माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं असून मी काय साधा माणूस वाटलो का अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला असून चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मी असतो तर कानाखालीच…”; मुख्यमंत्र्यावर टीका करताना नारायण राणेंचं खळबळजनक विधान!

नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.

नारायण राणेंना अटक होणार?; नाशिक पोलिसांचं पथक रवाना

“आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर दिली. “ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?,” अशी विचारणा नारायण राणेंनी केली.

देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे अशी टीका करताना नारायण राणे यांनी मी असतो तर… ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता असा युक्तिवाद केला. मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे. काय चेष्टा लावली आहे असंही यावेळी ते म्हणाले.

शिवसेनेकडून टार्गेट केलं जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते…समोर उभं तरी राहावं”. “पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे? मी जे बोललो तो गुन्हा नाही..तपासून पाहावं,” असं यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं.

नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याचे पडसाद मुंबईत?; रात्री एक वाजता Tweet करत नितेश राणे म्हणाले…

पुढे ते म्हणाले की, “पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचं पण सरकार वरती आहे. हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूयात”. जन आशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही. आम्ही डबल आक्रमक आहोत असं यावेळी ते म्हणाले. नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली अशी टीका यावेळी त्यांनी केली. मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होतंय पाहूया असं आवाहन यावेळी त्यांनी दिलं.