सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून महाविकास आघाडीला यासाठी जबाबदार धरलं जात असून, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात निघणाऱ्या मोर्चांमध्ये सहभागी होऊ, असं सांगत पाठिंबा दर्शविला होता. आता मात्र, त्यांनी भाजपा स्वतः आदोलन करणार नाही, असं ते म्हणाले. “भाजपाने किती सन्मान दिला, हे छत्रपती संभाजीराजे सांगत नाहीयेत,” असंही ते संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपाने सेनेचे १० नगरसेवकांचा पक्षप्रवेश करुन धक्का दिला आहे. माथेरान नगरपंचायतीतील शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना एकत्र आणा,” संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यावर भाजपाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा पक्षातर्फे आंदोलन करणार नाही, मात्र आंदोलनाला पाठिंबा देण्यावर भाजपा ठाम असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार आहे,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपा नेते आणि खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी आपली मत व्यक्त केलं. “भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत,” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ठत्यांचा केलेला सन्मान आणि किती कामे मार्गी लावली हे बहुदा इतरांना माहित नाही,” असंही पाटील म्हणाले. चार-चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण मोदींनी भेट दिलेली नाही असे संभाजीराजे यांनी म्हटले होते त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं.

आणखी वाचा- प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का?; स्क्रीनशॉट शेअर करत काँग्रेस नेत्याचा सवाल

“संभाजीराजेंनी ४ वेळा भेट मागण्याच्या आधी ४० वेळा मोदींजीसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नसून राज्याचा आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

अहमदाबादमध्ये खा. संभाजीराजेच्या सन्मानार्थ मोदींसह सर्वजण उभे राहीले होते. एवढच नाही तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका असंही मोदी म्हणाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सध्या संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी भेट घेत आहेत. त्यात एक वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी खासदारकीही सोडायला तयार असल्याचं संभाजीराजे म्हणाले होते. तेव्हापासूनच भाजप आणि संभाजीराजे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. यावर संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही एवढच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजूला ठेऊन आम्ही सहभागी होणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.