचाव कृती समितीने मोठे आंदोलन उभे करावे. प्रसंगी जेलभरो आंदोलन करावे. या आंदोलनात मी अग्रभागी असेन, अशी ग्वाही अण्णा हजारे यांनी दिली होती.

नगरमधील मंदिर बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे हजारे यांची भेट घेऊन मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली होती. मंदिर बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना हजारे म्हणाले, सध्या दारू दुकाने, हॉटेल्स उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तेथेही मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे करोना संसर्ग पसरत नसेल तर मंदिरे उघडल्याने संसर्ग कसा होईल? असाही प्रश्न हजारे यांनी केला होता.

पंढरीतील विठ्ठल मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न 

पंढरपूर: येथील विठ्ठल मंदिरासमोरही भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. भजन,कीर्तन गात, शंखनाद करत आणि मंदिर खुले करण्याच्या मागणीच्या घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनामध्ये नंतर सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली. यानंतर काही कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी मंदिराभोवती मोठा बंदोबस्त असल्याने हे घुसू पाहणारे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली. पोलिसांचे हे कडे भेदून काही कार्यकर्ते मंदिरात गेल्यावर तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काही वेळाने सोडून दिले.

 

निर्णय केंद्राचाच- वडेट्टीवार : मंदिरे बंद करण्याचा निर्णय आमचा नाही, तर केंद्र सरकारचा आहे. आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचे पालन करत आहोत. भाजपने शुद्धीत येऊन बोलावे, बेधुंद वक्तव्य करू नयेत, अशी टीका मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी के ली. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मंदिरे उघडी आहेत का, असा सवाल करत मतांच्या राजकारणासाठी भाजपचे नेते धर्माचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी के ली.