महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. ‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ  नका हो’, अशी विनवणी तिने केली. मुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली. मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलालाच आईला समजाव असं मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं. तसेच पुढे जताना त्यांनी या महिलेच्या मुलाला उद्या भेट असंही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचं कॅमेरांनी टिपलं.

नक्की वाचा >> Chiplun Floods Viral Video: मदतकार्य करणारे तरुणीला दोरीच्या सहाय्याने गच्चीवर खेचून घेत होते अन् तितक्यात…

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

या महिलेने सर्व आमदार खासदारांचा दोन महिन्यांच्या पगार कोकणला मदत म्हणून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी भास्कर जाधव यांनी महिलेला, “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय,” असं म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांसोबत चालणाऱ्या ताफ्याला तिथून पुढे सरकरण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री थोडे पुढे गेल्यानंतर जाधव यांनी, “तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,” अशी प्रतिक्रिया दिली. याच व्हिडीओवरुन आता विरोधक भास्कर जाधवांवर टीका करताना दिसत आहेत.

दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेची पथके  रवाना

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेची दोन पथके  रविवारी रायगड आणि कोल्हापूरला रवाना झाली. रायगडला गेलेल्या पथकात दोन वैद्यकीय चमू, एक फिरती प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे चार टँकर, एक टोइंग वाहन यांचा समावेश आहे.

जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा!

अशा दुर्घटना घडू नयेत किंवा महापुराने नुकसान होऊ नये म्हणून पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा निर्माण करण्यात येईल. त्याचबरोबर ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर जिल्हा पातळीवरही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.