"ठाकरे सरकार हे भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार आहे," असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावी. मी विचारलेल्या पाच प्रश्नांपैकी त्यांनी एका प्रश्नाचं तरी उत्तर द्यावं असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला हिंमत असेल तर हात लावून दाखवाच असंही म्हटलं. “ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आणखी वाचा- खरंच हे जमिनीशी जोडले गेलेले मुख्यमंत्री आहेत; भाजपा नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला "दहिसर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही जमीन घोटाळ्याची कागदपत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. या घोटाळ्याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल केली होती. यांतर राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेशही दिले आहेत," अशी माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली. शिवसेनेमध्ये हिंमत नाही म्हणून ते विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ४० जमिनी घेतल्या हे कागदपत्रांवरून दिसत आहे. त्यातील ३० जमिनींच्या सातबारावर अन्वय नाईक कुटुंबीयांचं नाव असल्याचंही त्यांनी सांगितलं. आणखी वाचा- संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’; म्हणाले… यापूर्वी किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहार प्रकरणात वायकरांचंही नाव घेतलं होतं. दरम्यान, वायकरांसोबत आर्थिक संबंध आहेत का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असा सवालही सोमय्या यांनी केला. "मी सादर केलेली सर्व कागदपत्रं खरी आहे. जर मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर माझ्याविरोधात पोलिसांत जावं. मी कारवाईसाठी तयार आहे. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही हे मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचं आहे. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही, म्हणून शिवीगाळ करता." असंही ते यावेळी म्हणाले. आणखी वाचा- ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले… महापौरांकडून हेराफेरी मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. “सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. इतकंच नाही तर महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.